स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
पाथरी शहरालगत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ वर मंगळवार, २२ जुलै रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेली दुचाकी थेट समोरून येणाऱ्या एस.टी. बसच्या खाली गेल्याने दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने पाथरी शहरात आणि इंदिरानगर परिसरात शोककळा पसरली आहे.
अपघातात मृत्यूमुखी पडलेले लतिफ अहमद पठाण (वय ५६) आणि शेख अनवर शेख नूर (वय ३९), दोघेही रा. इंदिरानगर, पाथरी हे मामा-भाचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पाथरी आगाराची एस.टी. बस (क्र. एमएच ०६ एस ८७९०) सोनपेठकडे निघाली होती. यावेळी परिसरात पाऊस सुरू होता. दरम्यान, विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणारी दुचाकी (क्र. एमएच २२ एके १५८३) थेट समोरासमोर भिषण धडक झाली. धडकेनंतर दुचाकी थेट बसखाली अडकली तर दोघांचे मृतदेह रस्त्याच्या कडेला दूर फेकले गेले. धडक इतकी जबरदस्त होती की बस रस्ता सोडून थेट बाजूला घसरून गेली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश लांडगे, पोलीस नाईक सुरेश कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात मृत्यू झालेल्या दोघांचे मृतदेह पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात होत व शवविच्छेदनानंतर कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
या अपघातात बसमधील कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही, याचे श्रेय प्रसंगावधान राखून बस थांबवणाऱ्या चालकाला जाते. मात्र, अपघाताने मामा-भाच्याचा एकाच वेळी झालेला मृत्यू हा कुटुंबीयांसाठी आणि इंदिरानगर परिसरासाठी मोठा धक्का ठरला आहे. परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






