भारतीय चित्रपटसृष्टीचे आद्य प्रवर्तक: दादासाहेब तोरणे (जन्म :१३ एप्रिल १८९० – मृत्यू :१९ जानेवारी १९६०)
भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिले पाऊल टाकणारे आणि मराठी चित्रपटसृष्टीला नवा आयाम देणारे दादासाहेब तोरणे. भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घालणाऱ्या दादासाहेब फाळकें बरोबरच दादासाहेब तोरणे यांचे योगदान विसरता येणार नाही. चित्रपट निर्मितीच्या प्रारंभिक टप्प्यात त्यांनी केलेले प्रयोग आणि मेहनत आजही प्रेरणादायक ठरतात. दादासाहेब तोरणे, रामचंद्र गोपाल तोरणे म्हणून ओळखले जात. त्यांनी १९१२ साली ‘श्री पुंडलिक’ या चित्रपटाची निर्मिती केली. त्यावेळी चित्रपट कॅमेऱ्यात आवाज रेकॉर्ड करण्याची सुविधा नव्हती. त्यामुळे तोरणे, के.एन. कीर्तिकर आणि त्यांचे सहकारी नाडकर्णी यांनी मिळून संवादविरहित चित्रणकथा (शूटिंग स्क्रिप्ट) तयार केली. मुंबईच्या गिरगावातील लॅमिंग्टन रोड, त्रिभुवन रोड आणि गिरगाव बॅक रोड या परिसरात कॅमेरामन जॉन्सन आणि टिपणीस यांच्या मदतीने ‘श्री पुंडलिक’चे शूटिंग पार पडले. या चित्रपटाची फिल्म लंडनला पाठवून डेव्हलप करून तिची प्रिंट परत मुंबईला आणली गेली. १८ मे १९१२ रोजी सँडहर्स्ट रोड येथील ‘कॉरोनेशन सिनेमॅटोग्राफ’ या मराठी व्यावसायिकांच्या मालकीच्या थिएटरमध्ये या चित्रपटाचे पहिले प्रदर्शन झाले. चित्रपटाने दोन आठवडे चांगलीच गर्दी खेचली आणि ‘टाइम्स ऑफ इंडिया’नेही त्याची दखल घेतली. ‘श्री पुंडलिक’ हा चित्रपट सेन्सॉर बोर्ड अस्तित्वात नसल्याने सरकारी नोंदीत पहिला भारतीय चित्रपट म्हणून नोंदवला गेला नाही. दादासाहेब तोरणे यांनी फक्त चित्रपट दिग्दर्शनावरच नव्हे, तर चित्रपट निर्मिती कंपनीचे व्यवस्थापन, तंत्रज्ञान, ध्वनिमुद्रण, वितरण व्यवस्था, आणि स्टुडिओ उभारणी या सर्व क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवला. त्यांनी ‘मुव्ही कॅमेरा कंपनी’ स्थापन करून हॉलिवूडहून ऑडिओकेमिक्स हे ध्वनिमुद्रण यंत्र मागवले. हे यंत्र १९३१ साली आर्देशिर इराणी यांच्या ‘आलमआरा’ या भारताच्या पहिल्या बोलपटासाठी वापरले गेले. दादासाहेबांनी १९३१ साली ‘सरस्वती सिनेटोन’ ही स्वतःची चित्रपट निर्मिती संस्था सुरू केली. १९३२ साली त्यांनी भालजी पेंढारकर दिग्दर्शित आणि नानासाहेब सरपोतदार संपादित ‘शामसुंदर’ हा मराठी व हिंदी भाषांतील बोलपट प्रदर्शित केला. मुंबईच्या ‘वेस्ट एण्ड’ (आताचा ‘नाझ’) थिएटरमध्ये हा चित्रपट तब्बल २७ आठवडे चालला आणि रौप्य महोत्सव साजरा करणारा पहिला भारतीय बोलपट ठरला. दादासाहेब तोरणे यांनी पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक आणि लोककथांवर आधारित २५ मूकपट आणि बोलपटांची निर्मिती केली. त्यांच्या अथक परिश्रमामुळे भारतीय चित्रपटसृष्टीला एक नवा चेहरा मिळाला. सिनेपत्रकार हनीफ शकूर यांनी १९५३ साली ‘स्क्रीन’ साठी दादासाहेबांकडून लेख लिहून घेतला. तसेच, शशिकांत किणीवर यांनी ‘भारतीय चित्रपटसृष्टीचे आद्य प्रवर्तक दादासाहेब तोरणे’ हे पुस्तक २००७ साली प्रकाशित केले. दादासाहेब तोरणे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रेरणादायी कार्यास आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या मोलाच्या योगदानास विनम्र अभिवादन!

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!