स्वराज्य वार्ता हनुमंत दवंडे
परतुर प्रतिनिधी :- इतिहासाचे सिंहावलोकन केल्यास, ज्यांनी ज्यांनी निश्चय केला आणि त्या दिशेने मार्गक्रमण केले ते सर्व आपापल्या क्षेत्रात यशस्वी झालेले आहेत.त्यामुळे केलेल्या निश्चयात सातत्य ठेवून काम केल्यास यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक शिवश्री डॉ. बालाजी जाधव यांनी केले.
येथील मराठा सेवा संघाच्या वतीने मराठा क्रांती भवन मध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावी, नीट जेईई तसेच विविध स्पर्धात्मक परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा घेण्यात आला, प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष शिवश्री धनंजय पाटील,मराठा सेवा संघ जिल्हा अध्यक्ष शिवश्री संतोष मिसाळ, गटविकास अधिकारी शिवश्री राजेश तांगडे, शास्त्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत खंदारे,शिवश्री ज्ञानदेव नवल, सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. भगवान दिरंगे,डॉ. चैतन्य डाके, शिवश्री आसाराम भिसे, शिवश्री नीताताई कदम आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. जाधव म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराज एका दिवसात छत्रपती झाले नाही. त्यासाठी त्यांना खूप मोठा संघर्ष करावा लागला. त्यातूनच रयतेचे स्वराज्य निर्माण झाले, हा इतिहास आहे . मॉ. जिजाऊंना स्वराज्याचे डोहाळे लागले होते, ते छत्रपतींनी पूर्णत्वाला नेले. त्यामुळे मुलांकडे शिक्षकासोबत आई-वडिलांचे लक्ष असणे किती महत्त्वाचे आहे हे यावरून सिद्ध होते. गुणवंत विद्यार्थ्यांनीही आपापल्या क्षेत्रात काम करून पाठीमागे राहिलेल्या समाज बांधवांना पुढे आणण्यासाठी काम करण्याची अपेक्षा त्यांनी शेवटी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रा. संभाजी तिडके यांनी केले. संचलन प्रा. पांडुरंग नवल व कैलास शेळके यांनी केले. आभार सरपंच राजेभाऊ जगताप यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, सेवा संघाचे पदाधिकारी तसेच शहरातील समाजबांधव यांची उपस्थिती लक्षणीय होती.
………………………………………………………………….
गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना प्रेरणा देणे महत्त्वाचे असते. यातून त्यांना अधिकचे काम करण्यासाठी बळ मिळते. ते बळ देण्याचे काम येथील मराठा सेवा संघ मागील अनेक वर्षापासून करतोय ही अभिमानाची गोष्ट आहे.
प्राचार्य डॉ.भारत खंदारे

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!