प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी
परभणी, दि. 11/04/2025. पालकमंत्री टास्क फोर्स आणि जनता दरबारातील नागरिकांनी केलेल्या तक्रारींच्या अर्जाचा आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुंटूंब कल्याण राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, महानगरपालिका आयुक्त धैर्यशिल जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संगीता चव्हाण उपस्थित होते.
पालकमंत्री टास्क फोर्स माध्यमातून प्रत्येक अधिकाऱ्यांना “एक गाव दत्तक” या उपक्रमाच्या माध्यमातून 93 अधिकाऱ्यांना गावे दत्तक देण्यात आली आहेत. एका वर्षात ही 93 गावे आदर्श गाव करण्याचे आपले लक्ष असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या उपक्रमाअंतर्गत गावांना भेटी दिलेल्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. तसेच याअंतर्गत गावात येत असलेल्या अडचणीबाबत तालुकास्तरावर एक बैठक घेण्याचीही सूचना त्यांनी केली. अधिकाऱ्यांनी भेटी दिलेल्या गावातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या जनता दरबारामध्ये आलेल्या अर्जांच्या कार्यवाहीबाबत पालकमंत्री यांनी यावेळी आढावा घेतला. जनता दरबारामध्ये एकूण 887 अर्ज करण्यात आले होते. त्यापैकी 421 अर्ज निकाली काढण्यात आले असून, उर्वरित अर्जांवर कार्यवाही चालू असल्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी यावेळी सांगितले.
जनता दरबारातील उर्वरित अर्जावर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी यावेळी उपस्थित विभाग प्रमुखांना दिल्या. पुढील जनता दरबारापर्यंत एकही अर्ज प्रलंबित राहणार नाही, अशा सूचना त्यांनी यावेळी दिली. जनता दरबारातील अर्जांबाबत स्वत: अधिकारी यांनी लक्ष घालून अर्ज निकाली काढावा. जनता दरबारात जास्त अर्ज शेत रस्त्यांचे येत असून हे अर्ज या महिन्याअखेर निकाली काढण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. अत्याधुनिक नवीन अग्निशमन वाहनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आर्य पंप्स कंपनीने तयार करुन दिलेल्या मिनी रेक्यू टेंडर अग्निशमन वाहन जिल्ह्यात परभणी शहर महानगरपालिका, नगरपरिषद गंगाखेड, सेलू आणि जिंतूर यासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे 4 वाहने प्राप्त झाली आहेत. या वाहनाचे पालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!