स्वराज्य वार्ता मुखेड प्रतिनिधी मारोती वडजे
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यभर तीव्र चळवळ उभारणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले असून आता त्यांच्या नेतृत्त्वाखाली गुरुवारपासून (दि. २८ ऑगस्ट) मराठा समाजाचा विराट मोर्चा मुंबईकडे रवाना होणार आहे .
दि. २९ ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या या भव्य आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुखेड तालुक्यातील हजारो मराठा युवक मुंबईला जाणार असल्याची माहिती मिळते आहे.
गावागावांतून सकल मराठा समाजाने मोर्चासाठी जोरदार तयारी केली आहे. चावडी वाचन, गाव बैठका, मशाल रॅली, कीर्तन, भजन आदी सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली जात असून, प्रत्येक मराठा बांधवांना आरक्षणासाठी मुंबई गाठण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर मुखेड परिसरात मोठी चळवळ उभी राहिली आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, यावेळी मुखेड शहरासह तालुक्यातील जवळपास सर्व गावांतून मोठ्या संख्येने तरुण, महिला व ज्येष्ठ नागरिक मुंबईकडे रवाना होणार आहेत. पूर्वीच्या आंदोलनापेक्षा या वेळी दहा पटींनी जास्त उपस्थिती दाखवली जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा समाजाचा संयम सुटू शकतो, असा इशारा सकल मराठा समाजातील नेत्यांनी दिला आहे. “मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने सातत्याने आवाज उठवला, मात्र अद्यापही योग्य न्याय मिळालेला नाही. त्यामुळे आता लढा निर्णायक टप्प्यात गेला असून, आरक्षणाशिवाय घरी परतणार नाही,” अशा भावना समाजातील युवक-युवती व्यक्त करत आहेत.
मुखेड तालुक्यातील विविध संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा दिला असून, सर्वांनी एकदिलाने आंदोलन यशस्वी करण्याचे ठरवले आहे. मराठा समाजाची ऐक्यबांधणी, उत्साह आणि प्रबळ जनसमर्थन पाहता आगामी मोर्चा ऐतिहासिक ठरणार, आहे, असे सकल मराठा समाज मुखेड तालुक्याच्या वतीने व्यक्त करण्यात आले
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल आवटे ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!







