स्वराज्य वार्ता / प्रदीप वक्ते
परतूर प्रतिनिधी : परतूर तालुक्यातील गंगासावंगी ग्रामपंचायतीने शाळा आणि अंगणवाडी दुरुस्तीच्या नावाखाली काम न करताच लाखो रुपयांची बिले काढल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.याकडे वरिष्ठांचे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे प्राप्त कागदपत्रांनुसार,गंगासावंगी ग्रामपंचायतीने वर्गखोलीच्या फरशीचे बांधकाम आणि देखभाल दुरुस्ती या नावाखाली १ लाख ८० हजार रुपयांचे बिल एका खासगी आस्थापनेला दिले आहे. तर अंगणवाडीतील बालस्नेही शौचालय बांधकाम आणि दुरुस्ती या नावाखाली ७७ हजार ९९९ रुपयांचे दुसरे बिल काढण्यात आले आहे. दोन्ही बिले २० फेब्रुवारी २०२५ रोजी काढण्यात आल्याचे कागदपत्रांवरून दिसते.मात्र प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली असता या नावाने दाखवलेली कामे झालेलीच नाहीत, असा दावा ग्रामस्थ करत आहेत. शाळेच्या वर्गखोलीची फरशी जैसे थे असून, अंगणवाडीतील शौचालयाचे आणि दुरुस्तीचे कामही केवळ कागदावरच असल्याचे चित्र आहे.काम न करता केवळ कागदपत्रांवर काम दाखवून शासकीय निधी लाटण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप होत आहे.ग्रामस्थांनी अनेक वेळा वरिष्ठांकडे तक्रारी करूनही त्यांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याने भ्रष्टाचाराला खतपाणी मिळत असल्याची चर्चा गावात सुरु आहे.या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






