स्वराज्य वार्ता प्रतिनिधी : दिनेश दिलिप सूर्यरावमुरबाड : पाणीटंचाईच्या वणव्याने अवघा महाराष्ट्र होरपळत असतांना मुरबाड तालुक्यातील गाव, खेडोपाडी पाण्यासाठी वणवण भटकंती करतांना नजरेस पडत आहे. त्यामुळे मुरबाड तालुक्यात जल जीवन मिशनचा पुरता बोजवारा उडाल्याचे सिद्ध झाले असून याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलरने ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी घुगे यांना निवेदन देऊन दोषी ठेकेदारांवर कारवाईची मागणी केली आहे.
उन्हाळ्याची चाहूल लागली की मुरबाड तालुक्यातील महिलांच्या डोक्यावर हंड्यांचा ओझा वेताळासारखा चढून बसलेले चित्र सर्वदूर पाहायला मिळत असते. हे चित्र बदलण्यासाठी सरकारने कोट्यवधी रुपयांची जल जीवन योजना अंमलात आणली परंतु , लोभी लोकप्रतिनिधी, ठेकेदार व भ्रष्ट प्रशासनामुळे मुरबाड तालुक्यातील जल जीवन मिशन योजना निष्फळ ठरल्याच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत. याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्षाने पुढाकार घेऊन तालुक्यातील भीषण पाणीटंचाई विरोधात ठाणे जिल्हा अध्यक्ष रविंद्र चंदने यांच्या नेतृत्वाखाली एल्गार पुकारला आहे.
मुरबाड तालुक्यातील जल जीवन पाणी पुरवठा योजनेची कामे अंत्यत सुमार व संथ गतीने होत असून अनेक गावात भीषण पाणी टंचाई उदभवली असल्याचे सदर पत्रात म्हंटले आहे. तर मुळ ठेकेदार हे गावात, कामाच्या ठिकाणी येत नसून सब ठेकेदारामार्फत ही कामे करून घेतली जात असल्याचा गंभीर आरोप सदर पत्रातून करण्यात आला आला आहे. तसेच या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरींना पुरेसा पाणी उपलब्ध नसताना ही त्या पाणीसाठ्यावरच नळ योजना पूर्ण करण्याचा घाट अधिकाऱ्यांनी घातल्याने तालुक्यातील अपयशी ठरलेल्या या योजनेंच्या कामांचे बिल सब ठेकेदारांना अदा करण्यात आल्याचे पक्षाचे म्हणणे आहे.
मात्र ज्या गावात भीषण पाणी टंचाई आहे त्या गावाना त्वरित टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात यावा. तसेच जल जीवन योजनेचे काम सुरु असणाऱ्या गावात पाणी टंचाई बाबत ठेकेदाराला दोषी धरून त्यांच्यावर व संबंधित पाणी पुरवठा अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी पक्षाचे मुरबाड तालुकाध्यक्ष लक्ष्मण खोळंबे, युवाध्यक्ष राजेश गायकवाड, सचिन धनगर, रविंद्र गायकवाड, निखिल अहिरे, अविनाश रातांबे व इतर पदाधिकारी यांनी सीइओ घुगे यांच्याशी चर्चा करून तालुक्यातील पाणीटंचाई बाबत वास्तव परिस्थिती विशद केली व लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी कल्पना दिली. तर याबाबत पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!