स्वराज्य वार्ता / पी डी सोळंके
पाथरी प्रतिनिधी : दि. १२/ बदलत्या शिक्षणव्यवस्थेत केवळ गुण, पदवी किंवा पारंपरिक करिअरच्या चौकटी पुरेशा राहिलेल्या नाहीत. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास, त्यांच्या आवडीनिवडींचा सन्मान, कौशल्यांचा विकास आणि योग्य वेळी मिळालेले योग्य करिअर मार्गदर्शन हीच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खरी गुरुकिल्ली आहे. “पालकांनी मुलांच्या पावलांसमोर प्रकाश ठेवावा; आपल्या अपेक्षांच्या सावल्या नाही,” असे प्रतिपादन विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख यांनी केले.
येथील सरस्वती अकॅडमी, पाथरी येथे प्रा. संदीप टेंगसे यांच्या पुढाकाराने आयोजित विद्यार्थी करिअर मार्गदर्शन व पालक संवाद मेळाव्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छगन टेंगसे होते, तर ज्ञानसाधना गुरुकुल, आष्टी येथील प्रा. पी. डी. सोळंके हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षणप्रेमी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
प्रा. रफीक शेख यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, आजच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डिजिटल तंत्रज्ञान, डेटा सायन्स, ऑटोमेशन, कौशल्याधारित शिक्षण आणि जागतिक रोजगार बाजारपेठ यामुळे करिअरचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पारंपरिक विचारसरणीच्या पलीकडे जाऊन नव्या संधींचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
ते म्हणाले, “प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो. प्रत्येकाची बुद्धिमत्ता, शिकण्याची पद्धत, क्षमता, स्वप्ने आणि आवड वेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाला एकाच मापदंडाने मोजणे चुकीचे आहे. पालकांनी मुलांवर अपूर्ण स्वप्नांचे ओझे टाकण्याऐवजी त्यांच्या सुप्त क्षमतांना वाव देऊन त्यांना स्वतःचा मार्ग निवडण्यास सक्षम केले पाहिजे.”

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांमधील वाढता मानसिक ताण, स्पर्धेचे दडपण, सोशल मीडियाचा प्रभाव, अनियंत्रित स्क्रीनटाइम, मूल्यशिक्षणाची गरज, भावनिक आधाराचे महत्त्व आणि कौशल्याधारित शिक्षण या विषयांवरही सखोल मार्गदर्शन केले.
“मुलांच्या गुणपत्रिकेपूर्वी त्यांच्या मनाची अवस्था समजून घ्या. कमी गुण म्हणजे आयुष्याचा पराभव नसतो; मात्र हरवलेला आत्मविश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो,” असे त्यांनी सांगितले.
पालकांनी मुलांशी सातत्याने संवाद साधावा, त्यांना ऐकून घ्यावे, त्यांच्या प्रश्नांना संवेदनशीलतेने समजून घ्यावे आणि बदलत्या जगातील करिअरच्या नव्या संधींची ओळख करून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच शिक्षणाचा उद्देश केवळ पदवी मिळवणे नसून विवेक, चारित्र्य, सामाजिक बांधिलकी, माणुसकी आणि स्वावलंबन विकसित करणे हा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संवाद सत्रात उपस्थित पालकांनी विद्यार्थ्यांच्या करिअर निवडी, उच्च शिक्षण, कौशल्याधारित अभ्यासक्रम, कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव, स्पर्धा परीक्षा, डिजिटल शिक्षण आणि बदलत्या रोजगार संधी याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. प्रा. रफीक शेख आणि प्रा. पी. डी. सोळंके यांनी प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर आणि व्यावहारिक उत्तर देत पालकांच्या शंकांचे निरसन केले. या संवादात्मक सत्राला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. रफीक शेख यांनी कार्यक्रमाचे आयोजक प्रा. संदीप टेंगसे, अध्यक्ष छगन टेंगसे, प्रमुख अतिथी प्रा. पी. डी. सोळंके, सरस्वती अकॅडमी परिवार तसेच उपस्थित सर्व पालक, विद्यार्थी आणि मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले. अशा प्रकारचे विद्यार्थी-पालक संवाद, करिअर मार्गदर्शन आणि कौशल्याभिमुख शैक्षणिक उपक्रम ग्रामीण भागात सातत्याने राबविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कृष्णा दराडे ह्यांनी केलं आणि नियोजन सरस्वती अकॅडमीच्या वतीने करण्यात आले. उपस्थित पालकांनी हा उपक्रम काळाची गरज असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याची भावना व्यक्त केली.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






