प्रतिनिधी/आष्टी :- मनुष्य जीवन जगत असताना प्रपंचासोबतच भगवंताचे नामस्मरण स्वच्छ मनाने करणे आवश्यक आहे.
स्वच्छ मनाने भगवंताचे नामस्मरण केल्याने भगवंत ही आपल्या भक्तांवर लाख पटीने प्रेम करतो आणि त्याचे एकदा प्रेम प्राप्त झाले की आपल्याला परमार्थ प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही, असे प्रतिपादन सोनालीताई करपे यांनी केले. परतूर तालुक्यातील आष्टी येथील ग्रामदैवत खंडोबा मंदिर येथे भक्तिमय वातावरणात हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताह सोहळ्यात शनिवारी (३०) रात्री दुसऱ्या दिवशीच्या कीर्तनसेवेत सोनालीताई करपे बोलत होत्या. “तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम..’जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी प्रपंच सोडून भगवंताचे असे नामस्मरण केले होते की त्याचा परिणाम म्हणून महाराजांच्या आजूबाजूला जे वृक्ष, वेली, झाडे, झुडपे, पशू, पक्षीसुद्धा भजन करत होते. आणि आम्ही आता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या विचारांना मानतो. मात्र ते आचरणात आणत नाहीत. तेच आपले हित करू शकतात. प्राप्त मानव जिवाची आत्मिक उन्नती संत विचारात आहे. त्याच्या विचारांचे अनुकरण करणे आवश्यक आहे, असेही त्या म्हणाल्या.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!