स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
पाथरी शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा (मराठी माध्यम) शाखेच्या प्रांगणात यावर्षीच्या पहिल्याच मुसळधार पावसाने अक्षरशः तलावाचे रूप धारण केले आहे. साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शैक्षणिक प्रगती यांवर याचे गंभीर परिणाम होत आहेत.
दिनांक 17 जुलै रोजी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे शाळेच्या मुख्य प्रवेशमार्गाजवळील संपूर्ण मैदानात पाणी साचले आहे. परिणामी, शाळेत येताना विद्यार्थ्यांना चिखल आणि पाण्यातून वाट काढावी लागत आहे. काही विद्यार्थ्यांचे पाण्यात घसरून अपघात होण्याचे प्रकार घडले असून, अनेकांचा गणवेश खराब झाल्यामुळे पालक शाळेकडे पाठवण्यास घाबरत आहेत.
शाळेच्या प्रांगणात साचलेले पाणी काही दिवसांपासून साचत असल्याने परिसरात दुर्गंधी, कचरा व डासांचा त्रास वाढला आहे. त्यामुळे मलेरिया, डेंग्यू यांसारख्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. परिसरात साप, विचू यांसारख्या प्राण्यांचा वावर दिसून आल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे, हेच मैदान अनेकदा मोठ्या राजकीय नेत्यांच्या जाहीर सभा, शासकीय कार्यक्रमांसाठी वापरले जाते. शेजारीच गटशिक्षणाधिकारी कार्यालय, पीएम श्री दर्जाची उर्दू माध्यम शाळा असूनही मराठी शाळेच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे डोळे झाकले गेले आहेत, अशी टिका पालक व शिक्षण प्रेमी नागरिकांकडून होत आहे.
या गंभीर परिस्थितीमुळे पालक आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून, सामाजिक कार्यकर्ते मुस्तफा अन्सारी यांनी गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा पालक व विद्यार्थी यांच्यासह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल आवटे ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!







