स्वराज्य वार्ता / हनुमंत दवंडे
सकल हिंदू समाजाचा जनआक्रोश मोर्चा
परतूर प्रतिनिधी : परतूर येथील एका इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांकडून कथितरित्या पाकिस्तानशी संबंधित गाण्यावर नृत्य सादर करण्यात आल्याच्या आरोपाच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने बुधवारी (दि. २४ जून) सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास विराट जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. उड्डाण पुलापासून सुरू झालेला हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिक, युवक सहभागी झाले होते. संबंधित शाळेत विद्यार्थ्यांच्या हातात तलवारी देण्यात आल्याचा तसेच कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी दहशतवाद्यांचे फोटो लावल्याचा आरोप केला. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक कट्टरता निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत संबंधित शाळा प्रशासन व जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तहसील कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर आंदोलकांच्या वतीने तहसीलदार दामोदर जाधव यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. संबंधित घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी आमदार संग्राम जगताप, कीर्तनकार संग्रामबापू भंडारी तसेच नानासाहेब वाघमारे, अंबादास अंग्रे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. समाजातील सलोखा अबाधित ठेवत विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम व संविधानिक मूल्यांची जपणूक व्हावी, यासाठी प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत.असे मत वक्त्यांनी व्यक्त केले. मोर्चादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या मोर्चामध्ये भाजप प्रदेश सचिव राहुल लोणीकर शिवसेना जिल्हा प्रमुख महेश नळगे, द. या काटे, भगवानराव मोरे, नामदेवराव धुमाळ, सावता काळे, आबा कदम, अर्जुन जगताप, व्यापारी संघटनेचे राजेश मस्के, अर्जुन राठोड, द.या काटे, शत्रुघ्न कणसे, रमेश भापकर, संभाजी वारे, यांच्यासह हजारो जन सहभागी झाले होते.

परतूर येथील इंग्लिशस्कूलमधील कथित वादग्रस्त स्नेहसंमेलन प्रकरणावर आमदार बबनराव लोणीकर यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. तसेच शाळेची मान्यता रद्द करणे, नियमभंगाची चौकशी करणे, अवैध बांधकामावर कारवाई करणे आणि संबंधित अधिकाऱ्यांचीही चौकशी करावी, अशी मागणी लोणीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली. विद्याध्यर्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती व संविधानिक मूल्ये रुजविण्याऐवजी कट्टरतेला खतपाणी घालणाऱ्या कोणत्याही कृत्याची गय केली जाणार नाही, अशी ठाम भूमिका आ. लोणीकर यांनी विधानसभेत मांडली.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






