या जगण्याला हेतू मिळाला…

व्यसनमुक्ती…

जागतिक आरोग्य संघटनेने कॅन्सर होण्याची जी काही कारणे शोधून काढली त्यातील पहिले दोन म्हणजे अनुक्रमे दारू एक नंबर व तंबाखू दोन नंबरवर आहे.

 वाढते हृदयरोग, मधुमेह, फुफ्फुसासंबंधीत रोग, फॅटीलीव्हर, आतड्याचे रोग, कॅन्सरसारखे अत्यंत भयानक रोग यांचं संशोधन करत असतांना अनेक भयावह आकडे आणि परिस्थिती समोर आली आहे. अजून दहा वर्षानंतर प्रत्येक 100 माणसापैकी एक व्यक्ती कॅन्सरग्रस्त असेल असं संशोधन सांगतंय. या संशोधनाची कारणमिमांसा केली तर लक्षात येतय यापैकी सर्वात जास्त रोग होण्याची कारणे दारू आणि तंबाखू आहे. आणि आम्ही जेंव्हा याबद्दल मुलांना सांगितलं तेंव्हा अक्षरशः काही मुलांच्या डोळ्यांत पाणी होते. 

   एक मुलगा मधेच ऊठून ऊभा राहिला साधारणतः सहावी- सातवीतला मुलगा आहे. त्याने स्वतःहून मुलांना सांगायला सुरुवात केली. “माझे वडील नुकतेच एका ॲक्सिडेंटमधून बाहेर आलेत. ते किमान 40 दिवस आय.सी.यू. मध्ये बेशुध्दावस्थेत होते. त्यांच्या हृदयात दोन लीटर पाणी झाले होते. आणि हृदयाला इन्फेक्शन झाल्याचं डॉक्टर सांगत होते.”

त्या 40 दिवसाचं वर्णन करतांना अक्षरशः तो ओक्साबोक्सी रडत होता. त्याच्यासोबत इतर मुलेही रडत होती. तो म्हणतो ” मुलांनो माझी आई आणि माझे बाबा हे माझे सुपरहिरो आहेत. मी त्यांच्यावर खुप प्रेम करतो. माझे वठील हे घरातले कर्ते. त्यांच्यावर आमचं अख्खं कुटुंब आहे. माझी आई आणि माझी बहिणही त्यांच्यावर खुप प्रेम करतो. पण त्यांना व्यसन लागलं. ते रोज व्यसन करूनच घरी यायला लागले. एका दिवशी त्यांना त्यांच्या मित्रांचा फोन आला आणि ते पार्टी करायला गेले. रात्री ऊशीर झाल्यावर ते एकटेच घराकडे निघाले. त्यांच्या मित्रांनी त्यांना एकटंच सोडलं. खुप दारू सेवन केलेली असल्याने त्यांना अंधारात गाडी चालवायची कळत नव्हती. अतिशय जोरात वेगाने गाडी पळत होती. अंधारी रात्र असल्याने व्यवस्थित दिसत नव्हतं त्यात माझ्या बाबांनी खुप दारू पिल्याने त्यांचे डोळे आपोआप झाकत होते. अचानक रस्त्यात एक वळण रस्ता आला. तिथे रोडच्या मध्यभागी डिव्हायडर लावलेले होते. ते माझ्या बाबांना दिसलेच नाहीत. आणि त्यांची गाडी जोरात जाऊन त्या डिव्हायडरला धडकली. ते खाली पडले. त्यांच्या डोक्याला व छातीला खुप मार लागला. आमच्या घरी कुणीतरी फोन करून सांगितलं. तसं घरचे त्यांना घेऊन संभाजीनगरला दवाखान्यात ॲडमीट केलं. ते बेशुध्दच होते. मी त्यावेळी गुरुकुलातच होतो. सरांना घरून फोन आला होता पण सरांनी मला याबाबद काहीच सांगितलं नाही. कदाचित घरूनच त्यांना तसं सांगितलं असावं. माझा मामा, चुलते मला भेटायला यायचे पण वडील येत नव्हते. एरवी आठ-पंधरा दिवसाला भेटायला येणारे वडील एक महिना झाला तरी फोन नाही, भेटायलाही आले नाहीत हे पाहून मलाही कसंतरी वाटायला लागलं. आणि एके दिवशी सरांनीच मला सांगितलं आपल्याला तुझ्या गावाकडे जायचे आहे. आणि मी ही अगदी आनंदात निघालो. मला वाटलं सर आपल्या गावाकडं काही कामानिमित्त जात असतील. कारण मला वडलांच्या अपगाताविषयी काहीच माहित नव्हतं.

सर आणि मी परतुरपर्यंत मोटरसायकलने गेलोत आणि तिथे रेल्वेत बसलोत. मी विचार करू लागलो. आपलं गाव तर पिंपळगाव जवळ आहे आणि सर मला रेल्वेने कुठे नेत आहेत? त्यात सरांनी संभाजीनगरचे तिकिट काढले. मग तर माझ्या मनात अजूनच शंका निर्माण होऊ लागली. पण सरांना विचारणार कसं? म्हणूण पाहू काय होतं ते असा विचार करून गप्पच राहिलो. खरंतर मला अजून जास्त आनंद याचा वाटत होता की मी प्रथमच रेल्वेत बसलो होतो. आयुष्यात इतक्या जवळून रेल्वे कधीच पाहिली नव्हती. आणि रेल्वेतून दिसणारं निसर्ग सौंदर्य पाहाण्यातच मी रममाण होतो. बाकीचे वाहनं कसे हालतात. रेल्वेत मात्र अगदी छान बसून न हालत ती धावत असल्याचा नवा अनुभव मी घेत होतो. मनात मात्र अनेक विचार घोळत होतो. आपण नेमकं चाललो आहोत कुठे? हा प्रश्न अनुत्तरीत होता. गप्प बसून मी खिडकीतून बाहेरचं दृश्य बघत होतो.

जालना रेल्वेस्थानक आलं आणि गाडी थांबली. काही लोकं खाली ऊतरले आणि त्यास्टेशनवरचे लोकं गाडीत बसले. ती लगबघ सुरु असतांनाच मला माझे चुलत आजोबा आणि चुलता दिसले. आणि त्यांनाही मी दिसलो. सरांना ते ओळखत असल्याने ते लगेच जवळ आले आणि म्हणाले. बरं झालं तुम्ही दिसले. खरंतर मी जास्तच आनंदात होतो कारण आता आजोबापण सोबत होते. पण हळूहळू माझ्या तोंडचं पाणी पळू लागलं. कारण सरांच्या आणि माझ्या आजोबांच्या संवादाचे शब्द जेंव्हा माझ्या कानावर पडले.

ते म्हणाले “सर आज 28 दिवस झालेत पेशेंट दवाखान्यात आहे. अजून शुध्दीवर नाही. आधी मेंदूला मार असेल म्हणून मेंदूच्या दवाखान्यात घेऊन गेलोत. तिथे चार दिवस ठेवलं परंतू शुध्दीवर पेशेंट येत नसल्याने डॉक्टरांनी हृदयाच्या दवाखान्यात पाठवले. तिथे गेल्यानंतर समजले त्यांच्या डोक्याला नाहीतर छातीला मुका मार लागला होता. आणि त्यात पाणी झालं होतं.”

आता हे आजोबांचे शब्द आणि चेहर्यावरील भाव पाहून सर म्हणाले “फारच भयानक झालं.” मला कुणीतरी फोन करून सांगितलंय की मुलाला घेऊन दवाखान्यात या. डॉक्टरांनी पेशेंट वाचण्याची शक्यता कमी असल्याचं सांगितलंय. आणि मग मी याला घेऊन आलोय.

“सरांचे हे शब्द ऐकताचं माझ्या मनात टरक्कन झालं. आणि मला लखेच संशय आला. माझ्याच वडीलांना काहीतरी झालं असावं. ते दवाखान्यात ॲडमीट आहेत आणि आपल्याला कुणीच सांगितलं नाही. तरीच म्हणलं इतके दिवस त्यांचा फोन नाही, भेटायला का? आले नाहीत. आणि आता ते शेवटच्या घटका मोजत आहेत. आता मला रडावे की काय करावे तेच सुचेना. माझ्या मनात चलबिचल सुरु झाली. कशातच मन लागेना. बाहेर रेल्वेतून दिसणार्या नजार्यावर जी माझी नजर खिळली होती. ती क्षणार्धात बदलली होती. मला होत्याचं नव्हतं झाल्यासारखं वाटत होतं. वडलांचे अनेक प्रसंग जसेच्या तसे नजरे समोर येऊ लागले. त्यांनी बोललेले शब्द, गुरुकुलात भेटायला आल्यानंतर बाहेर घेऊन गेलेले. घरात, शेतात आणि सगळीकडे त्यांचा असणारा वावर आणि सगळंच नजरेसमोर दिसू लागलं. आपले वडील आता कोणत्या स्थितीत असतील हे कळायला तयार नव्हतं. कधी त्यांना पाहू अन् कधी नाही असं जालं होतं. आणि आईचीही काळजी वाटू लागली.

“आत्ता आई कुठंय?” असं चटकन आजोबांना विचारलं. “दवाखान्यातच हे.” ते म्हणाले. मी होकारार्थी नुसती मान हलवली.

सर हळूच म्हणाले “मी अजून याला काहीच सांगितलेलं नाही.” आणि आजोबा भेटल्यामुळे ते दवाखान्यातच जात आहेत हे कळल्यावर सरांनी मला त्याच्या हवाली करून तुम्ही याला गेऊन जा मी थोडं काम करतो म्हणून ऊतरले.

मी आजोबांसोबत दवाखान्यात गेलो. इतका मोठा दवाखाना होता की, खुप सारे मजले त्याला होते. आम्ही पायर्या चढत वर गेलो. तर पायर्यावरच बसलेली माझी आई मी पाहिली. तिची अवस्था पाहून मला रडूच कोसळलं. आणि मला पाहून तिलाही रडू कोसळलं. आम्ही दोघंही एकमेकांच्या गळ्यात पडून रडू लागलोत. माझ्या आईची तब्बेत जणू महिनाभरात ती एकदाही जेवली नसावी अशीच झाली होती. नुसता हाडांचा सापळा जाला होता. आणि तिच्यासोबत माझे आजोबा होते. तेही सारखे चिंतेत होते.

गावाकडून आलेल्या चुलत आजोबांना व चुलत्यांना आजोबा सांगू लागले. “डॉक्टर सकाळी म्हणलाय पेशेंट घरी घेऊन जा. इलाज होत नाही. इन्फेक्शन कमी होत नाही. पण डॉक्टरला म्हणलं “डॉक्टरसाहेब आमचं पेशेंट जोपर्यंत जीवंत आहे तोपर्यंत आम्ही इथंच ठेवणार आहोत. कितीही पैसे लागू द्या पण पेशेंट इथेच राहू द्या आणि उपचार चालू ठेवा.” हे सांगतांना आजोबांच्या डोळ्यात अश्रू तरंगत होते. आपले डोळे पुसतच ते बोलत होते. आम्ही सर्वजण रडत होतोत.

मी पप्पाला पाहू का? असं मी आईला विचारलं. तर आई म्हणाली “लहाण मुलांना ते मधी जाऊ देत नाहीत.” मला मात्र त्यांना खुप पाहू वाटत होतं.

काही वेळानं मी चुलत आजोबांसोबत गावाकडे आलो. आणि नंतर सर भेटायला आल्याचं कळलं. त्यानंतर पुन्हा 10 ते 15 दिवस वडील दवाखान्यातच होते परंतू एकदोन दिवसानंतर परिस्थिती सुधरत असल्याची बातमी डॉक्टरांनी दिली. “आता फक्त देवाच्याच हातात आहे. आम्ही तर आशा सोडली होती परंतू अचानक झालेला बदल पाहून आम्हीही आश्चर्यचकीत आहोत” असं डॉक्टर म्हणू लागले.

आई व आजोबांना अजूनच धीर आला होता. सगळ्यांच्या आशा आता जाग्या झाल्या होत्या. आता माझे वडील वाचणार असं आम्हा दोघा बहिण-भावाला वाटू लागलं. आणि खरोखरच काही दिवसातच त्यांची प्रकृती झपाट्याने सुधारली. ते काही दिवसांनी शुध्दीवर आले. पाहू लागले, बोलू लागले. आता डॉक्टरसोबत आई व घरच्या सर्वांनाच आनंद होत होता.

तब्बल चाळीस दिवस ते बेशुध्दावस्थेत होते. त्यानंतर त्याची परिस्थिती बरी झाली. आणि त्यांना अजून काही दिवस जवळपास आय.सी.यू. आणि नंतर साध्या वार्डात असं एकुण दोन महिने ते दवाखान्यात होते. असं म्हणतात की माणसाचं कोर्टषकटेरी, पोलीस स्टेशन आणि दवाखान्याची पायरीही चढू नये. आणि आमचे वडील, आई, आजोबा आणि एकुणच संगळ्या कुटुंबाला दोन महिने दवाखान्यात राहाण्याचा प्रसंग पडला होता. त्या प्रसंगातली आमची स्थिती तशी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. पण मला जितकं आठवतं तितकं मी सांखितलं आहे.

मित्रहो आज सहा महिने झाले या प्रसंगाला पण अजूनही माझ्या वडीलांना दवाखाना, गोळ्या औषध सुरु आहेत. त्यांच्या छातीला आणि गळ्याला छिद्र पाडून त्यात नळ्या टाकलेल्या होत्या. त्यातून सतत घाण पाणी बाहेर पडायचे. आणि हळूहळू ते कमी होत गेले. त्यांची झालेली अवस्था आम्हाला ऊघड्या डोळ्यांनी पाहावत नव्हती. पण परिस्थिती आणि आलेल्या प्रसंगाला आम्ही मोठ्या धिराने सामोरे गेलो.

पण या प्रसंगातून तुम्हाला एकच गोष्ट सांगतो. जर माझ्या वडलांना काही झालं असतं तर आमचं जगणं अवघड झालं असतं. माझ्या आईची परिस्थिती तर मी विचारही करू शकतं नाही. त्यांच्यानंतर ती जगली असती की नाही तेही सांगता येत नाही. तसंच या प्रसंगात आमच्या वडीलांच्या दवाखान्यासाठी लाखो रूपयांचा खर्च आला. आम्हाला त्या पैशापेक्षा आमच्या वडीलांचं जीवन महत्वाचं होतं.

हे सगळं घडण्याला कारणच व्यसन आहे असं मला वाटतं. माझे वडील जर त्यादिवशी पार्टिला गेले नसते. त्यांनी व्यवसनाची सवय लावून घेतली नसती तर हा प्रसंग आमच्यावर ओढावला नसताच. म्हणून मी ठरवलंय यापुढे मी माझ्या वडीलांना तर सोडाच पण माझ्या जवळच्या एकाही माणसाला व्यसन करू देणार नाही आणि व्यसनमुक्तीसाठीच मी माझं आयुष्य वेचणार आहे. त्यासाठी मी ठरवलंय मी व्यसनमुक्ती दुत होऊन माझ्या जीवनाचा हेतूच व्यसनमुक्ती करणार आहे.

हा प्रसंग ऐकतांना माझ्यासह सर्वच मुलांच्या डोळ्यात पाणी होतं. आणि त्यानंतर प्रत्येक मुलांनी आपल्या वडीलांना एकेक पत्र लिहिलं आहे. त्यातील अनेक पत्र हे इतके भावनिक आहेत की ज्या पालकांनी ते वाचले आणि त्यांना जर आपल्या लेकरांवर खरं प्रेम असेल तर ते निश्चितच तंबाखू, पुडी, गुटखा, दारू इ. व्यसन करणार नाहीत.

प्रा. पी.डी. सोळंके
संचालक – ज्ञानसाधना गुरुकुल आष्टी

091305 96216

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल