तुम मुझे यूं भुला ना पाओगे …. !
‘बहारों फूल बारसाओ, मेरा मेहबूब आया हैं’, ”तेरी जुल्फो से जुदाई तो नही मांगी थी, कैद मांगी थी रिहाई तो नही मांगी थी’, ‘पंछी बनू उडती फिरू मस्त गगन में, आज मैं आझाद हूँ दुनिया कि चमन में’, ‘आजा सनम मधुर चांदनी में हम तुम मिले तो वीराने में भी आ जायेगी बहार, झुमने लगेगा आस्मान’ अहाहा … ! ही एक से बढकर एक गाणी आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जातात. अशा जगात जिथून परतावंसच वाटू नये. अगदी अवीट म्हणता येतील अशा श्रेणीतील ही गाणी आहेत. पण तुम्हाला माहित आहे का, ज्यांच्या लेखणीतून या रचना लिहिल्या गेल्या तो गीतकार ११ रुपये मासिक वेतनावर बेस्ट मध्ये कंडक्टर म्हणून काम करत होता आणि काही काळ त्यानं उदरनिर्वाहासाठी खेळणी विकण्याचं कामही केलं होतं. आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. या महान गीतकाराचं नाव होतं ‘इकबाल हुसेन’ अर्थात ‘हसरत जयपुरी’.
अंगी अभिजात कला असेल तर कोणतीही पार्श्वभूमी ही त्या कलाकारासाठी चौकट ठरू शकत नाही. अनेक कलाकारांचं चरित्र अभ्यासताना हे सिध्द झालं आहे. गीतकार हसरत जयपुरी हे त्यापैकीच एक! काव्याचं बाळकडू त्यांना त्यांच्या आजोबांकडून मिळालं. त्यांचे आजोबा फिदा हुसैन हे प्रतिभावंत कवी होते. त्यांनी छोट्या इकबाल ला उर्दू आणि पर्शियन भाषा शिकवल्या. या भाषेतील लहजा इकबालच्या बालमनाला भावला आणि त्याच्या मनात कवितेचा अंकुर फुटला. हिंदी भाषेतील अलंकारांनी तो अधिक फुलला आणि इकबालसोबत तोही मोठा होत होत त्याचा फुलांनी लगडलेला बहारदार वृक्ष झाला.
ही शिदोरी घेऊनच इकबाल मुंबईत आला. पोटापाण्यासाठी गाडीवर खेळणी विकू लागला. एकदा महानगरपालिकेच्या माणसांनी येऊन त्याची गाडी ओढून नेली. त्यानंतर त्यानं बेस्ट मध्ये कंडक्टर म्हणून नोकरी सुरु केली. या सगळ्या प्रवासात कवितेशी असलेली त्याची नाळ तुटली नव्हती. तो छोट्या मोठया मुशायऱ्यांमधून आपल्या रचनांचं हसरत जयपुरी या नवं सादरीकरण करू लागला. अशाच एका मुशायऱ्यामध्ये जेष्ठ अभिनेते पृथ्वीराजकपूर यांनी हसरत यांच्या रचना ऐकल्या. ते म्हणतात ना कि, हिऱ्याची पारख ही जवाहिऱ्यालाच असते. पृथ्वीराज कपूर यांनी हसरत यांना राजकपूर यांच्याकडं पाठवलं. त्यावेळी राजकपूर ‘बरसात’ चित्रपटाच्या निर्मितीमध्ये गुंतले होते. त्यांनी हसरत यांना संगीतकार शंकर जयकिशन यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले. हसरत यांनी चित्रपटाचं कथानक ऐकलं आणि त्याबरहुकूम रचना लिहिण्यास सुरवात केली. ‘जिया बेकरार हैं, छायी बहार हैं’, ‘अब मेरा कौन सहारा’, ‘छोड गये बालम’, ‘बिछडे हुए परदेसी’ या गीतांनी धूम मचवली. ‘बरसात’ सुपर हिट झाला. चित्रपटाच्या या यशात हसरत यांच्या गीतांचा मोठा वाटा होता. या यशानंतर ‘राजकपूर – हसरत जयपुरी – शंकर जयकिशन’ हे एक त्रिकुट तयार झालं आणि या त्रिकुटानं अगदी ‘कल आज और कल’ पर्यंत रसिकांना अवीट गीत संगीताची मेजवानी दिली.
हसरत यांचा जन्म जयपूरचा. जयपूरला ‘गुलाबी शहर’ असं म्हंटलं जातं. कदाचित इथल्या मातीत जन्मल्यामुळं त्यांच्या रचना या प्रेमानं ओथंबलेल्या असत आणि त्या ऐकताना रसिकही त्या प्रेमरसात चिंब भिजून जाई. त्यांच्या रचनांमधून प्रेमरस ओथंबत होता, पण त्यातही किती निरनिराळ्या छटा होत्या. उदाहरणच द्यायचं झालं तर, ‘मैं कही कवी ना बन जाऊं तेरे प्यार में ऐ कविता’ या रचनेतून अगदीच सात्विक प्रेम जाणवतं आणि याउलट ‘एहसान तेरा होगा मुझपर दिल चाहता है वो केहने दो, मुझे तुमसे मोहब्बत हो गयी हैं मुझे पलको कि छाओमें रेहने दो’ या रचनेतून प्रेमातली आर्तता जाणवते. ‘आजा सनम मधुर चांदनी में हम तुम मिले तो वीराने में भी आ जायेगी बहार’ या रचनेतून प्रेमातील उत्कटता जाणवते आणि ‘हम तुमसे मोहब्बत करके सनम, रोते भी रहे हसते भी रहे’ ही रचना प्रेमातील अगतिकता दर्शवते. आकंठ प्रेमात बुडालेल्या मनाला जेव्हा वास्तवतेची जाणीव होते तेव्हा त्याची काय अवस्था होते याची जाणीव ‘जाने कहाँ गये वो दिन, केहते थे तेरी राह में नजरोंको हम बिछायेंगे, चाहे कहीं भी तुम रहो, चाहेंगे तुमको उम्र भर तुमको ना भूल पाएंगे’ ही हसरतजींची रचना करून देते. भावना एकच, पण त्यातल्या विविध छटा शब्दात बांधण्याची ही हातोटी हसरतजींना कशी साधली असेल हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो. यासाठी फार खोलात शिरलं तर एक विचार येतो कि, प्रेमाच्या या विविधरंगी छटा आपल्या रचनांमधून सहजपणे व्यक्त करण्यामागे कदाचित हसरतजींचं अव्यक्त प्रेम असावं. ‘राधा’ नावाच्या मुलीवर त्यांचं प्रेम होतं. तिला देण्यासाठी त्यांनी एक प्रेमपत्रंही लिहिलं होतं. पण आपल्या भावना ते तिच्यापर्यंत कधीच पोहचवू शकले नाहीत. कालांतरानं त्यांचं हे प्रेमपत्र द ग्रेट शो मन राजकपूर यांनी आपल्या ‘संगम’ या चित्रपटात घेतलं. ‘ये मेरा प्रेमपत्र पढकर के तुम नाराज ना होना, के तुम मेरी जिंदगी हो, के तुम मेरी बंदगी हो’ हे गाणं प्रचंड गाजलं आणि आजही या गाण्याची तरुणाई मध्ये क्रेझ आहे. या चित्रपटातील नायिकेचं नावही ‘राधा’ होतं, हा कसला योगायोग म्हणावा? बरं त्यातही हसरतजी या रचना केवळ प्रियकराच्याच भूमिकेतून नाही तर प्रेयसीच्या भूमिकेतूनही तितक्याच उत्कटतेनं लिहितात हे विशेष. गानसम्राज्ञी लता मंगेशकर त्यांच्याविषयी बोलताना त्यांचं हे वेगळेपण प्रामुख्यानं नमूद करताना ‘एहसान तेरा होगा मुझपर’ आणि ‘तुम मुझे यूं भुला ना पाओगे’ या त्यांच्या दोन रचनांचा आवर्जून उल्लेख करतात. ही दोन्ही गाणी रफी साहेब आणि लता दीदींनी गायली आहेत. दोघांच्याही भूमिकेतून भावना अगदी चपखलपणे हसरतजींनी मांडल्या आहेत आणि त्या रसिकांपर्यंत देखील तितक्याच उत्कटतेनं पोहचतात. ही हंसरतजींची विलक्षण हातोटी होती.
आपल्या कारकिर्दीत ३०० हुन अधिक चित्रपटांसाठी २००० वर गाणी लिहिणारा हा गीतकार चित्रपटसृष्टीच्या इतिहासात आणि रसिकांच्या स्मरणात कायम असेल यात शंकाच नाही. आज हसरत जयपुरी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!