शंकरराव खरात (जन्म :११ जुलै १९२१ – मृत्यू :९ एप्रिल २००१)
साहित्य हा केवळ शब्दांचा खेळ नसतो, तर तो विचारांची मशाल असतो. शंकरराव खरात यांनी आपल्या लेखनातून दलित समाजाच्या व्यथा, संघर्ष आणि आत्मभान जागवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांच्या शब्दांनी समाजमनाला हादरवले, विचारांना नवीन दिशा दिली आणि अन्यायाविरोधात लढण्याची प्रेरणा दिली.
विचारांना विवेकाची बैठक आणि संवेदनशीलतेची जोड मिळाली की, ते समाजपरिवर्तनाची दिशा ठरवू शकतात. मराठी साहित्यात अशा संवेदनशील आणि समाजाभिमुख लेखनाची परंपरा उभी करणाऱ्या लेखकांमध्ये शंकरराव खरात यांचे नाव अग्रस्थानी आहे. कथा, कादंबरी, वैचारिक लेखन, सामाजिक भाष्य आणि समीक्षण अशा विविध प्रकारांत त्यांनी आपल्या लेखणीचा ठसा उमटवला.
अज्ञातात भरकटणे आणि दु:खाच्या जखमा कुरवाळत राहणे म्हणजे पुनःपुन्हा त्या दुःखात अडकणे. पण खरात यांचे लेखन हे केवळ वेदनांचा गजर नसून, त्या वेदनांतून समाजाला उभारी देणारे आहे. म्हणूनच त्यांच्या कथा-कादंबऱ्या आक्रस्ताळेपणाच्या काठावर न जाता संयमित, परंतु परिणामकारक शैलीत वेदना आणि वास्तव यांची सांगड घालतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासाने खरात यांच्या विचारांना दिशा आणि लेखनाला गती मिळाली. सामाजिक कार्याच्या जोडीला त्यांनी प्रशासकीय क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले. बँक ऑफ इंडियाचे संचालक, ऑफिसर्स सिलेक्शन कमिटीचे चेअरमन आणि मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू अशा मानाच्या पदांवर काम करताना त्यांनी समाजहिताचा विचार केंद्रस्थानी ठेवला. १९५८ ते १९६१ या काळात “प्रबुद्ध भारत” या नियतकालिकाचे संपादन करताना त्यांनी दलित आणि वंचितांसाठीचे विचार अधिक प्रभावीपणे मांडले.
१९५७ साली आचार्य अत्रे यांच्या “नवयुग” दिवाळी अंकात “सत्तूची पडीक जमीन” ही पहिली कथा प्रसिद्ध झाल्याने खरात यांच्या लेखनप्रवासाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर त्यांनी “बारा बलुतेदार, तडीपार, सांगावा, गावशीव” यांसारखे उल्लेखनीय कथासंग्रह, “पारधी, हातभट्टी, झोपडपट्टी” या वास्तववादी कादंबऱ्या आणि “आज इथं उद्या तिथं” हा ललित लेखसंग्रह साकारला.
त्यांच्या लेखनाचा रोख केवळ साहित्यनिर्मितीपर्यंत मर्यादित नव्हता. “दलित वाङ्मय प्रेरणा व प्रवृत्ती, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात” यांसारख्या ग्रंथांमधून त्यांनी वैचारिक आणि ऐतिहासिक पद्धतीने समाजप्रबोधन केले.
दलित आणि विमुक्त भटक्या समाजाच्या प्रश्नांची जाण असलेले खरात हे केवळ लेखक नव्हते, तर ते सक्रिय समाजसेवकही होते. ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’ आणि कामगार चळवळीत त्यांनी मोठे योगदान दिले. १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनात त्यांनी भूमिगत कार्यकर्त्यांना पत्रके वाटण्याचे साहसी कार्य केले.
“तराळ-अंतराळ” हे त्यांचे आत्मचरित्र म्हणजे त्यांच्या जीवनसंघर्षाचा आरसा आहे. सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात झोकून देणाऱ्या या विचारवंत लेखकाने महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आचरणात आणले.
त्यांचे लेखन केवळ दलित साहित्यापुरते मर्यादित नव्हते. त्यांच्या साहित्यात संपूर्ण समाजाला अंतर्मुख करणारी ताकद होती. उपेक्षित, वंचित, भटक्या-विमुक्त यांना “स्वावलंबी, स्वतंत्र आणि आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा” यासाठी त्यांनी अखेरपर्यंत संघर्ष केला.
त्यांचा वारसा हा केवळ त्यांच्या पुस्तकांत नाही, तर त्यांच्या विचारसरणीत आणि सामाजिक चळवळीतील कार्यात जिवंत आहे. शंकरराव खरात यांचे कार्य एका लेखात पूर्णपणे मांडणे कठीण असले, तरी त्यांच्या विचारांची ज्योत समाजाला नव्या वाटेवर मार्गदर्शन करणारी राहील, हे निश्चित!
अश्या या वंचितांचा आवाज झालेल्या लेखकास पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!