कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे

कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे (जन्म :३ सप्टेंबर १९२३ – मृत्यू :२० मार्च २०१५)
लोककला ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील एक महत्त्वाची ओळख आहे आणि या परंपरेला आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करणाऱ्या कलाकारांमध्ये कृष्णराव गणपतराव साबळे (कृष्णाजी साबळे) यांचे नाव आदराने घेतले जाते. तमाशा, लोकनाट्य आणि लावणी या कलांना त्यांनी नवसंजीवनी दिली. त्यांच्या अमूल्य योगदानामुळे मराठी लोककला अधिक समृद्ध झाली.
महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीला जिवंत ठेवणारे, शाहिरीच्या माध्यमातून सामाजिक अन्यायावर प्रहार करणारे आणि रसिकांच्या मनात महाराष्ट्रभक्तीचे वारे पसरवणारे ‘महाराष्ट्रशाहीर’ कृष्णराव गणपतराव साबळे अर्थात शाहीर साबळे यांचा जन्म ३ सप्टेंबर १९२३ रोजी सातारा जिल्ह्यातील पसरणी गावात झाला. त्यांना गायनाचा वारसा घरातूनच मिळाला होता. मात्र, केवळ गायनापुरते ते थांबले नाहीत. शाहिरी, ढोलकीवादन, नाटक, संगीत आणि गीतलेखन अशा विविध क्षेत्रांत त्यांनी आपली कला फुलवली. साने गुरुजींच्या सहवासात आल्यावर त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन ते स्वातंत्र्य चळवळीतही सक्रीय सहभागी झाले.
साबळे यांनी केवळ मनोरंजनासाठी नाही, तर समाजजागृतीसाठी शाहिरीला एक प्रभावी शस्त्र बनवले. ‘जागृती शाहीर मंडळ’ स्थापून त्यांनी महाराष्ट्रभर शाहिरीचे वारे पसरवले. तब्बल १३ मुक्तनाट्यांच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र खडबडून जागा केला. दारुबंदी, सामाजिक समता, शेतकऱ्यांचे दुःख, महाराष्ट्र एकीकरण चळवळ यांसारख्या विषयांवर त्यांनी आपल्या शाहिरीतून ठोस भूमिका मांडली. शिवसेनेच्या स्थापनेच्या काळात त्यांच्या ‘आंधळं दळतंय’ या प्रहसनाने मोठी भूमिका बजावली.
शाहीर साबळे यांचा सर्वात मोठा ठेवा म्हणजे ‘महाराष्ट्र लोकधारा’ हा कार्यक्रम. अभंग, लावणी, वाघ्या-मुरळी, भारूड, कोळीगीत अशा अस्सल मराठमोळ्या लोककला सादर करणारा हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय ठरला. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा हा जिवंत दस्तऐवज घराघरांत पोहोचवण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला.
साबळे यांना त्यांच्या कलेबद्दल असंख्य पुरस्कार मिळाले. ‘पद्मश्री’ हा राष्ट्रीय सन्मान मिळवणारे ते पहिले शाहीर होते आणि अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणारेही ते पहिलेच शाहीर. शाहीर अमर शेख पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, तसेच रशियाच्या सांस्कृतिक दौऱ्यात भारतीय शांतिदूत मंडळाचे प्रतिनिधित्व करण्याचा मानही त्यांना मिळाला.
शाहीर साबळे यांचा शाहिरीचा आणि लोककलेचा वारसा त्यांचा मुलगा देवदत्त साबळे, मुलगी चारुशीला साबळे आणि प्रसिद्ध दिग्दर्शक नातू केदार शिंदे समर्थपणे पुढे नेत आहेत.
लोककलेचा हा तेजस्वी दीप मालवला असला तरी, त्यांच्या शाहिरीतून घुमणारा महाराष्ट्राचा जयघोष युगानुयुगे कायम राहील!
मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल