शैक्षणिक विशेष वृत्तांत

 विद्यार्थी शिक्षकाशी विद्रोह करतो तेंव्हाशैक्षणिक

विद्यार्थी हा शिक्षकाचा आरसा असतो म्हणतात. आणि हे वाक्य जेव्हढं लहान त्यापेक्षा त्याचा अर्थ कित्येक पटित महान. शिक्षक कसा आहे, किती ज्ञानी आहे, त्याचे संस्कार, त्याचे मुल्य, त्याचे समाजभान, त्याची वैचारिक क्षमता आणि अशा सर्वांचा परिचय म्हणजे त्याचे विद्यार्थी होत. मी तर असं म्हणेल एका शिक्षकाचं मुल्यमापन करायचं ठरवलंत तर ते त्याच्या विद्यार्थ्याच्या मुल्यमापनावरून अगदी तंतोतंत खरे ठरेल. जसं एखाद्या योध्याचा परिचय हा त्याच्या बाणावरून, तलवारीवरून किंवा त्याच्या अचूक नेमावरून ठरवला जातो. अगदी तसंच एका शिक्षकाचा परिचय हा त्याच्या विद्यार्थ्यावरून होत असतो. म्हणून मी पहिल्याचं वाक्यात म्हटलं “विद्यार्थी हा शिक्षकाचा आरसा असतो.” आणि हे पुर्णतः खरे आहे. आपला भारत हा गुरु आणि शिष्य परंपरेने नटलेला आहे. लाखो वर्षापासून गुरु आणि शिष्यांच्या अनेक जगप्रसिध्द जोड्यांनी भारतीय इतिहास प्रगल्भ केला आहे. पारंपारीक अनेक धर्मग्रंथ, कथानके, पुराणे, महाभारत, वेद आणि तत्सम अनेक ग्रंथात अशा गुरु शिष्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी आपण ऐकत आलो आहोत. अगदी महाभारत काळात आपण पाहिलंत तर द्रोणाचार्य आणि अर्जून यांची जोडी सर्वश्रूत आहे. वचिष्ठ आणि राम यांची जोडी ही रामायणकालीन आदर्श गुरु शिष्याचं ध्योतक मानली जाते. त्यानंतरचा कालखंड पाहिला तर अनेक क्षेत्रात अशा जोड्या आपणास श्रुत आहेत. ज्यामध्ये आचार्य चाणक्य आणि राजा चंद्रगुप्त मौर्य, मां जिजाऊ आणि छ. शिवाजी महाराज, महात्मा गांधी आणि विनोबा भावे तसेच नेल्सन मंडेला इ. उदाहरणे आपणास देता येतील. ही सर्व यादी आपण पाहिलीत तर या गुरु शिष्याच्या जोड्यांनी एक आदर्श जगासमोर मांडला आहे. या सर्वांनी जीवनाला हेतू प्रदान करून जीवन जगण्याची आजपर्यंत असलेली मान्यता विष्कटवून देत नवी व्याख्याच जगाला दिली आहे. या सर्व शिष्यांचा परिचय किंवा दृष्टांत देत असतांना आपण त्यांच्या अगदी अंतर्मनाचा ठाव घेतल्यास असं लक्षात येतं की या सर्वच जोड्यांच्या जीवन जगण्यामध्ये एक विलक्षण प्रेरणा होती. एक अतोच्च सकारात्मक बदलाचा प्रामाणिक हेतू होता. आणि सर्वसामान्यांसाठी सुखाचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठीचा अट्टाहास होता. तत्कालीन परिस्थितीशी सर्वतोपरी झुंजून आणि प्रतिकुल परिस्थितीतही त्यावेळेच्या सामाजिक परिस्थितीशी अनेक प्रकारे विद्रोह करूनच हा बदल घडवता आला आहे. अगदी आजच्या काळातही अशी बोटावर मोजण्यासारखी काही ऊदाहरणे आहेतच. परंतू काळाच्या बदलत्या स्वरूपात हळूहळू शिक्षक आणि शिक्षणाच्या व्याख्या बदलू लागल्या आहेत. पुर्वी गुरु गृही राहून शिक्षण घेणं अभिप्रेत असायचं. आणि शिक्षणही त्या – त्या परिस्थितीशी एकरूप असंच असायचं. राज्याची मुले असतील तर त्यांना धनुर्विद्यासारखं शिक्षण, राज्य चालवण्याचं शिक्षण, युध्दाचं शिक्षण, नितीमुल्यांचं शिक्षण इ. शिक्षण दिलं जायचं. परंतू आज मात्र परिस्थिती फार बदलली आहे. संशोधन आणि विज्ञानाचे युग आले आहे. आज शिक्षणाची व्याख्याच बदलली आहे. स्वातंत्र्यापुर्वी इंग्रजांनी भारतात केवळ शिक्षण सर्वांना खुलं केलं परंतू त्यामागचा हेतू हा त्यांच्या हाताखालचा गुलाम किंवा नोकर निर्माण करणं हाच होता. म्हणून केवळ त्यांना अपेक्षित असलेला ( निव्वळ गावंढळ नसलेला ) फक्त चांगल्या क्षणतेचा गुलाम बनवणं हाच त्या शिक्षण पध्दतीचा उद्देश होता. आणि म्हणून त्यात नावीन्य, कल्पकता, वैचारिकता, नैतिकमुल्य, श्रमप्रतिष्ठा, प्रायोगिक पध्दती आणि विज्ञाननिष्ठा या गोष्टींना गौणत्य होतं. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आज पंचाहत्तरपेक्षा जास्त वर्ष होऊनही यात फारकाही बदल न करता आजही आपण हिच पध्दत वापरत आहोत ही खरी भारताची शोकांतिका आहे. शिक्षण आणि शिक्षण पध्दती यांच्या जास्त खोलात मी आत्ता जात नाही कारण त्यावर स्वतंत्र असं लेखन करावं लागेल. आणि आजचा तो विषयही नाही. केवळ आजच्या बदलत्या गुरु शिष्यांची पध्दत ही काळाची नांदी ठरणार आहे. आज शिक्षणाचे जसे पर्याय ऊपलब्ध झाले आहेत अगदी शिक्षकांचेही तसेच पर्याय ऊपलब्ध झाले आहेत. गुरु शिष्याचा संबंध आणि त्यांच्यातील नात्याचा ओलावा आज कमी होतांना दिसतो आहे. शिक्षणाचे ऑनलाइनसारखे पर्याय ऊपलब्ध झाल्याने तर ही संकल्पना अधिकच धुसर होत चालली आहे. आज शिष्याला खर्या गुरुचं महत्व लक्षात येत नाही तर काही गुरुही त्या क्षमतेचे किंबहुना अधिकारी राहिलेले नाहीत. परंतू हा नकारात्मक भाग सोडता आजही अनेक आदर्श उदाहरणेही पाहायला मिळतात. शेवटी काळ कितीही बदलो माध्यम बदलतील परंतू गुरुशिष्याचं हे नातं मात्र कधीचं संपणार हे मात्र निश्चित आहे. अनेक शिक्षक हे विद्यार्थ्यांसाठी आजही जीवाचं रान करतांना दिसतात तर एकीकडे मुलांनाच शिक्षकांना धडा शिकवावा लागतो. आजचाच एक प्रसंग सांगणार आहे. आता याप्रसंगातील धडा हा वेगळ्या प्रकारचा असला तरी खरं तळमळीने कार्य करणार्या हाड्याच्या शिक्षकांच्या डोळ्यात लख्ख अंजन घालणारा हा प्रसंग आहे. आज दुपारी मी जेवायला बसलो. जेवत असतांना एका हाताने जेवन करत होतो तर दुसर्या हातात मोबाईल चाळत होतो. तसं अचानक एक मुलगी माझ्या रूममध्ये आली आणि म्हणाली. ” सर मोबाइल बंद करून जेवन करा, आणि जेवन झाल्यानंतर मग मोबाईल बघा.” आणि जेवायला ती निघून गेली. तिचे शब्द ऐकताच माझ्या डोक्यात ‘काळोखात निपचीत पडलेल्या काळ्याकुट्ट ढगात लख्खं प्रकाशित होऊन सळसळत वीज चमकावी आणि अखंड आसमंत प्रकाशीत व्हावा’ तसा झणकन प्रकाश पडला आणि नकळत एका क्षणातच मोबाईल खाली ठेवला गेला. मी काही काळ विचारातच होतो. अनेकवेळा वर्गात शिक्षकास प्रश्न का विचारत नाहीस अशी विचारना करता “मला सरांची भिती वाटते.” अशी सहज वाक्य बोलणारी मुलं आज किती धाडसी आणि निडर झाली आहेत. “सर तुम्ही चुकीचा अंक घेतला, सर या प्रश्नाचं उत्तर हे नाही तर हे आहे, सर याचं उत्तरच निघत नाही, सर पुस्तकात तर वेगळंच दिलं आहे, सर आम्हाला तर असं शिकवलं होतं.” अशी वाक्य आता रोज ऐकू येतातच परंतू आज तर चक्कं आपल्या वैयक्तिक आवडी-निवडीवरच मुलांनी बोट ठेवलं होतं. बिंधास्तपणे आणि भितीरहित मुलांनी शिक्षकांशी वागावं हे आजचं संशोधन सांगतं. आणि तसं काही अंशी होतांना दिसतसुध्दा आहे. गुरुकुलात तर प्रथम आई, वडील, भाऊ, मित्र आणि नंतर शिक्षक अशा चौफेर भुमिका शिक्षकास पार पाडाव्या लागतात. मुलीने केलेली सुचना खरंतर आरसा दाखवणारी होती. माझ्या मनाला त्याघटनेने दिवसभर चिंतन करण्यास भाग पाडलं. दुपारी सरश्रींचे प्रवचन ऐकलं त्यातही अंतर्मनाचं चिंतन करतांना सरश्री सांगून गेले. “वर्तमानात जगा.” आता याचा अर्थ काय? असा विचार करून मी मनन करायला सुरुवात केली तर माझ्या मनाने “वर्तमानात जगा.” याचा अर्थ आपण जे कार्य करत आहोत त्याच कार्यात स्वतः रमवून घ्या. शरिर आणि मन यांना एकत्र करून ते कार्य करा असंच सरश्रींना अपेक्षित असावं असा निष्कर्ष मी काढला. जेवत असाल तर फक्त जेवनच करा. जेवतांना आपण मोबाईल पाहाणे, इतर गप्पागोष्टी करेण किंवा अजून खोलात गेलं तर कुठल्या तरी दुसर्याच विचारात गुरफटून जात जेवन करणे हे वर्तमानात जगणे नव्हे असं मला वाटलं. आणि परत दुपारचा प्रसंग आठवला. आपण नेहमी मुलांना ऊपदेशाचे डोस तर पाजतो परंतू स्वतः आचरणात किती आणतो? असा विचार सतत माझ्या मनात घोळू लागला. नव्हे तो मला बोचू लागला. एका दहा वर्षाच्या मुलीनं आपल्याला सांगावं “सर ही सवय चांगली नाही.” अगोदर शांत जेवा आणि मग पहा.” खरं सांगू का हा विचारसुध्दा त्या मुलीच्या मनात तेंव्हाच आला असावा जेंव्हा तिला माझ्याविषयी नितांत प्रेम आणि आदर असेल. कारण रोज आपणास चांगल्या सवयीचे धडे देणारे सरही कधीकधी वाइट सवयींना आपलंस करतात हे पाहून त्यांना ते सरांनी बंद करावं वाटणं यात वेगळेपणाचं काहीच नाही. परंतू हा प्रसंग आणि हे शब्द म्हणजे एका विद्यार्थ्यानं शिक्षकासोबत केलेला विद्रोहच म्हणावा लागेल. जिथं वर्गात प्रश्न विचारावा की नको अशी मनस्थिती असते तिथे आपण चक्क शिक्षकास त्याच्या चुकीच्या सवयीबद्दल बोलणं हा विद्रोहच म्हणावा लागेल. परंतू यातून क गोष्ट मात्र निश्चितच झाली मी आजपासंन जेवतांना मोबाइल न वापरण्याचं वचन मात्र तिला देऊन टाकलं आणि तिच्या चेहर्यावरचा आनंद मात्र शब्दातीत होता. त्याचबरोबर एकेक विद्यार्थी हा माझ्यासाठी कादंबरीचा नवीन विषय सापडंत असल्याचं जाणवतं आहे.

प्रा. पी.डी. सोळंके.

संचालक – ज्ञानसाधना गुरुकुल आष्टी

संपर्क – 091305 96216

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल