स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
पाथरगव्हाण बु. तालुका पाथरी जिल्हा परभणी शिवारातील घटना
शेतातील विद्युत पोलवर उतरलेल्या करंटमुळे एका शेतकऱ्याचा आणि त्याच्या दोन बैलांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण बु. शिवारात घडली. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून मृत शेतकऱ्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.मृत शेतकरी प्रल्हाद गोपाळराव घांडगे (वय 42) हे आपल्या शेतात कापसाला औतपाळी देत असताना, शेतातील लोखंडी विद्युत पोलच्या तारेत आलेल्या करंटच्या संपर्कात आले. त्याचवेळी त्यांचे दोन महागडे बैलही तारेच्या संपर्कात आल्याने तिन्ही जीव जागीच संपले.मिळालेल्या माहितीनुसार, प्रल्हाद घांडगे हे सकाळी ९ वाजल्यापासून आपल्या कापसाच्या शेतात औतपाळी चालवत होते. सकाळी 10 वाजेच्या सुमारास त्यांच्या चुलत भावाने – विकास गोपाळराव घांडगे यांनी फोनवरून कळवले की शेतातील लोखंडी विद्युत पोलच्या तारेत करंट उतरलेला असून, त्याचा करंट लागून प्रल्हाद आणि त्यांचे दोन बैल जमिनीवर पडले आहेत.विकास घांडगे यांनी तात्काळ लाईनमनला संपर्क साधून वीज बंद करण्याचा प्रयत्न केला. गावातील तुकाराम घांडगे, रखमाजी घांडगे व इतर ग्रामस्थांसह ते घटनास्थळी पोहोचले असता, शेतात एका लोखंडी पोलजवळ मृतावस्थेत दोन लाल रंगाचे बैल पडलेले दिसले. प्रल्हाद घांडगे जमिनीवर अर्धमेला अवस्थेत होते, त्यांच्या हातात व पोटावर थोडी हालचाल जाणवत होती.गावातील जीप बोलावून त्यांना तात्काळ पाथरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे त्यांचे कुटुंब, नातेवाईक व संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.या दुर्दैवी घटनेत अंदाजे ₹1.25 लाख किंमतीचे दोन बैलही मृत्युमुखी पडल्याने मोठ्या आर्थिक नुकसानीचा डोंगर कोसळला आहे. ही घटना महावितरणच्या निष्काळजीपणामुळे घडली का?, असा प्रश्न ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.घटनेची नोंद पाथरी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून, पोलीस हवालदार राम नामदेव हातागळे यांनी पंचनामा केला आहे. तपास पोलीस निरीक्षक महेश बाळासाहेब लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






