भेसळ रोखण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे ; टोल-फ्री क्रमांक जाहीर
स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी
परभणी, दि. 26 /03/2025. जिल्ह्यात दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ व गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक आज समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आगामी गुढीपाडवा आणि रमजान ईद सणांच्या पार्श्वभूमीवर या पदार्थांची मागणी वाढत असल्याने जिल्हाभर विशेष तपासणीसाठी धडक मोहिम राबवण्याचे निर्देश डॉ. काळे यांनी यावेळी दिले. या मोहिमेतंर्गत दूध, दुग्धजन्य पदार्थ तसेच मिठाई विक्रेत्यांची तपासणी करून नमुने घेण्याचा निर्णय झाला आहे. विशेषतः चीज अनॉलॉग या पनीर सदृष्य पदार्थांची विक्री पनीर म्हणून करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले. अशा विक्रेत्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केलेल्या निवेदनाप्रमाणे मोक्का कायदा अंतर्गत कारवाई होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. जिल्ह्यातील दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रेत्यांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे. शासनाच्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमातंर्गत नागरिकांना स्वच्छ, निर्भेळ व गुणवत्तापूर्ण दूध व दुग्धजन्य पदार्थ मिळावेत, यासाठी विशेष उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. दूध व दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय गठित दूध भेसळ प्रतिबंधक समितीमार्फत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात भेसळ रोखण्यासाठी दूध उत्पादक, संकलन केंद्रे व वितरक यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. मोहिमेअंतर्गत उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर विकल्या जाणाऱ्या लस्सी, आईस्क्रीम यांसारख्या पदार्थांची तपासणी होणार असून, भेसळ आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तक्रार करण्यासाठी टोल-फ्री क्रमांक उपलब्ध दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ आढळल्यास नागरिकांनी 9923689168/9049518711 या टोल-फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे. प्राप्त तक्रारींवर त्वरित कारवाई केली जाईल, तसेच दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!