स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा उत्सव हा समाजातील प्रत्येकासाठी महत्वाचा असतो. याच भावनेतून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी आणि जिल्हा कारागृह, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हा कारागृहात पुरुष व महिला न्यायालयीन बंदींसाठी रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमादरम्यान अनेक कैद्यांना आपल्या बहिणींनी राखी बांधताना डोळ्यांत आनंदाश्रू दाटले. त्या भावनिक क्षणी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व पाहुणे यांचेही डोळे पाणावले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उज्वला म. नंदेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव भुषण म. काळे उपस्थित होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “भारतीय संविधान प्रत्येक व्यक्तीला जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क प्रदान करते. न्यायालयीन बंदी हा सुध्दा समाजातील एक नागरिक असून त्याला कुटुंबीयांपासून वंचित ठेवले जाऊ नये. रक्षाबंधन हा सण कैद्यांसाठी भावनिक असतो, कारण त्यांचे देखील बहिणी-भावंडे आहेत. म्हणून त्यांनाही हा सण साजरा करण्याची संधी मिळावी यासाठी हा उपक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमासाठी कारागृह अधीक्षक आर. व्ही. मरळे यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तुरुंग अधिकारी स्वाती जाधवर यांनी केले. यावेळी जिल्हा कारागृहातील अधिकारी व कर्मचारीवृंद, सपोनि. बालाजी पुंड, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातील कर्मचारी तसेच कैद्यांचे भाऊ-बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा उपक्रम भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा अधोरेखित करणारा ठरला. समाजापासून तात्पुरते दूर असलेल्या कैद्यांनाही आपल्या कुटुंबीयांसोबत सण साजरा करण्याची संधी मिळाल्याने वातावरणात भावनिक उबदारपणा पसरला.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






