होलिका दहन
“सृष्टी बदलते, वृक्ष नव्या पालवीत न्हातात आणि आपणही जुन्या वाईट गोष्टी विसरून नव्या ऊर्जेने आयुष्य जगायला सज्ज होतो!”
फाल्गुन पौर्णिमेला साजरी होणारी होळी, हुताशनी पौर्णिमा किंवा शिमगा या नावाने ओळखली जाते. जुने विसरून नवीन गोष्टी स्वीकारण्याचा हा सण, निसर्गाच्या चक्राशी समरस होऊन आनंद साजरा करण्याचा दिवस!
या काळात निसर्गही नवा रंग धारण करतो. झाडे आपली जीर्ण पाने टाकून नव्या पालवीने नटतात, काही झाडांना तर मोहोरही आलेला असतो. जणू हा सृष्टीचाच नव्या आरंभाचा उत्सव असतो.
फाल्गुन पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या ५ ते ६ दिवसांत काही ठिकाणी दोन दिवस, तर काही ठिकाणी संपूर्ण पाच दिवस हा सण मोठ्या आनंदात साजरा होतो.
काही वर्षांपूर्वीपर्यंत होळी जवळ आली की घरोघरी शेणाच्या चाकोल्या तयार करण्याची लगबग सुरू व्हायची.
लहान मुले होळीच्या १५-२० दिवस आधी शेण गोळा करायची आणि त्यापासून गोलसर चाकोल्या बनवायची. या चाकोल्यांना मध्यभागी छिद्र करून वाळवले जायचे. पूर्ण वाळल्यानंतर त्या नारळाच्या दोरीत ओवून माळ तयार केली जायची. होळीच्या दिवशी आई, बहिणीसोबत ही चाकोल्यांची माळ होळीच्या अग्नित अर्पण केली जायची.
होलिका दहनाची पौराणिक कथा:
असुरराज हिरण्यकशपू हा परम अहंकारी होता. त्याने स्वतःला देव मानले होते आणि सर्वांनी त्याची पूजा करावी असे फर्मान सोडले. मात्र, त्याचा पुत्र प्रल्हाद हे भगवान विष्णूचे परम भक्त होते आणि त्यांनी वडिलांची ही आज्ञा मान्य नव्हती.
हिरण्यकशपूने प्रल्हादाला अनेक शिक्षा दिल्या, पण तो आपल्या भक्तीत अढळ राहिला. शेवटी, हिरण्यकशपूने होलिका हिला मदतीसाठी बोलावले.
होलिकेला असे वरदान होता की ती अग्नीमध्ये जळू शकत नाही. तिने प्रल्हादाला मांडीवर बसवून अग्नीमध्ये प्रवेश केला. मात्र, भगवंत विष्णूच्या कृपेने प्रल्हाद सुरक्षित राहिला आणि होलिका जळून भस्म झाली.
ही कथा आपल्याला सांगते की वाईट प्रवृत्ती कितीही शक्तिशाली असल्या तरी सत्य आणि भक्तीचा विजय हा अटळ असतो!
होलिका दहनाचे महत्त्व:
• वाईट विचारांचा नाश: होलिका दहनाने आपण आपल्या मनातील वाईट प्रवृत्ती आणि नकारात्मकता जाळून टाकण्याचा संकल्प करतो.
• सत्य आणि भक्तीचा विजय: हा सण आपल्याला शिकवतो की भक्ती, श्रद्धा आणि चांगुलपणाचा नेहमीच विजय होतो.
• ऋतू परिवर्तनाचा सण: होळीच्या आगमनाने थंडी कमी होते आणि उन्हाळ्याची सुरुवात होते.
• सामाजिक ऐक्य: होळी हा एक एकता आणि प्रेमाचा सण आहे, जो भेदभाव विसरून एकत्र येण्याचा संदेश देतो.
• आरोग्यदायी दृष्टिकोन: होलिका दहनामुळे हवेतील हानिकारक जंतू नष्ट होतात आणि पर्यावरण शुद्ध होते.
होलिका दहनाचा अर्थ फक्त धार्मिक विधी नसून, त्यामध्ये काही आधुनिक शिकवणीही दडलेल्या आहेत:
• पर्यावरण पूरक होळी साजरी करणे – अधिक झाडे लावणे आणि प्रदूषण टाळणे.
• मनातील वाईट विचार आणि मत्सर जाळून टाकणे – सकारात्मक विचार स्वीकारणे.
• जात-पात विसरून ऐक्य आणि प्रेम वाढवणे – समाजामध्ये बंधुभाव निर्माण करणे.
• ज्ञान आणि विज्ञानाचा स्वीकार करणे – अंधश्रद्धा सोडून शिक्षण आणि विवेक जागृत ठेवणे.
होलिका दहन हा एक प्रेरणादायी आणि शिकवण देणारा सण आहे. तो आपल्याला सांगतो की चांगुलपणा, भक्ती आणि सत्य हाच खरा मार्ग आहे. त्यामुळे, या होळीला केवळ बाह्यरूपानेच नव्हे, तर मनातूनही वाईट विचार जाळून टाका आणि नवीन आशेने जीवनाची सुरुवात करा!
“होलिका दहनाच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!”

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!