बैसाखी. (१४ एप्रिल)
भारतातील विविधतेने नटलेले सण केवळ उत्सव नसून, ते आपल्या परंपरा, संस्कृती आणि भावनांचा संगम असतात. त्यापैकीच एक विशेष सण म्हणजे बैसाखी!
पंजाबसह संपूर्ण उत्तर भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा एक आनंदाचा दिवस म्हणजे बैसाखी.
नवीन पीक घरी आल्याच्या आनंदात, हा सण उत्तर भारतातील दिल्ली, पंजाब, हरियाणा इत्यादी सर्व राज्यांत थाटामाटात साजरा केला जातो. बैसाखी हा सण पिकांबद्दल कृतज्ञतेची भावना दर्शवितो, लोकांमध्ये समुदायाची आणि इतरांना आनंदात सहभागी करून घेण्याची भावना निर्माण करतो. श्रमाच्या फळांचा आनंद घेण्याचा, ढोलाच्या तालावर नाचण्याचा आणि भव्य पारंपारिक पदार्थांचा आस्वाद घेण्याचा हा सण आहे. ज्याप्रमाणे आपण मराठी नववर्ष गुढीपाडव्याला साजरा करतो त्याप्रमाणे पंजाबी नववर्ष हे बैसाखी पासून सुरू होते. हा दिवस कृषी महोत्सव म्हणून देखील महत्त्वाचा आहे, कारण याच दिवशी रब्बी पिकांची कापणी पूर्ण होते आणि शेतकऱ्यांसाठी नवे आर्थिक वर्ष सुरू होते.
जर बैसाखीचा इतिहास पहिला तर चांगल्या पिकांव्यतिरिक्त, बैसाखी सण साजरा करण्यामागील मुख्य कारण म्हणजे या दिवशी, दहावे आणि शेवटचे शीख गुरु गोविंद सिंग यांनी १६९९ मध्ये खालसा पंथाची स्थापना केली. याशिवाय, बैसाखीच्या दिवशी महाराजा रणजित सिंग यांना शीख साम्राज्याची सूत्रे देण्यात आली. ज्यांनी एकसंध राज्य स्थापन केले.
पंजाबमध्ये बैसाखीची धामधूम काही औरच असते. गुरुद्वारांमध्ये कीर्तन, लंगर (मोफत अन्नदान), प्रार्थना आणि कडाह प्रसाद वाटप होते. शेतकरी आनंदाने भरलेल्या नृत्य-गाण्यांच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेतात. पारंपरिक भांगडा आणि गिद्दा नृत्य उत्सवाला रंगत आणतात.
आज बैसाखी केवळ पंजाबपुरती मर्यादित राहिलेली नाही. भारतासह जगभरातील शीख समुदाय मोठ्या जल्लोषात हा दिवस साजरा करतात. विविध ठिकाणी पंजाबी मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपरिक जेवणाचे आयोजन होते.
हा दिवस वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो जसे की बंगालमध्ये नब वर्षा, केरळमध्ये पूरम विशु, आसाममध्ये लोक हा सण बिहू या नावाने साजरा करतात.
बैसाखी हा केवळ एक सण नाही, तर नव्या सुरुवातीचा संदेश आहे. हा दिवस आपल्याला मेहनतीचे फळ मिळते याची जाणीव करून देतो आणि भविष्यात अधिक जोमाने पुढे जाण्याची प्रेरणा देतो.
चला, आपणही या शुभदिनी सकारात्मक ऊर्जा आणि आनंदाने भारून जाऊ या!
बैसाखीच्या हार्दिक शुभेच्छा!

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!