स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
पाथरी 11 ऑगस्ट – पवित्र श्रावण महिन्याच्या निमित्ताने भक्तीभावाने निघालेली पायी कावड यात्रा आज पहाटे भीषण अपघातात सापडून शोकांतिका ठरली. टाटा झेस्ट कार (MH-03 CH-1211) भाविकांच्या गर्दीत घुसल्याने दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कपिल वैजनाथ पडवळ (रा. मठ गल्ली, सेलू) यांच्या नेतृत्वाखालील 25 ते 30 भाविकांची कावड यात्रा रविवारी (10 ऑगस्ट) रामपुरी (ता. पाथरी) येथे पोहोचली होती. सोमवारी (11 ऑगस्ट) पहाटे साडेपाचच्या सुमारास गोदावरी नदीचे पवित्र जल घेऊन भक्तिगीतांच्या तालावर, जल्लोषात पायी सेलूकडे परतत असताना ही दुर्घटना घडली.पाथरी शहराजवळील
देवनांद्र शिवारातील तुळजाई रोपवाटिकेजवळ व खेडुळा फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्ग 548-ब वर यात्रेसोबत असलेल्या स्विफ्ट डिझायर गाडीच्या पुढे आलेली टाटा झेस्ट कार अज्ञात वाहनाला धडकून नियंत्रण सुटली आणि थेट भाविकांवर आदळली. अपघात एवढा भीषण होता की, ऋषिकेश सुरेशराव अंभोरे (वय 16, रा. दत्तनगर, सेलू) आणि एकनाथ गंगाधरराव गजमल (वय 50, रा. डासाळा, सेलू) यांचा जागीच मृत्यू झाला. ऋषिकेश हा दहावीचा विद्यार्थी असून काल रात्रीपासून यात्रेत सहभागी होता.
अपघातात आणखी तीन भाविक गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने सेलू ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी परभणी येथे रेफर करण्यात आले. अपघातानंतर कारमधील प्रवासी घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलीस ठाण्याचे सपोनि सोमनाथ नरके, सपोनि शिवसांभा स्वामी, पोह. विष्णू वाघ, पोह. परमेश्वर थोरे व पोना सुरेश कदम घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी दीपककुमार वाघमारे व पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांनी घटनास्थळ व रुग्णालयाला भेट देऊन तपासाची पाहणी केली. मृतदेहांचे शवविच्छेदन पाथरी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले असून पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या अपघातानंतर पायी यात्रा तत्काळ स्थगित करण्यात आली. मात्र, भाविकांनी संकल्प खंडित न करता वाहनाने जाऊन गोदावरीचे जल मठ गल्ली शिवलिंग मंदिरात अर्पण करून यात्रेचा विधिवत समारोप केला.
श्रावण महिन्याच्या धार्मिक उत्साहात आलेली ही काळी सावली, भक्तांच्या डोळ्यांत अश्रू आणि मनात हळहळ घेऊन गेली आहे.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






