स्वराज्य वार्ता प्रतिनिधीअहमद अन्सारी
पाथरीचे माजी आमदार आणि परभणी जिल्ह्याचे जेष्ठ नेते बाबाजानी दुर्राणी आज ७ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता मुंबई येथील टिळक भवनात काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश करीत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विविध मान्यवर नेते आणि जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार असून, या प्रवेशामुळे जिल्ह्याच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
प्रवेशाविषयी बोलताना दुर्राणी म्हणतात, “या पक्षप्रवेशामागे कोणतीही पदाची अपेक्षा नाही, कोणतीही अट नाही – धर्मनिरपेक्षतेच्या व्रतासाठीच हा निर्णय घेतला आहे.”
त्यांनी भाजपवर सडकून टीका करत सांगितले की, “आज देशात भाजपकडून प्रादेशिक पक्ष फोडण्याचा खेळ सुरु आहे. शिवसेना, राष्ट्रवादी यांचे तुकडे पाडले गेले. आज स्वतःला सेक्युलर म्हणवणारे अनेक पक्ष सत्तेसाठी भाजपच्या मांडीला मांडी लावत आहेत. अशा काळात काँग्रेस हाच एकमेव पक्ष आहे जो ठामपणे विरोधात उभा आहे.”
दुर्राणी हे फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांशी निष्ठावान राहिलेले नेते मानले जातात. पाथरी नगरपरिषदेवर त्यांनी दीर्घकाळ सत्ता टिकवली आहे. त्यांच्या कार्यकाळात गोदावरी नदीवरील बंधाऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सिंचन सुविधा निर्माण झाली, तर मंदिरांचा विकास, रस्ते, वीज, पाणी यासारख्या मूलभूत गरजांसाठीही मोठे कार्य झाले.
आज त्यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे दलित, मुस्लिम, मराठा, ओबीसी व अल्पसंख्याक समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रवेशामुळे परभणी जिल्ह्यातील आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये काँग्रेसला निश्चितच बळ मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
कॉलममध्ये:-
– बाबाजानी दुर्राणी यांचा काँग्रेसमध्ये आज प्रवेश,
– कोणतीही पदाची अपेक्षा नाही, विचारांशी निष्ठा हीच भूमिका,
– भाजपवर प्रखर टीका – फोडाफोडीच्या राजकारणावर निशाणा,
– जिल्ह्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






