गुरु अर्जन देव (जन्म :१५ एप्रिल १५६३, मृत्यू: ३० मे १६०६)
“श्रद्धा, सेवा आणि समर्पण यांचा संगम म्हणजे शीख गुरु अर्जन देव यांचे जीवन. शांततेचा मार्ग दाखवणारे, सत्यासाठी बलिदान देणारे आणि गुरुवाणीच्या माध्यमातून संपूर्ण मानवजातीसाठी आध्यात्मिक प्रकाशाचे दार उघडणारे ते पाचवे शीख गुरु होते. शीख धर्माच्या इतिहासात गुरु अर्जन देव यांचे स्थान अत्यंत तेजस्वी आणि प्रेरणादायी आहे.
गुरु अर्जन देव यांचा जन्म १५ एप्रिल १५६३ रोजी झाला. त्यांच्या घराण्याचा आध्यात्मिक वारसाच विलक्षण होता. वडील गुरु रामदास, चौथे शीख गुरु आणि आजोबा गुरु अमरदास, तिसरे शीख गुरु. अशा पवित्र वातावरणात त्यांचं बालपण गुरु अमरदास यांच्या देखरेखीखाली गेले. लहान वयातच त्यांनी गुरुमुखीचं शिक्षण घेतलं आणि आध्यात्मिकतेच्या मार्गावर पहिले पाऊल टाकलं.
गुरु अर्जन देव यांनी केवळ धर्मोपदेशक म्हणून नव्हे तर एक समाजसुधारक आणि स्थापत्यदृष्ट्याही एक महान व्यक्तिमत्व म्हणून काम केलं.
त्यांनीच अमृतसरमधील हरमंदिर साहिब (सुवर्ण मंदिर) या विश्वप्रसिद्ध गुरुद्वाऱ्याची पायाभरणी केली. असे म्हणतात की त्याच्या रचनेचा नकाशा त्यांनी स्वतः तयार केला होता. हे एक मंदिर जे सर्व दिशांनी उघडं आहे, सर्व धर्मांच्या लोकांसाठी खुलं आहे समतेचं आणि प्रेमाचं प्रतीक आहे.
गुरु अर्जन देव यांचं सर्वांत मोठं योगदान म्हणजे आदि ग्रंथ – ज्यामध्ये त्यांनी विविध संतांच्या वाण्या एकत्र करून आध्यात्मिकतेचा एक गूढ झरा तयार केला. पुढे हा ग्रंथ गुरु ग्रंथ साहिब म्हणून सिख धर्माचा स्थायी गुरु झाला. या ग्रंथातून त्यांनी एकतेचा, सहिष्णुतेचा आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला.
१६०५ मध्ये मुघल सम्राट अकबरच्या मृत्यूनंतर जहांगीर सत्तेवर आला. राजकारण आणि धार्मिक मतभेदांच्या पार्श्वभूमीवर, गुरु अर्जन देव यांच्यावर बंडखोर राजकुमार खुसरोला आश्रय दिल्याचा आरोप ठेवण्यात आला. त्यांनी खरोखरच खुसरोलाही आपल्या घरी थांबण्याची जागा दिली, पण त्यामागे कोणतीही राजकीय हेतू नव्हते – ही होती मानवतेची सेवा.
जहांगीरने याला धर्मविरोधी कृत्य मानून त्यांना अटक केली. त्यांचा पाच दिवस भीषण छळ केला गेला. उकळत्या पाण्यात बसवणं, अंगावर गरम वाळू टाकणं पण त्यांनी शांतपणे सर्व काही सहन केलं. त्यांनी एकही क्षणी अन्यायासमोर झुकण्याचा विचार केला नाही. शेवटी, ३० मे १६०६ (दिनदर्शिकेप्रमाणे १० जून) रोजी ते शहिद झाले.
त्यांच्या स्मृतीत रावी नदीच्या काठावर लाहोरमध्ये गुरुद्वारा डेरा साहिब उभारण्यात आला, जो आज पाकिस्तानमध्ये आहे.
गुरु अर्जन देव यांनी आपल्या शिकवणीतून अनेक मौल्यवान संदेश दिले, जे आजही जीवनाला दिशा देतात:
• “जे आपले चैतन्य खऱ्या गुरूवर केंद्रित करतात, ते परिपूर्ण होतात.”
• “चांगले कर्मच संशयाची भिंत तोडतात.”
• “मनःशांती हवी असेल तर आपल्या शब्दांप्रमाणेच कृती असावी.”
• “लोभ आणि अहंकार सोडल्याशिवाय आध्यात्मिक उन्नती शक्य नाही.”
गुरु अर्जन देव हे केवळ धार्मिक गुरु नव्हते, ते मानवतेचे महान सेनानी होते. त्यांचं संपूर्ण जीवन हे सेवा, समर्पण आणि सत्यासाठी झगडण्याचं प्रतीक होतं. त्यांच्या शिकवणी आपल्याला हे शिकवते की, सत्यासाठी लढा द्यायचा असेल, तर प्रेम, श्रद्धा आणि धैर्य यांचं शस्त्र हाती घ्यावं लागतं.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!