नरहर रघुनाथ फाटक

(जन्म :१५ एप्रिल १८८३ – मृत्यू :२१ डिसेंबर १९७९)
मराठी साहित्याच्या सुवर्णयुगातील एक प्रमुख व्यक्तिमत्व म्हणजे नरहर रघुनाथ फाटक.
नामवंत पत्रकार आणि प्राध्यापक, मराठी संतसाहित्याचे चिकित्सक, इतिहाससंशोधक ,चरित्रकार तसेच एक स्वतंत्र प्रज्ञेचे समीक्षक, इतिहासाची मर्मदृष्टी ठेऊन वर्तमानाचा आणि इतिहासाचा वेध घेणारे विचारवंत म्हणजेच नरहर फाटक. मराठी संताच्या वाङ्मयाचे आणि कार्याचे सामाजिक-ऐतिहासिक दृष्टिकोणांतून त्यांनी केलेले विश्लेषण आणि समालोचनही महत्त्वाचे आहे. सामाजिक- सांस्कृतिक इतिहास जाणून घेण्याचे एक साधन म्हणून फाटक साहित्याकडे पाहत. २०व्या शतकाच्या , सततच्या राजकीय, सामाजिक घडामोडी जवळपास त्यांनी ८० वर्षे पाहिल्या आणि अनुभवल्या. शतकातील घडामोडींचे चढउतार अनुभवले, कारण ते वृत्तपत्रसृष्टी आणि शैक्षणिक विश्वात कायमच वावरले. तसेच साहित्याच्या प्रांतात स्वतःची नाममुद्रा उमटवणार्या दर्जाचे लेखन त्यांनी अखंडपणे केले. फाटकांना इंग्रजी, संस्कृत, हिंदी, गुजराती, उर्दू ह्या भाषा नुसत्याच अवगत होत्या असे नव्हे, तर त्या-त्या भाषांमधील साहित्याचा व्यासंग त्यांनी केला होता.
फाटक हे मराठी साहित्यविश्वात एक नाविन्यपूर्ण विचारवंत म्हणून ओळखले जातात. त्यांनी विविध साहित्य प्रकारांवर काम केले. कादंबरी, कथा, निबंध, चरित्रे, आणि अनुवाद क्षेत्रात त्यांचे योगदान विशेष महत्त्वाचे आहे.
त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये सामान्य माणसाच्या भावभावना, त्याचे संघर्ष, आणि सामाजिक बदल यांचे उत्कट दर्शन घडते. त्यांची भाषा सोपी, रसाळ, आणि आशयघन होती. ‘सत्यान्वेषी’ आणि ‘फरिश्ता’ ह्या टोपण नावांनी त्यांनी बरेच वृत्तपत्रीय लेखन केले आणि आपल्या निर्भीड पत्रकारीतेचा ठसा उमटविला. लोकमान्य टिळक ह्यांच्या निधनानंतर न. चिं. केळकर ह्यांनी विस्तृत प्रमाणात टिळकांचे चरित्र प्रसिद्ध केले. त्याच्यातील अनेक घटना आणि व्यक्तिविषयक निर्देश कसे चुकीचे आहेत हे ‘विविधज्ञान विस्तार’ह्या मासिकात अनेक परीक्षणात्मक लेखांक लिहून नरहर फाटक यांनी प्रकाशात आणले. ह्या महत्वाच्या लेखनामुळे फाटकांकडे महाराष्ट्रातील सुशिक्षितांचे लक्ष एक महत्त्वाचा चिकित्सक म्हणून प्रथमच वेधले गेले. माणसाचं माणूसपण शब्दांमध्ये पकडणा-या या साक्षेपी चरित्रकाराला संगीत, चित्रकला या विषयातही चांगलीच गती होती. पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिक्षणाचे धडेही गिरवले. ‘इंदुप्रकाश’ या मुंबईतील त्या काळी विशेष प्रसिद्ध असलेल्या दैनिकात वृत्तसंपादन करण्यापासून त्यांनी आपल्या साहित्यिक-पत्रकारी कारकिर्दीला प्रारंभ केला. निर्भीड, आक्रमक पत्रकार अशी त्यांची त्या काळी ख्याती होती. शिवाजी महाराज-समर्थ रामदास भेट आणि नारायणराव पेशवे खून कि आत्महत्या या दोन ऐतिहासिक विषयांवरील त्यांनी केलेले स्तंभलेखनही त्याकाळी खूप गाजले. त्यांच्या चरित्रलेखनाला सुरुवात झाली ती’ न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे’ या १९२४ साली लिहिलेल्या पहिल्या ग्रंथापासून त्यानंतर ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी, श्री एकनाथ : वाङ्मय आणि कार्य, ज्ञानेश्वर : वाङ्मय आणि कार्य, रामदास : वाङ्मय आणि कार्य यांसारखी अनेक ग्रंथ त्यांनी लिहले. इतिहासाचार्य राजवाडे यांच्यामुळे फाटक इतिहास संशोधनाकडे आकृष्ट झाले. मराठ्यांचा इतिहास हा त्यांच्या व्यासंगाचा विषय होता. त्यांच्या या व्यासंगी वृत्तीतूनच साकारलेले ‘मराठेशाहीचा अभ्यास’ आणि ‘अठराशे सत्तावन्नची शिपाईगर्दी’ हे त्यांचे इतिहासग्रंथही बरीच चर्चा घडवणारे ठरले.
व्यक्तीच्या कार्याला सामाजिक परिस्थिती आकार देत असते, व्यक्तीचे तिच्या काळाशी नाते असते ही जाणीव ठेऊन फाटकांनी अनेक चरित्रे लिहिली आणि त्यांनी लिहिलेल्या ‘गोपाळ कृष्ण गोखले’ यांच्या चरित्राला १९७० मध्ये ‘साहित्य अकादमी’चा पुरस्कार मिळाला. १९४७ साली हैदराबाद येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. अश्या या इतिहासाचा वेध घेणाऱ्या विचारवंत आणि भाष्यकार असणाऱ्या
नरहर फाटक
यांना पुण्यतिथि निमित्त
विनम्र अभिवादन!
मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल