प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी
परभणी, दि. 13/04/2025=भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त राज्यभर “जयभीम पदयात्रा”चे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या श्रम व रोजगार आणि युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या निर्देशानुसार परभणी येथेही जिल्हाधिकारी कार्यालय, समाज कल्याण विभाग, महानगरपालिका, नेहरू युवा केंद्र आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साही वातावरणात ही पदयात्रा आज पार पडली. दि. 13 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7.30 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, परभणी येथून पदयात्रेला सुरुवात झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून परभणी महानगरपालिकेचे आयुक्त धैर्यशील जाधव, समाज कल्याण अधिकारी गीता गुट्टे, आरोग्य विभाग प्रमुख कल्पना सावंत, आणि जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे उपस्थित होते.
पदयात्रेच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. उपस्थित मान्यवरांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत पुस्तके भेट देण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वसतीगृहातील विद्यार्थिनींनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतात डॉ. आंबेडकरांच्या कार्याचा व शिक्षणावरील श्रद्धेचा उल्लेख केला. स्त्रीसक्षमीकरणाच्या दृष्टीने त्यांनी केलेल्या कार्याला उजाळा दिला आणि उपस्थितांना प्रेरणा दिली. सूत्रसंचालन कपिल देशमुख यांनी केले.
हिरवा झेंडा दाखवून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. ही पदयात्रा महात्मा फुले पुतळा, शाही मशीद, ग्रँड कॉर्नर, जनता मार्केट, शिवाजी चौक, गांधी पार्क, अष्टभुजा देवी मंदिर, विसावा कॉर्नर मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा येथे समाप्त झाली. यावेळी सहभागी विद्यार्थ्यांना व खेळाडूंना बिस्किटांचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या पदयात्रेत विविध शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी, क्रीडा क्षेत्रातील खेळाडू आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नेहरू युवा केंद्राचे गौतम ढगे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील सुयश नाटकर, रोहन औढेंकर, कल्याण पोळे, रमेश खुणे, सुशील देशमुख,धनंजय बनसोडे, उन्मेष गाडेकर, मंगेश इंगळे तसेच प्रकाश पंडित, धीरज नाईकवाडे, योगेश आदमे, भागवत दुधारे, चेतन मुक्तावार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!