स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
तालुक्याचे हृदय मानले जाणारे तहसील कार्यालयच सध्या पावसाच्या पाण्याने गळतीग्रस्त झाले आहे. सलग संततधार पावसामुळे जीर्ण झालेल्या छतामधून पाणी गळती होत असून कार्यालयीन संगणकांवर पाणी पडल्याने ते निकामी झाले आहेत. महसूल विभाग, आस्थापना विभाग, अभिलेख कक्ष व पुरवठा विभागासमोरील पॅसेजमध्ये छताचा प्लास्टर गळून पडला. त्यामुळे कामासाठी आलेल्या नागरिकांबरोबरच येथे कार्यरत असलेल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दररोज शेतकरी, विधवा, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांच्यासह शेकडो लोक आपली शासकीय कामे उरकण्यासाठी तहसील कार्यालयात येतात. मात्र आता गळतीमुळे अर्ज व कागदपत्रे भिजण्याची वेळ आली आहे. “कामासाठी आलो की पावसाच्या पाण्यात भिजावे लागते, जीव धोक्यात घालावा लागतो” अशी खंत नागरिक व्यक्त करत आहेत.
महत्त्वाच्या अभिलेख कक्षामधील फाईली गळणाऱ्या पावसापासून वाचवण्यासाठी त्यावर तात्पुरत्या स्वरूपात प्लास्टिकचे आच्छादन करण्यात आले आहे. मात्र ही उपाययोजना अपुरी असल्याने कागदपत्रांचे मोठे नुकसान होण्याची भीती अधिकच वाढली आहे.
तहसीलदारांनी या संपूर्ण परिस्थितीची माहिती उपविभागीय अधिकारी तसेच जिल्हाधिकाऱ्यांना कळवली असून, सार्वजनिक बांधकाम विभागास तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले आहेत. तरीसुद्धा नागरिक व कर्मचाऱ्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना कायम आहे.
तहसील कार्यालय म्हणजे जनतेच्या आशा-अपेक्षांचे केंद्र. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येकाच्या सुरक्षिततेची व त्यांच्या कामकाजाची काळजी घेणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित राहण्यासाठी त्वरित ठोस उपाययोजना व्हावी, अशी एकमुखाने मागणी होत आहे.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






