मत्स्यजयंती (३१ मार्च )
अखंड पृथ्वी जलमय होणार होती. सजीवसृष्टीचा संपूर्ण नाश होण्याची वेळ जवळ येत होती. आकाशात प्रलयाच्या ढगांनी गर्दी केली होती, आणि विशाल लाटा पृथ्वी गिळंकृत करण्यास सज्ज होत्या. त्या महाप्रलयाच्या घटका मोजल्या जात असतानाच, एक राजा नदीकिनारी उभा होता… आणि तेव्हाच एका छोट्याशा माशाने त्याच्या ओंजळीत प्रवेश केला. राजा अजाणता होता की, हा साधा मासा नव्हे, तर संपूर्ण सृष्टीच्या रक्षणासाठी अवतरलेला एक दिव्य दैवत होता!
ही कथा आहे सत्ययुगातील, जेव्हा सत्यव्रत नावाचा राजा नित्यनेमाने नदीकिनारी स्नान व सूर्यपूजा करत असे. एके दिवशी, त्याने ओंजळीत पाणी घेतलं, आणि त्याबरोबरच एक छोटासा मासाही त्याच्या हातात आला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो मासा बोलू लागला.
“’हे राजन, मी आकारानं खूप लहान आहे आणि या जलाशयातील मोठ्या माशांपासून माझ्या जीविताला धोका आहे. तेव्हा तुम्ही माझं रक्षण करा.” राजाला त्या माशाची दया आली आणि तो ओंजळीतल्या जलासह त्या माशाला महालात घेऊन आला. तिथं त्यानं त्या माशाला एका पात्रात ठेवलं. पण अगदी काही दिवसातच त्या माशाचा आकार पात्रापेक्षा वाढला तेव्हा राजानं त्याला हौदात सोडलं. पुन्हा काही दिवसातच त्याचा आकार पुन्हा वाढला तेव्हा राजानं त्याला नदीत सोडलं. तिथं त्या माशानं अतिविशाल रूप धारण केलं आणि तो समुद्रात निघून गेला. एव्हाना राजाच्या लक्षात आलं होतं कि, हा मासा काही साधासुधा नाही. हा नक्कीच दैवी मासा आहे. मग राजानं हात जोडून त्या माशाला त्याचे मूळ स्वरूप दर्शविण्याची विनंती केली. राजाच्या विनंतीचा मान राखून मासा त्याच्या मूळ स्वरूपात आला.
ते साक्षात भगवान विष्णू होते. भगवान विष्णूंनी राजाला सांगितलं कि, ‘काही दिवसातच प्रलय होणार आहे. तू एक जहाज तयार कर. त्या जहाजामध्ये सप्तऋषींना सोबत घे. याशिवाय सर्व प्रकारची बी – बियाणं, झाडं आणि प्राणी-पक्षी घे. प्रलयाच्या दिवशी मी तुमचं संरक्षण करेन.’ असं सांगून भगवान विष्णूंनी पुन्हा मत्स्य अवतार धारण केला आणि ते समुद्रात लुप्त झाले. राजा सत्यव्रतानं भगवान विष्णूंच्या सांगण्यानुसार एक जहाज तयार केलं. त्यात सप्तऋषी, सर्व प्रकारची बी – बियाणं, प्राणी- पक्षी घेतले. प्रलयाच्या दिवशी समुद्रात हे जहाज सोडलं. वचन दिल्याप्रमाणं भगवान विष्णू माशाच्या रूपात त्यांचं रक्षण करण्यासाठी आले. राजा सत्यव्रतानं वासुकी नागाच्या सहाय्यानं जहाज माशासोबत बांधलं आणि माशानं हे जहाज प्रलयापासून वाचवलं. प्रलय ओसरला आणि भगवान विष्णूंनी राजा सत्यव्रताला नवीन सृष्टी घडविण्यासाठी आशीर्वाद दिले.
अशा प्रकारे नवीन सृष्टीचा निर्मिती झाली.”
पौराणिक मान्यतेनुसार, सत्ययुगात भगवान विष्णूंनी चैत्र शुक्ल तृतीयेला मत्स्य म्हणून पहिला अवतार घेतला. विश्वाचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूने मत्स्य अवतार घेतला. मत्स्य जयंती दरवर्षी चैत्र शुक्ल तृतीयेला साजरी केली जाते आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते. भगवान विष्णूच्या कृपेने सर्व संकटे आणि दु:ख दूर होतात. मत्स्य जयंतीच्या दिवशी शास्त्रानुसार भगवान विष्णूची पूजा करण्याबरोबरच या दिवशी माशांना खाऊ घाला. असे करणे अत्यंत शुभ मानले जाते. मत्स्य जयंतीच्या दिवशी जी व्यक्ती पिठाचे गोळे करून माशांना खाऊ घालते, भगवान विष्णू त्याच्यावर प्रसन्न होतात. या सृष्टीच्या संरक्षणासाठी भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार घेतला होता. विष्णूंच्या दहा अवतारांपैकी हा पहिला अवतार पण खर तर सृष्टीच्या आरंभीपासूनच माणसाला तिच्या निर्मितीचं आणि अस्तित्वाचं कुतूहल आहे. या अथांग विश्वाचा पाया कसा घातला गेला? सजीव सृष्टीचं चक्र कोणी ठरवलं? आणि या सृष्टीच्या रक्षणासाठी कोण पुढे आलं? हे प्रश्न अनादी काळापासून आपल्या मनात रुंजी घालतात. शास्त्रीय दृष्टिकोनाने अनेक सिद्धांत मांडले गेले असले तरी पुराणांमध्ये याबद्दल वेगळ्या कथा सापडतात, ज्या आपल्या संस्कृतीचा आणि परंपरांचा भाग आहेत.
विशिष्ट तिथीला, आपल्या परंपरेनुसार, आपण काही खास गोष्टी करतो. यामुळे आपल्याला सृष्टीतील विविध घटकांना कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळते. उदाहरणार्थ, गॅम्ब्यूझसारख्या माशांचा उपयोग डासांच्या अळ्या नष्ट करून हिवतापाचे (मलेरिया) निर्मूलन करण्यासाठी केला जातो. तसेच, काही मासे नारूसारख्या रोगाचा प्रतिबंध करण्यास उपयुक्त ठरतात, तर काही मासे प्रायोगिक प्राणी म्हणून वापरले जातात किंवा पाण्यातील प्रदूषण शोधून काढण्यास मदत करतात. मत्स्य जयंती म्हणजे केवळ धार्मिक विधी नव्हे, तर निसर्गासोबत असलेल्या आपल्या कृतज्ञतेचा आणि परस्परसंबंधाचा उत्सव आहे. ही परंपरा आपल्याला सजीव सृष्टीचं संवर्धन, पर्यावरणाची काळजी आणि मत्स्योद्योगाचा विकास यासारख्या गोष्टी शिकवते.
मत्स्यजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!