एकनाथषष्ठी.

एकनाथषष्ठी.
भगवंताची भक्ती म्हणजे केवळ ध्यान किंवा पूजा नाही, तर ती समाजसेवा, समतेचा पुरस्कार आणि निस्वार्थ प्रेमाने जगण्याची कला आहे. ही शिकवण देणारे महान संत म्हणजे संत एकनाथ महाराज. त्यांच्या ओवीतून भक्तिरस दिसतो, त्यांच्या चरित्रातून सहनशीलतेचा आदर्श दिसतो, आणि त्यांच्या विचारांतून माणुसकीचा खरा अर्थ समजतो. आज नाथमहाराजांची एकनाथषष्ठी.
संत एकनाथ हे महाराष्ट्रातील महान संतकवी आणि भक्तिसंप्रदायातील महत्त्वाचे प्रणेते होते. त्यांच्या शिकवणींनी समाजाला नवा दृष्टिकोन दिला. त्यांचे कार्य आणि विचार यांना स्मरण करण्याचा दिवस म्हणजे एकनाथ षष्ठी.
संत एकनाथ महाराज हे केवळ एक थोर संत नव्हते, तर ते समाजसुधारक, अद्वितीय कवी आणि भक्तिरसाचा अखंड झरा होते. त्यांच्या जीवनकार्याने महाराष्ट्रातील संतपरंपरेला एक नवा आयाम दिला. आध्यात्मिक उन्नतीसोबतच सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या या महान विभूतीने आपल्या ओव्या, भारुडे आणि ग्रंथांच्या माध्यमातून जनमानसावर अमिट छाप सोडली.
संत एकनाथ महाराजांचा जन्म १५३३ साली पैठण येथे एका प्रतिष्ठित देशस्थ कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी आणि वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. मात्र, नियतीच्या खेळात त्यांचे आई-वडील लहानपणीच काळाच्या गेले. त्यामुळे त्यांचा सांभाळ आजोबा चक्रपाणी महाराज यांनी केला.
त्यांचे पणजोबा संत भानुदास हे विठ्ठल भक्त होते, त्यामुळे एकनाथ महाराजांवरही भक्तिरसाचा प्रभाव बालपणापासूनच पडला. लहानपणापासूनच त्यांना वेद-शास्त्रांचे आकर्षण होते. शिक्षण घेत असतानाच त्यांना गुरूच्या शोधाची ओढ लागली आणि ते दौलताबाद येथे जनार्दन स्वामींच्या चरणी दाखल झाले.
संत व्यासांनी रचलेल्या श्रीमद्भागवतातील १२ स्कंधांपैकी एकादश स्कंधावर संत एकनाथांनी लिहिलेली टीका म्हणजे “एकनाथी भागवत”. या ग्रंथात मूळ १३६७ श्लोकांवर १८,८१० ओव्या रचून त्यांनी त्याचा भावार्थ रसाळ शैलीत उलगडला.
संत एकनाथ महाराजांचे पैठण हे केवळ त्यांचे जन्मस्थान नव्हते, तर त्यांच्या कार्यामुळे एक पवित्र तीर्थक्षेत्र बनले. याच गावातील नाथवाडा हा विशेष महत्त्वाचा आहे, कारण येथेच संत एकनाथ महाराजांचे कायमस्वरूपी वास्तव्य होते.
पैठणमधील नाथवाडा हे संत एकनाथ महाराजांचे पवित्र निवासस्थान. येथेच त्यांचे भक्तिभावाने अन्नदान, कीर्तन, प्रवचन आणि समाजसेवेचे कार्य घडत असे. परंतु या वाड्यातील सर्वात अद्भुत आणि गूढ गोष्ट म्हणजे ‘रांजण’—तोच पवित्र रांजण, ज्यामध्ये १२ वर्षे श्रीखंड्या म्हणजेच साक्षात पांडुरंगाने गोदावरीचे पाणी भरले, अशी आख्यायिका सांगितली जाते.
नाथवाड्यात प्रवेश करताच डाव्या बाजूला हा विशेष पाण्याचा रांजण आहे. मात्र हा नेहमीच्या माठासारखा साधा नाही.
हा २१ फूट खोल आणि दीड फूट रुंद आहे. संपूर्ण काळ्या दगडी पाषाणात कोरलेला आहे.
त्याच्या तळाशी एक गोमुख आहे, जिथून थेंबथेंब पाणी वाहत गोदावरीला मिळते. आजही हे पाणी नेमके कुठे झिरपत जाते, हे कोडं मात्र कोणालाही उलगडलेले नाही.
साडेचारशे वर्षांपूर्वीच्या स्थापत्यशास्त्राची कमाल म्हणजे या रांजणातील पाणी वर्षभर खराब होत नाही. त्याचे एक कारण म्हणजे परक्यूलेशन सिस्टम—रांजणातील पाणी झिरपत राहत असल्याने त्यात नेहमी ताजे पाणी राहते. नाथ महाराजांच्या काळात या रांजणातील पाणी नित्य उपयोगात होते. हजारो लोक दररोज त्यांच्या घरी जेवत असत, आणि याच रांजणातून भक्तांना पाणी पुरवले जात असे.
रांजणाची स्वच्छता केली जाते, तेव्हा खाली उतरलेल्या लोकांना एकदम गारवा जाणवतो. त्याच्या तळाशी असलेल्या गोमुखातून हलकीशी झुळूक येत राहते. रांजणाच्या पूर्वेकडील भिंतीमध्ये एक कोनाडा असून, त्यामध्ये सुंदर पांडुरंग आणि रुक्मिणीची मूर्ती विराजमान आहे. ही मूर्ती केवळ तेथे उतरलेल्या व्यक्तीलाच दिसते—हीच या ठिकाणाची अजून एक अद्भुतता!
रांजण दरवर्षी फाल्गुन वद्य द्वितीयेला, म्हणजे तुकाराम बीजेच्या आदल्या दिवशी उघडला जातो. मागील वर्षी भरण्यात आलेले पाणी वर्षभर झिरपत राहिल्याने अर्धवट उरलेले असते. हे उरलेले पाणी उपसून विशेष छिद्रात सोडले जाते, जेणेकरून ते कुणाच्या पायदळी न येता थेट गोदावरीला मिळावे. यानंतर रांजण पूर्णतः कोरडा करून त्याला धूप दिला जातो, आणि त्याच दिवशी नाथ षष्ठीच्या उत्सवाची सुरुवात होते. ब्राह्मणवृंद, नाथवंशज, तसेच देशभरातून आलेले भक्त या पूजेसाठी हजर राहतात.तुकाराम बीजेला पहिल्यांदा नाथ महाराजांच्या वंशातील सुवासिनी स्त्री रांजणात पाणी टाकते. त्यानंतर, स्त्री-पुरुष, लहान मुले—जो कोणी इच्छुक असेल, तो गोदावरीत स्नान करून तांब्याच्या किंवा धातूच्या घागरींनी रांजणात पाणी टाकतो. हा रांजण कधी भरतो, याचा नेमका अंदाज कोणी लावू शकत नाही. कधी फक्त चार घागरींमध्ये भरतो, तर कधी हजारो घागरी टाकूनही रिकामाच राहतो. काही वेळा पहिल्याच दिवशी भरतो, तर कधी पाचव्या दिवशीही अपूर्ण असतो. पाण्याला अचानक उसळी येते, आणि पाणी बाहेर उडते. या घटनेचे साक्षीदार असलेली विशेष नेमणूक केलेली व्यक्ती मोठ्याने गजर करतो—”देवाचा रांजण भरला हो!”म्हणतात त्या क्षणी हजारो लोक दर्शनासाठी गर्दी करतात. श्रीखंड्याची आख्यायिका माहिती असलेले भक्त उत्सुकतेने विचारतात, “कोणत्या व्यक्तीच्या हाताने हा रांजण भरला?” काही वेळा ही व्यक्ती सापडते, काही वेळा नाही. जर ती व्यक्ती सापडली, तर तिला भगवंताच्या रूपाने मान दिला जातो. आजही, चारशे वीस वर्षांनंतरही हा चमत्कार घडत असल्याचे मानले जाते. संत एकनाथांनी सुमारे ४०,००० ओव्यांमध्ये “भावार्थ रामायण” लिहिले. हा ग्रंथ सामान्य जनतेला समजेल अशा भाषेत असून, त्यांनी वाल्मीकी रामायणाचा भावार्थ सोप्या शब्दांत स्पष्ट केला आहे. भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्या विवाहकथेवर आधारित “रुक्मिणी स्वयंवर” हे एकनाथ महाराजांचे महत्त्वाचे काव्य आहे. ज्ञानेश्वरीच्या मूळ प्रती कालौघात खराब झाल्या होत्या. संत एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध करून ती नव्याने प्रकाशित केली.
त्या काळात अस्पृश्यतेची मानसिकता इतकी प्रबळ होती की उच्चवर्णीय लोक अस्पृश्यांचा स्पर्श आणि सावलीदेखील टाळत असत. पण संत एकनाथ महाराजांनी अस्पृश्यांशी खुला संवाद साधला, त्यांना आत्मसन्मान दिला आणि समतेचा संदेश दिला. त्या काळी स्त्रियांवर अनेक बंधने होती. स्त्रीला लग्नासाठी नकार देण्याचे स्वातंत्र्य नव्हते, तिला शिक्षणाचा अधिकार नव्हता. संत एकनाथ महाराजांनी “रोडगा” या भारुडाच्या माध्यमातून स्त्रियांच्या वेदना आणि त्यांच्या मनोव्यथा मांडल्या.
संत एकनाथ महाराजांनी १२५ विविध विषयांवर ३०० हून अधिक भारुडे रचली. भारुड म्हणजे समाजातील वास्तव परिस्थितीवर भाष्य करणारी, उपदेशात्मक आणि भावनिक अभिव्यक्ती असलेली काव्यरचना.
त्यांचे प्रसिद्ध भारुडे –
• “विंचू चावला” – समाजातील अंधश्रद्धेवर प्रहार करणारे.
• “दादला” – विनोदाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे.
गवळणी हा गीतप्रकार प्रतिष्ठित समाजात रुजला आणि आजही किर्तन-भजनामध्ये गवळणी गायल्या जातात. संत एकनाथ महाराजांनी “वासुदेव संस्थान” नावाची चळवळ सुरू केली. या चळवळीमध्ये वासुदेव म्हणून ओळखले जाणारे लोक घरोघरी जाऊन भजन-कीर्तनाच्या माध्यमातून भक्तीचा प्रसार करत. २५ फेब्रुवारी इ.स. १५९९ (शके १५२१) फाल्गुन वद्य षष्ठी या दिवशी संत एकनाथ महाराजांनी कृष्णकमलतीर्थमध्ये नाभीपर्यंत पाण्यात उभे राहून आपला देह ब्रह्मांडात विलीन केला. त्यांच्या समाधीस्थळी हरीपंडितांनी त्यांच्या चरणपादुका स्थापित केल्या. आजही प्रत्येक वर्षी फाल्गुन वद्य षष्ठीला “एकनाथ षष्ठी” साजरी केली जाते. संत एकनाथ महाराजांनी समाजासाठी भक्तीचा मार्ग खुला केला, जातिभेदावर प्रहार केला आणि समाजप्रबोधन केले. त्यांच्या भारुडांमध्ये, ओव्यांमध्ये आणि ग्रंथांमध्ये समर्पण, साधना आणि समाजसेवेचा संदेश आहे. त्यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम!
मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल