मंठा – पंचायत समिती मंठा अंतर्गत सुरू असलेल्या मग्रारोहयो व इतर विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे यांनी केला.
स्वराज्य वार्ता / हनुमंत दवंडे
परतूर प्रतिनिधी : शिवसेना तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे यांचा गटविकास अधिकाऱ्यांना इशारा; मग्रारोहयो, घरकुल आणि पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप मंठा : पंचायत समिती मंठा अंतर्गत सुरू असलेल्या मग्रारोहयो व इतर विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन देत संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मग्रारोहयो विभागातील पी.टी.ओ., अभियंते व काही कर्मचारी शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याशिवाय मस्टर काढत नाहीत. विहिरीचे ले-आऊट देण्यासाठी तसेच प्रत्यक्ष पाहणीसाठी देखील वाहनखर्चाच्या नावाखाली पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अनेक कर्मचारी कार्यालयात नियमित उपस्थित राहत नसून, तक्रार करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना विस्तार अधिकारी व कार्यालयीन अधीक्षक वेळेवर उपलब्ध होत नसल्याची तक्रारही करण्यात आली आहे.
घरकुल योजनांमध्ये देखील मोठा गैरव्यवहार होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. काही गावांमध्ये प्रत्यक्ष घरकुलाचे बांधकाम न करताच लाभार्थ्यांकडून पैसे घेऊन खोटे मस्टर तयार करून बिले काढल्याचा आरोप बांधकाम अभियंत्यांवर करण्यात आला आहे.

तसेच शासनाच्या आदेशानुसार मुख्यालयी राहणे बंधनकारक असतानाही बहुतांश कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने नागरिकांना वेळेवर सेवा मिळत नसल्याचा संताप व्यक्त करण्यात आला आहे. परिणामी शेतकरी व सामान्य नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे बोराडे यांनी म्हटले आहे.“शेतकऱ्यांची होणारी लुबाडणूक तात्काळ थांबवावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल,” असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.या निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे यांची सही असून, तालुक्यात या निवेदनाची जोरदार चर्चा सुरू आहे.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल आवटे ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!







