सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया (जन्म : १५ सप्टेंबर १८६१- मृत्यू :१४ एप्रिल १९६२)
अर्थशास्त्र, अभियंता, प्रशासक, तत्त्वज्ञ, आणि एक दूरदर्शी समाजसुधारक अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचं नाव म्हणजे सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या!
त्यांच्या बुद्धिमत्तेचं तेज इतकं प्रभावी होतं की त्यांनी केवळ अभियांत्रिकीच्या क्षेत्रातच नव्हे, तर संपूर्ण राष्ट्राच्या प्रगतीच्या वाटेवर ठोस पायाभरणी केली. भारताच्या आधुनिकतेच्या प्रवासात त्यांनी घडवलेला वाटा म्हणजे एक प्रेरणादायी अध्यायच आहे. त्यांचा जीवनप्रवास म्हणजे कल्पकतेचा, सेवाभावाचा आणि अथक परिश्रमाचा संगम जो आजही प्रत्येक भारतीय अभियंत्याच्या मनात आदराने जागा मिळवतो.
भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे त्यांच्या काळाच्या खूप पुढेचे इंजिनियर होते. मर्यादित साधनसामग्री आणि मर्यादित तंत्रज्ञानाच्या बळावर त्यांनी आपल्या मेंदूने जे काही साध्य केले की अगदी ब्रिटिशांनीही त्यांच्या प्रतिभेची पावती दिली. त्यांनी असे अनेक प्रकल्प तयार केले आणि त्यांचे वास्तवात रूपांतर केले, जे लोकांना अशक्य वाटले. १८६१ मध्ये जन्मलेल्या विश्वेश्वरय्या यांना तब्बल १०१ वर्षांचे आयुष्य लाभले. या प्रदीर्घ आयुष्यातील शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणारा एक द्रष्टा अभियंता, उत्तम प्रशासक, उद्योगपती, शिक्षणतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, समाजसेवक, भाषाप्रेमी, क्रीडाप्रेमी आणि नियोजनकार अशी विविध रूपे त्यांची आहेत. विश्वेश्वरय्या यांचे प्राथमिक शिक्षण चिक्कबल्लापूर या खेड्यात व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झाले. उच्च शिक्षण बंगलोरच्या सेंट्रल कॉलेजामध्ये झाले. १८८० मध्ये ते बी. ए. परीक्षा विशेष गुणवत्तेत उत्तीर्ण झाले. म्हैसूर सरकारने पुढील शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती दिली. १८८३ मध्ये ते पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून मुंबई विद्यापीठाची अभियांत्रिकीची पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. या परीक्षेत ते मुंबई प्रांतात पहिले आले. स्थापत्यशास्त्रातील त्यांच्या ज्ञानाचा लौकिक सर्वदूर पसरला. १८८४ मध्ये मुंबई सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात त्यांची साहाय्यक अभियंता पदावर नियुक्ती झाली. नाशिक जिल्ह्यात त्यांची प्रथम नियुक्ती झाली. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे त्यांना मौलिक मार्गदर्शन लाभले. विश्वेश्वरयांच्या आयुष्यातील सर्वात मनोरंजक घटना म्हणजे ब्रिटिशांशी संबंधित आहे. एकदा ते इंग्रजांसोबत ट्रेनमध्ये प्रवास करत होते. गडद रंगाचे आणि सामान्य उंचीचे विश्वेश्वरय्या यांना निरक्षर समजून इंग्रजांनी त्यांची थट्टा करायला सुरुवात केली. यावर त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. ट्रेन भरधाव वेगाने जात होती, त्यांनी अचानक उठून साखळी ओढली. ट्रेन तिथेच थांबली प्रवाशांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. काही वेळाने गार्डने प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले –
“मी साखळी ओढली आहे. माझा अंदाज आहे की सुमारे २२० यार्ड अंतरावर रेल्वे ट्रॅक उखडला आहे.”
गार्डने विचारले- “हे तुला कसे कळले?”
त्यांनी उत्तर दिले-
“प्रवासादरम्यान मला जाणवले की ट्रेनच्या वेगात फरक आहे. ट्रॅकवरून येणाऱ्या आवाजात बदल झाला आहे.”
याची खातरजमा करण्यासाठी गार्ड काही अंतर चालून गेला तेव्हा तो चक्रावून गेला. ट्रॅकचे नट आणि बोल्ट तेथे विखुरले होते. हे पाहून इंग्रज थक्क झाले आणि त्यांनी विश्वेश्वरयांच्या माफी मागितली. त्यांच्या आयुष्यातील अनेक घटना घडल्या पण अशी एक घटना ज्या मध्ये अमेरिकन लोकांनी त्यांच्या धाडसाचे कौतुक केले. एकदा देशातील काही निवडक अभियंत्यांना तेथील कारखान्यांचे कामकाज समजावे म्हणून अमेरिकेला पाठवण्यात आले. कारखान्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, जर तुम्हाला मशीन समजून घ्यायचे असेल तर तुम्हाला ७५ फूट उंच शिडीवर चढावे लागेल.
एवढी उंच शिडी पाहून सर्व अभियंते मागे सरले, पण गटातील सर्वात वयस्कर असूनही डॉ. मोक्षगुंडम म्हणाले, मी बघेन. शिडीवर चढून त्यांनी मशीनकडे पाहिले. त्यांच्यानंतर आणखी दोन अभियंते चढले. त्यांचे धाडस पाहून अमेरिकन कारखान्यातील लोकांनी त्यांचे कौतुक केले. पुणे व गुजरातमधील सुरत जिल्ह्यातही त्यांनी काम केले. १९०४ साली शासनाने आरोग्य अभियंता या पदावर त्यांची बढती झाली होती तेव्हा खडकवासला येथील जुन्या दगडी बांधकामाच्या धरणात त्यांनी संशोधन करून तयार केलेली स्वयंचलित शीर्षद्वारे पहिल्यांदा बसविण्यात आली होती. त्याच्यामुळे त्यांनी पाण्याचा अपव्यय टाळला. १९०६ साली एडनला लष्करी वसाहतीसाठी त्यांची साहाय्यक बंदर अधिकारी म्हणून नेमणूक झाली. त्यापूर्वी त्यांनी मुंबई सरकारच्या सचिवालयात सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत पाटबंधारे विभागात विशेष अधिकारी म्हणून काम केले. पुण्याच्या डेक्कन क्लबच्या स्थापनेत त्यांनी भाग घेतला. १९०७ साली मुंबई सरकारच्या नोकरीतून त्यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली आणि १९०९ साली हैदराबाद संस्थानात विशेष सल्लागार अभियंता म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला. हैदराबाद शहराची सिंचन व्यवस्था सुधारणे हे एक आव्हान होते. त्यासाठी त्यांनी पोलादी दरवाजातून स्वयंचलित ब्लॉक प्रणाली शोधून पाण्याचा प्रवाह थांबवण्याचा मार्ग सांगितला. आज ही प्रणाली जगभर वापरली जात आहे. त्यांनी विशाखापट्टणम बंदराचे सागरी धूप होण्यापासून संरक्षण करण्यासाठी यंत्रणा विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. म्हैसूरमधील कृष्णा राजा सागर (KRS) धरणाच्या बांधकामात ते मुख्य अभियंता होते. पंडित जवाहरलाल नेहरू डॉ. विश्वेश्वरय्यांबद्दल म्हणत, “He is an engineer of Integrity, Character and Broad National Outlook..”
१९१२ ते १९१८ पर्यंत एम. विश्वेश्वरय्या हे म्हैसूरचे दिवाण होते. म्हैसूर आर्थिक परिषदेला स्थायी रूप देऊन अनेक विकासकामे हाती घेतली. म्हैसूर बँक, म्हैसूर विद्यापीठ, प्राथमिक शिक्षणाचा विस्तार, मुलींचे पहिले वसतिगृह व शेतकी महाविद्यालय, वृंदावन गार्डन यांची उभारणी, कन्नड साहित्य अकादमी, आर्थिक लेखा परीक्षणाबरोबरच कार्यक्षमता लेखा परीक्षण वगैरे. रेशीम उत्पादन, चंदन तेल, साबण, धातू व क्रोम टॅनिंग, सिमेंट, साखर कारखाने, लघू उद्योग, हॉटेल व उपाहारगृहे, विश्रामधाम, मुद्रणालये, क्लब यांच्या निर्मिती उद्योगास त्यांनी चालना दिली. म्हैसूरसाठी भाटकलला बंदराची सोय केली. त्यांनी म्हैसूरसाठी केलेले काम पाहून त्यांना “आधुनिक म्हैसूर राज्याचे जनक” म्हटले जाते. विश्वेश्वरय्या यांच्या विलक्षण बुद्धिमत्तेने देशातील अनेक योजना साकार झाल्या. धुळे जिल्ह्यातील पांजरा नदी ते दात्रटीपर्यंत वक्रनलिकेने पाणीपुरवठा ही योजना साकार करून त्यांनी धुळे शहर पाणीपुरवठा योजना व सुरत शहर पाणीपुरवठा योजनाही साकार केली. सक्कर शहराच्या पाणीपुरवठ्याचा बिकट प्रश्न त्यांनी सक्कर बंधाऱ्यांची उभारणी करून सोडविला. शेतीला पाणीपुरवठा करण्याच्या व कमीत कमी पाण्यात अनेक तऱ्हेच्या पिकांना पाणी देण्याची गट पद्धती त्यांनीच सुरू केली. त्यांनी अर्थशास्त्र, उद्योग, शेती, प्रशासन, बेरोजगारी, शिक्षण, कौशल्य शिक्षण, बैंकिंग, आदी सर्वांचा विचार केला होता, त्याला नियोजनाची जोड दिली होती. हा सर्व विचार मांडण्यासाठी २८ पुस्तके लिहिली. ते एक उत्तम लेखकही होते. म्हैसूर राज्यात ऑटोमोबाईल आणि विमानाचा कारखाना असावा असे एम विश्वेश्वरय्या यांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी १९३५ पासून प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे बंगळुरूमध्ये हिंदुस्थान एअरक्राफ्ट फॅक्टरी (आता हिंदुस्तान एरोनॉटिक्स) आणि प्रीमियर ऑटोमोबाईल फॅक्टरी स्थापन झाली. प्रखर बुद्धिमत्ता, अखंड वाचन, चिंतन, संशोधन, उत्साह आणि तत्त्वनिष्ठा हे त्यांची गुणवैशिष्ट्ये होते. इंग्रज सरकारने त्यांना सर, कैसर-ई-हिंद, तसेच के.सी.आय.ई. आणि सी.आय.ई असे बहुमानाचे किताब बहाल केले, तर भारत सरकारतर्फे ७ सप्टेंबर १९५५ रोजी दिल्लीला राष्ट्रपती भवनात डॉ. राजेंद्रप्रसादांनी त्यांना भारतरत्न म्हणून गौरवले. अनेक विद्यापीठांनी त्यांना सर्वोच्च डॉक्टरेट पदव्या देऊन त्यांचा सन्मान केला. वयाच्या १०१ व्या वर्षी १४ एप्रिल १९६२ रोजी त्यांचे निधन झाले. पण ते त्यांच्या कालातीत कामांसाठी कायम स्मरणात राहतील. त्यांना आदरांजली म्हणून त्यांचा जन्मदिवस, १५ सप्टेंबर हा दिवस देशात अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो.
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या स्मृतीस अभिवादन!

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!