स्वराज्य वार्ता प्रतिनिधी मारोती पाटील वडजे
मुखेड तालुक्यातील तांदळी शिवारातील आखाड्यावर झोपलेल्या एका तरुणाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना १६ सप्टेंबर रोजी पहाटे घडली आहे. याबाबत माहिती प्राप्त झाल्यावर वनविभागाचे कर्मचारी ढगफुटीसदृश पावसामुळे घटनास्थळापर्यंत जाऊ शकले नाहीत. मात्र पोलिस निरीक्षक लक्ष्मणराव केंद्रे यांनी मंगळवारी सायंकाळी पाण्यातून मार्ग काढत घटनास्थळ गाठले.
तांदळी येथील जनार्दन उत्तमराव जाधव (वय ३५) हे सोमवारी संध्याकाळी गावालगत असलेल्या शेतातील आखाड्यात मुक्कामी गेले होते. रात्री ते
आखाड्याच्या पत्रावर झोपले होते. दरम्यान, मंगळवारी पहाटे बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला, त्यांच्या गळ्यावर व हातावर बिबट्याच्या नखांचे व्रण स्थानिकांना दिसून आले. पोलिस पाटील श्रीनिवास पेंढारकर यांनी मुखेड पोलिसांत याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक लक्ष्मणराव केंद्रे, फौजदार संदीप यमावार यांनी घटनास्थळी भेट दिली.
वनक्षेत्रपाल उत्तम चव्हाण यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता. मंगळवारी रात्री १० वाजता वनपाल मारोती पानगटवाड व खरात हे घटनास्थळाकडे निघाले. मात्र ओढ्याला पूर आल्याने ते पोहोचू शकले नाहीत. या घटनेमुळे मुखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली असून शेतकरी धास्तावले आहेत.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






