छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त ‘सामाजिक न्याय दिन साजरा

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी  

 

छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होते. समाजातील शोषित, वंचित आणि उपेक्षित घटकांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी आपल्या राजेपदाचीही पर्वा न करता कार्य केले. समतेच्या मूल्यांसाठी त्यांनी जातीय बंधनांवर प्रहार केला, असे मनोगत परभणी महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव यांनी व्यक्त केले.

सामाजिक न्याय विभाग व सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय परभणी यांच्यावतीने शिवाजी महाविद्यालय सभागृहात छत्रपती राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी मनपा आयुक्त धैर्यशील जाधव बोलत होते, यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र विभागाचे संचालक प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार डॉ. संदीप राजापुरे, उपप्राचार्य श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्य नारायण राऊत, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद लोणकर, समाजकल्याण अधिकारी एस. के. भोजणे तसेच कार्यक्रम संयोजक सहाय्यक आयुक्त राजू एडके यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संविधान उद्देशिकेची प्रत देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. वसंत अनुसूचित जाती आश्रमशाळा, कारेगांव येथील शाहू महाराजांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. मुंजाजी कांबळे यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. निवासी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.

यावेळी प्रमुख व्याख्याते प्रा. डॉ. गोणारकर म्हणाले, “छत्रपती शाहू महाराजांचे मन कष्टकरी, भूमिहीन आणि उपेक्षित जनतेच्या वेदनेने हेलावलेले होते. त्यांच्या अंतःकरणात प्रचंड वात्सल्य होते आणि सामाजिक समतेची तीव्र तळमळ होती. त्यांनी शिक्षण सर्वांसाठी सक्तीचे आणि मोफत केले. मराठा, मुस्लिम, जैन,दलित लिंगायत अशा सर्व जातीधर्मातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहांची स्थापना केली. शिक्षण संस्थांच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाचे कार्य त्यांनी केले. तहसीलदार डॉ. राजापुरे, डॉ. लोणकर व प्रा. नागनाथ राऊत यांनीही मार्गदर्शनपर विचार मांडले.

प्रास्ताविक करताना सहाय्यक आयुक्त राजू एडके यांनी सांगितले की, शाहू महाराजांचे कार्य आजही समाजातील विषमतेची दरी कमी करण्यासाठी मार्गदर्शक ठरत आहे. त्यांचे विचार अंगीकृत करणे हाच या उपक्रमाचा हेतू आहे, असे सांगितले आहे.

सुत्रसंचालन रेवणअप्पा साळेगावकर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी 26 जुन हा जागतीक अंमली पदार्थ विरोधी दिन असल्याने व्यसनमुक्तीची शपथ घेण्यात आली आणि व्यसन पदार्थांची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजकल्याण विभागातील सहाय्यक आयुक्त कार्यालयाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल