स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी
जल व्यवस्थापन कृती पंधरवडा कार्यक्रमाचे उद्घाटन आज जिल्हा नियोजन सभागृहात पार पडले. हा पंधरवडा दि.१५ ते ३० एप्रिल दरम्यान राबविण्यात येणार आहे. पाण्याचे महत्त्व ओळखून पाणी वापराचे नियोजन आणि बचत यासाठी जाणीव जागृती करणे आवश्यक आहे. जल व्यवस्थापन कृती कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. लोकांमध्ये जाऊन पाणी वापराचे नियोजन आणि बचत यासाठी जाणीव जागृती करणे आवश्यक आहे. सर्वसामान्य नागरिकांनी पुढाकार घेऊन जल व्यवस्थापन कृती आराखड्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले. पाणी हे विविध विभागांशी संबंधित असल्याने सर्वांनी एकत्रित येऊन सहभागातून कामे करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
जलसंपदा विभागाच्यावतीने आयोजित या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, अधीक्षक अभियंता श्री. चिशती, कार्यकारी अभियंता प्रसाद लांब, श्री. गरूड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. चव्हाण, मुंबई विद्यापीठाचे डॉ. गणेश बडे, यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी, कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व जलपूजन करण्यात आले. उपस्थितांना जलबचत प्रतिज्ञा देण्यात आली.
यावेळी डॉ. काळे यांनी आपल्या मनोगतात पाण्याचे महत्त्व विषद करून जलव्यवस्थापन कृती पंधरवडाची उत्तम प्रकारे अंमलबजावणी करण्याची सूचना केली. पाणी व्यवस्थापन, शासनाच्या ताब्यात असलेल्या जमिनीची 7/12 वर जलसंपदा विभाग यांचे नावे नोंदी घेण्याबाबत व प्रलंबित भुसंपादनाबाबत सुचना केल्या. तसेच पाणी वापर संस्था यांची प्रभावी अंमलबजावणी या बाबत मार्गदर्शन केले.
महापालिका आयुक्त श्री. जाधव यांनी पाणी वापर काटकसरीने करने व त्यानुसार पाणीवापराचे दर कमी करण्याची मागणी केली. जिल्हा कृषी अधिकारी श्री. चव्हाण यांनी प्रत्येक पिकांना, जनावरांना आवश्यक असलेल्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करुन पाण्याची गरज भागविण्या संदर्भात सांगितले.
पंधरा दिवसांची रूपरेषेचे विस्तृत माहिती पालक अभियंता श्री. इ. म. चिश्ती, अधीक्षक अभियंता यांनी दिली. जलसंपदा विभाग परभणी जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील प्रमुख नद्या व त्यावरील प्रकल्प, सिंचन, कालवे, जिल्ह्याचे एकुण क्षेत्रफळ, लागवडी लायक क्षेत्र, प्रकल्पीय सिंचन क्षमता, निर्मित सिंचन क्षमता, प्रकल्पीय पाणीसाठा, प्रमुख पिके, पुर्ण झालेली प्रकल्प, बांधकामाधीन प्रकल्पांचा तपशील व या कार्यक्रमांतर्गत दिनांक 15/04/2025 ते 30/04/2025 पर्यंत राबविण्यात येणा-या कार्यक्रमाची विस्तृत माहिती दिली.
कार्यकारी अभियंता प्रसाद लांब यांनी परभणी जिल्ह्यातील शेतक-यांना कालव्याद्वारे पाणी वाटपाबाबत व भूसंपादना बाबत येणा-या अडचणीकडे लक्ष वेधुन त्या बाबत करता येणा-या उपाययोजना बाबत माहिती दिली. उपअभियंता, राहुल तीडके यांनी आभार मानले.
डॉ. बडे यांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करुन कार्यक्रमाची ठळक रुपरेषा मांडली व कार्यकारी अभियंता श्री. आर.पी. गरुड साहेब यांनी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा परिचय करुन देवुन परभणी जिल्ह्यातील संबंधीत सर्व विभागास राबविण्यात येणा-या ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमजबजावणी करण्याकरिता सर्वांना अवाहन केले.
असा आहे जलव्यवस्थापन कृती पंधरवडा
दि.१५ एप्रिल- पंधरवडा प्रारंभ, दि.१६- जलसंपदा अधिकारी- कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण व ई- ऑफिस प्रणाली कार्यान्वयन, दि.१७- स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, जलपुनर्भरण, दि.१८- शेतकरी – पाणीवापर संस्था यांच्याशी संवाद, दि.१९- भूसंपादन, पुनर्वसन इ. अडचणींचे निराकरण व संयुक्त कालवा पाहणी, दि.२०- कालवा स्वच्छता अभियान, दि.२१ एप्रिल- उपसा सिंचन पाणी वापर तक्रारी निरसन, दि.२२- अनधिकृत पाणी वापर (वाणीज्य व औद्योगिक) प्रकरणे शोध मोहिम, दि.२३- पीक पद्धत, उत्पादकता वाढ, पाण्याचे नियोजन इ. बाबत कृषी विभाग, जलसंपदा विभाग संयुक्त मार्गदर्शन, दि.२२४- सिंचन-ई प्रणाली, पाणी दर, पाणीपट्टी आकारणी प्रकरणांचा आढावा, दि.२५- विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, सेवाभावी संस्था यांच्या समवेत संवाद व कृती कार्यक्रम, दि.२६- पाण्याचा पुनर्वापर न करता धरणात, नदीत सांडपाणी सोडण्यात येत असलेल्या प्रकरणांचा शोध घेणे, दि.२७- आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन, दि.२८- महसूल विभागाच्या समन्वयाने महामंडळाच्या संपादित जमिनीवरील अतिक्रमण निष्कासन कारवाई, दि.२९ पाणवापर संस्था सक्षमीकरण कार्यशाळा, दि.३० एप्रिल रोजी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत समारोप सोहळा.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!