वऱ्हाड. … एक न संपणारा प्रवास!

वऱ्हाड. … एक न संपणारा प्रवास!

लक्ष्मण देशपांडे

माणसाचं जीवन हे ताणतणावानं भरलेलं आहे. त्यामुळं आनंदी राहण्यासाठी मानवी जीवनात मनोरंजनाचं खूप महत्व आहे. काळ बदलला तशी मनोरंजनाची साधनंही बदलली. पण या सगळ्यात एक माध्यम अजूनही बदललेलं नाही आणि त्याची लोकप्रियताही. हे माध्यम म्हणजे ‘नाटक’! नाटक या प्रकाराला एक समृध्द इतिहास आहे. भरतमुनींपासून सुरु झालेली नाट्यपरंपरा आज देखील अखंडपणे चालू आहे. नाटकाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातीलच एक म्हणजे ‘एकपात्री नाटक’!

एका तासापेक्षा जास्त वेळ कोणत्याही विषयावर, अभिनयासह कार्यक्रम सादर करणारी व्यक्ती म्हणजे एकपात्री कलाकार.मराठी नाटक आणि एकपात्री प्रयोग या दोघांत मूलभूत फरक आहे. एकपात्रीत एकच कलाकार रंगमंचावर असतो. तो अभिनय, आवाज, हालचाली यातून आपली कला सादर करतो. आजवर अनेक कलावंतांनी एकपात्री प्रयोग सादर केले, ते यशस्वी केले आणि त्यातून प्रचंड लोकप्रियता मिळवली. पु. लं. देशपांडे यांचा ‘बटाट्याची चाळ’ किंवा ‘असा मी असा मी’ , मधुकर टिल्लू यांचा ‘प्रसंग लहान विनोद महान’ किंवा ‘हसायदान’, सुमन धर्माधिकारी यांचा ‘घार हिंडते आकाशी’, लालन सारंग यांच्या ‘मी आणि माझ्या भूमिका’, रामनगरकर यांचा ‘रामनगरी’, शिरीष कणेकर यांचा ‘माझी फिल्लमबाजी’, दिलीप प्रभावळकर यांचा ‘मुखवटे आणि चेहरे’ या काही एकपात्री प्रयोगांचा प्रामुख्यानं उल्लेख करता येईल.

ज्यांच्या नावांचा वर उल्लेख झालेला आहे, ती सगळीच नावं खुप मोठी आहेत आणि त्यांची कारकीर्दही. या सगळ्या मांदियाळीत ज्यांनी एकपात्री प्रयोगात स्वतःची विक्रमवीर म्हणून ओळख निर्माण केली ते ‘डॉ. लक्ष्मण देशपांडे’ यांचा आज स्मृतिदिन! ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या त्यांच्या एकपात्री प्रयोगानं जागतिक विक्रम तर केलाच, पण रसिकांना हा प्रयोग आजही खळखळून हसवतोय.

ग्रामीण भागात राहणारं एक कुटुंब, त्यांचा लंडन इथं शिक्षण घेतलेला उच्चशिक्षित मुलगा, या मुलाचं लंडनमधील पाश्चिमात्य मुलीच्या प्रेमात पडणं, मुलाच्या प्रेमापोटी या कुटुंबानं सगळ्या परंपरा बाजूला ठेवून मुलाचं हे विदेशी प्रेम स्वीकारून लंडनला लग्नाचा घाट घालणं आणि या सगळ्या प्रवासातील गंमतीजंमती, प्रसंगी भावनिक होणं हे ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्रीप्रयोगाचं कथानक. ही कथा डॉक्टर लक्ष्मण देशपांडे यांनी स्वतः लिहिली. त्यातील संवाद, दिग्दर्शन आणि अभिनय सर्व काही लक्ष्मण देशपांडे यांनी स्वतः साकारलं. त्यात तब्बल ५२ पात्रांची रेलचेल. प्रत्येकाची चालण्याची, बोलण्याची ढब वेगळी आणि ही ५२ पात्रं डॉक्टरांनी मंचावर आपल्या समर्थ अभिनयानं अक्षरशः जीवंत केली. ग्रामीण भागातील जीवनमान, तिथल्या माणसांचा स्वभाव , वागण्या-बोलण्यातील बारकावे त्यांनी इतक्या सूक्ष्मरीतीनं टिपले होते कि ते अस्तित्वात नसलेलं गाव, तिथली अतराप माणसं, गावचा पार, बाप्पांचा वाडा, भिंतीवर टांगलेला मारुतीचा फोटो. बाप्पांचं वावर (शेत), इरसाल बबन्या, स्वयंपाक घरातली बायकांची लगबग, जानराव हे सगळे आपल्या डोळ्यासमोर उभे राहिले. यावरून त्यांची निरीक्षण शक्ती किती जबरदस्त होती हे लक्षात येते.

डॉक्टरांचं हे वऱ्हाड केवळ महाराष्ट्रातच नाही तर अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, मस्कत, ऑस्ट्रेलिया, कतार कुवैत, सिंगापूर, थायलंड, नायझेरिया असं साता समुद्रापार पोहचलं आणि तिथंही त्यानं हास्याचा झरा फुलवला. एकाच व्यक्तीने ५२ व्यक्तिरेखा साकारण्याचा विक्रम केल्याबद्दल त्यांची २००४ मध्ये गिनीज बुकातही नोंद झाली. या नाटकाचा पहिला प्रयोग त्यांनी १९७९ मध्ये केला होता. तेव्हापासून या नाटकाचे १,९६० पेक्षा अधिक प्रयोग सादर करण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे.’ वऱ्हाडकार ‘ अशी त्यांची ओळख झाली होती. या विक्रमामागं डॉक्टरांची आपल्या कलेविषयी असलेली प्रामाणिकता आणि निष्ठा आहे. दूरदर्शनवरील एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं होतं कि एक माणूस काय करू शकतो हे त्यांना जगाला दाखवून द्यायचं होतं आणि अशा प्रकारचा एक प्रयोग संस्कृत नाटकामध्ये झालेला होता. त्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी ‘वऱ्हाड … ‘ ची निर्मिती केली. तसंच या प्रयोगात वापरलेली बोलीभाषा हे या प्रयोगाचं बलस्थान आहे, कारण त्यामुळं प्रत्येकाला ही कथा आपल्या घरातली वाटते आणि तो प्रत्येकजन या वऱ्हाडातलाच एक होऊन जातो असं त्यांचं म्हणणं होतं.

‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री प्रयोगानंतर डॉक्टर लक्ष्मण देशपांडे यांनी अनुया दळवी यांच्यासोबत कुसुमाग्रज लिखित ‘नटसम्राट’ या नाटकाचा द्विपात्री प्रयोग केला. विनोदातून एकदम कारुण्याकडं का यावंसं वाटलं याविषयी त्यांना विचारलं असता ते म्हणाले कि, “नाट्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना नटसम्राट शिकवताना मला वाटलं कि अप्पासाहेब बेलवलकरांची ही जी शोकांतिका आहे ती एकट्या त्यांची नाही तर ती प्रत्येक सामान्य माणसांची आहे. तेव्हा त्याची उत्कटता ही सामान्य माणसांपर्यंत पोहचली पाहिजे. या हेतूनं मी हा द्विपात्री प्रयोग करण्याचं ठरवलं.” त्यांच्या या प्रयोगालाही रसिकांची चांगली पसंती मिळाली. ‘रेशमगाठी’, ‘पैंजण’ या मराठी चित्रपटांतही त्यांनी काम केले. त्यांनी ‘वर्‍हाड निघालंय लंडनला’ या नाटकाचे पुस्तक प्रकाशित केले. त्याच्या दोन आवृत्त्या निघाल्या. ‘प्रतिकार’ हे त्यांनी लिहिलेल्या एकांकिकांचे पुस्तकही रसिकांना भावले. ‘मौलाना आझाद-पुनर्मूल्यांकन’ या पुस्तकाचे, तसेच महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘अक्षरनाद’ या पुस्तकाचे संपादन त्यांनी केले.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाढलेल्या डॉक्टर लक्ष्मण देशपांडे यांनी कला शाखेतील पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर नाट्यशास्त्रातील पदयुवत्तर पदवी प्राप्त केली. छत्रपती संभाजीनगर येथील मौलाना आझाद आणि सरस्वती भुवन महाविद्यालयात नाट्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर १९८० साली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत झाले. २००० मध्ये त्यांची परभणी येथे झालेल्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी घडले आणि आज ते नाट्य – चित्रपटसृष्टीत नावारूपाला आलेले आहेत. सुप्रसिध्द अभिनेत्री वर्षा उसगांवकर या त्यापैकीच एक.

त्यांच्या नाट्यक्षेत्रातील योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. स्वातंत्र्य सैनिक विनायक चारठाणकर पुरस्कार, बेंडे स्मृती पुरस्कार, पुणे महानगर पालिका पुरस्कार, पुण्याचा राम श्रीधर पुरस्कार, मुंबईत उत्तुंग पुरस्कार, मराठवाडा विकास मंडळातर्फे मराठवाडा गौरव पुरस्कार, छत्रपती शाहू महाराज पुरस्कार, महाराष्ट्र शासनातर्फे पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले.

जर तुमच्या अंगी गुणवत्ता असेल आणि ती सिध्द करण्यासाठी प्रामाणिकपणा, मेहनती वृत्ती, सातत्य आणि निष्ठा असेल तर प्रतिकूल परिस्थितही तुम्ही यशाच्या शिखरावर आरूढ होऊन स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करू शकता याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर लक्ष्मण देशपांडे. त्यांनी सुरु केलेला ‘वऱ्हाड …..’ चा हा प्रवास त्यांच्यानंतरही थांबलेला नाही, तर मराठवाड्याच्या मुशीत जन्मलेला ‘संदीप पाठक’ हा प्रतिभावंत कलाकार हा प्रवास यशस्वीपणे पुढे घेऊन जात आहे आणि आजच्या पिढीकडूनही या प्रवासाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. हे खऱ्या अर्थानं ‘वऱ्हाड ….’ चं यश म्हणावं लागेल. मराठवाड्यातील बोली भाषेचा गोडवा सातासमुद्रापार पोहोचवणाऱ्या या मराठवाड्याच्या भूमिपुत्राला स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल