शांता हुबळीकर

शांता हुबळीकर (जन्म :१४ एप्रिल १९१४– मृत्यु :१७ जुलै १९९२)
आता कशाला उद्याची बात…!
‘माणूस’ या चित्रपटातले है गाणं! १९४०च्या दशकातले हे गाणे पुढची तीन दशके महाराष्ट्रात सर्वतोमुखी होते. या गीताच्या गायिका व नायिका शांता हुबळीकर या गाण्यातील त्यांच्या गायकीला व आदाकारीला खरोखरच वंदना. फक्त हाच चित्रपट त्यांचा गाजला अस नव्हे तर शांताबाई हे एक अजब रसायन होते. उंच, शेलाटा बांधा, सुस्वरूप अंगकांती व चेहरा आणि त्याच्या जोडीला रसिला आवाज आणि लालित्यपूर्ण पदन्यास, अशा शांताबाईंनी एक काळ रुपेरी पडदा पार भारून टाकला होता. चारचौघींसारखं साधं व्यक्तिमत्त्व असूनदेखील शांता हुबळीकर यांनी तीस-चाळीसच्या दशकातील मराठी रुपेरी पडदा चांगलाच गाजवला. पण याचा मागचा त्यांचा प्रवास काही सोपा नव्हता १४ एप्रिल १९१४ रोजी हुबळीतील अदरगुंची या एका खेडेगावात जन्मलेल्या शांताबाई ह्या वयाच्या तिसऱ्या वर्षीच अनाथ झाल्या. त्यांच्या आई वडिलांचे अकाली निधन झाले. शांताबाईंचे पाळण्यातले नाव राजम्मा उर्फ राजू होते. आईवडिलांचे छत्र हरवल्यानंतर अकरा वर्षांनी मोठी बहीण शारदा यांच्यासह त्या आपल्या आजीकडे राहू लागल्या. पण बेताच्या परिस्थितीमुळे आणि त्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे ‘राजम्मा’ आणि शारदा यांना दत्तक म्हणून एका सधन नातलगांकडे सोपवले. ‘राजम्मा’ यांच्या शांत स्वभावामुळे ‘सावित्राक्का’ या दत्तक आजीने त्यांचे नाव ‘शांता’ ठेवले. शांताबाईंचे शालेय शिक्षण सुरू झाले. शाळा व अभ्यास सुरू असताना अब्दुल करीम खॉंसाहेब यांच्या हुबळीच्या मुक्कामात शांताबाईंनी त्यांच्याकडे साधारणपणे तीन वर्षे संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले. तेथे सुरेशबाबू माने, हिराबाई बडोदेकर, ताराबाई यांच्याबरोबर त्यांचा स्नेह जुळला. या तीन वर्षातील गाण्यांच्या शिक्षणाने त्यांना आयुष्यभर साथ केली.
शांताबाईंच्या दत्तक आईने त्यांच्या परोक्ष त्यांच्यासाठी एका वयस्क वराची निवड केली. या लग्नाला नकार देण्यासाठी त्यांनी आपल्या परिचितांच्या आधारे राहते घर सोडले आणि त्या गदगला निघून गेल्या. ‘गुब्बी’ नाटक कंपनीमध्ये त्या १९३० साली ४० रु. पगारावर दाखल झाल्या. मूकपटांच्या काळातही शांताबाईंचा नाटकांकडे ओढा होता. या नाटक कंपनीत ‘कित्तुर चन्नामा’, ‘महानंदा’ यासारखी नाटके होत असत. या गुब्बी नाटक कंपनीत बारीकसारीक भूमिका करून कंटाळल्यावर त्या चित्रपटात काम करण्यासाठी १९३५ साली नाटक कंपनीतून बाहेर पडल्या. योगायोगाने ‘कोल्हापूर सिनेटोन’च्या कलाविभागाचे व्यवस्थापक बाबूराव पेंढारकर यांच्याशी त्यांची भेट झाली आणि मुलाखतीच्या सोपस्कारानंतर शांताबाईंनी महिना ७५ रु. पगारावर ‘कोल्हापूर सिनेटोन’शी दोन वर्षांचा करार केला.
भालजी पेंढारकर या ख्यातनाम दिग्दर्शकांच्या हाताखाली त्यांना अभिनयाचे धडे मिळाले. भालजींच्या साध्या राहणीचा व वक्तशीरपणाचा त्यांनी अंगीकार केला. कान्होपात्रा या चित्रपटात त्यांनी कान्होपात्रेच्या आईची भूमिका केली. इथे दिनकर कामण्णा, चिंतामणराव कोल्हटकर आदींकडून त्यांना अनेक गोष्टी शिकावयास मिळाल्या. १९३७ मध्ये त्या प्रभात फिल्म कंपनीमध्ये रुजू झाल्या आणि इथेच त्यांना अमाप लोकप्रियता व वैभव मिळण्यास सुरुवात झाली. त्यांची परीक्षा घेतली व्ही. शांताराम व प्रभातमधील इतर बड्या मंडळींनी. त्या वेळी मेरा लडका चित्रपट दिग्दर्शित करणारे के. नारायण काळे यांनी त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन त्यांना नायिकेची भूमिका दिली. त्यांनी हिंदी-मराठी शब्दोच्चार सुधारत ती भूमिका साकारली. नंतर व्ही. शांताराम दिग्दर्शित आदमी या चित्रपटाने त्यांना कीर्ती, पैसा व लोकप्रियता मिळवून दिली. व्ही. शांताराम यांच्या दिग्दर्शकीय संस्कारांमुळे त्यांचा या चित्रपटातील अभिनय उत्कृष्ट झाला. त्यातील त्यांचा अभिनय व गाणी अतोनात गाजली. त्यांनी साभिनय गायिलेले ‘आता कशाला उद्याची बात’ हे बहुभाषी गीत अजरामर ठरले. त्यांनी याच कंपनीत ‘कालियामर्दन’ हा पहिला चित्रपट केला. एवडेच नव्हे तर ‘मेरा लाडका’ हा प्रभातचा सर्वस्वी सामाजिक, मध्यमवर्गीयांच्या नातेसंबंधांवरील कथा असलेले चित्र. या चित्रातील ‘पाहू रे किती वाट’ आणि ‘उसळत तेज भरे गगनात’ ही दोन गाणी शांता हुबळीकर यांच्या आवाजात लोकांच्या पसंतीस उतरली. ‘उसळत तेज भरे गगनात’ या गाण्याच्या वेळी त्या गाण्यात काय आशय हवा आहे हे आठवल्यांना सांगताना व्ही. शांताराम म्हणाले होते की, “मला या गाण्यात एखादा बैरागी गातो तसं वर वर जाणारं, आभाळाला भिडणारं काही तरी हवं आहे!” ‘पाहू रे किती वाट’ यातील समुद्राच्या लाटा वर उसळल्याचा आभास उत्पन्न करणारे विलक्षण ताकदीचे संगीत लक्षणीय आहे.
१९४५ मध्ये शांताबाईंनी कुलकलंक हा चित्रपट केला. तो त्यांचा नायिका म्हणून अखेरचा चित्रपट. त्यानंतर चरितार्थासाठी शांताबाईंनी १९४५–५७ दरम्यान हैदराबाद, निजामाबाद, दिल्ली, आग्रा, कानपूर, इंदूर, ग्वाल्हेर इ. शहरांतून जलसे केले नाटकांत कामे केली गाण्याचे कार्यक्रम केले. १९५७ मध्ये फिल्मिस्तान कंपनीचे सौभाग्यवती भव: व घरगृहस्थी (हिंदी) असे दोन चित्रपट केले पण पुढे तीही कामे मिळेनात. तेव्हा त्यांनी शिकवण्या केल्या आणि प्रदीपचा संसार थाटला पण कुटुंबियांच्या त्रासामुळे त्यांनी स्वतःचे घर सोडून वसईचा श्रद्धानंद वृद्धाश्रम गाठला (१९७४). त्या वृद्धाश्रमात असतानाच गीते यांचे निधन झाले (१९७७). दै. लोकसत्ताचे तत्कालीन संपादक माधवराव गडकरी यांच्या लेखाने विस्मृतीत गेलेल्या शांताबाईंना संजीवनी दिली. सरकारच्या सांस्कृतिक खात्यातर्फे त्यांना निवृत्तिवेतन मिळू लागले आणि लोकांनी देणग्या दिल्या. त्यांचा अमृतमहोत्सव संपन्न झाला. जागतिक मराठी परिषदेत त्यांचा सत्कार करण्यात आला, तेव्हा त्यांना अनेक जुने सहकलाकार भेटले. अखेर सुनीती पुंगलिया व गडकरी यांच्या साहाय्याने पुणे महिला मंडळाच्या वृद्धाश्रमात शांताबाईंची सोय लागली (१९८९). तिथेच अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. मृत्यूपूर्वी त्यांनी कशाला उद्याची बात हे आत्मचरित्र लिहिले (१९९०). त्यांना अनेक मानसन्मान लाभले. त्यांपैकी माणूस चित्रपटातील अभिनयासाठीचा बंगाल फिल्म असोसिएशनचा पुरस्कार (१९३९) महत्त्वाचा होय. पुण्याच्या मॉडेल कॉलनीतील ‘दीप’ बंगला हेच त्यांचे स्मारक म्हणावे लागेल.
अभिनेत्री शांता हुबळीकर यांना पुण्यतिथि निमित विनम्र अभिवादन !
मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल