अर्जन सिंह

१९६५ चे भारत पाकिस्तान युद्ध म्हणजेच सगळ्यांच्या स्मरणातून कधीही न पुसल्या जाणारी आठवण. पण ह्या युद्धाचा एक महानायक काळाच्या पडद्याआड गेला आहे. आणि तसंच आपल्या आठवणींच्याही पडद्याआड गेला आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. तो महानायक म्हणजे अर्जन सिंग. क्रिकेटच्या मैदानावर एखाद्या खेळाडूच्या शतकापेक्षाही त्याची खेळी संघासाठी किती उपयुक्त ठरली यावर त्याचे मोल ठरते, त्याअर्थाने विचार केला तर अर्जन सिंह यांची रणांगणातली खेळी जागतिक क्रमवारीत अव्वल दर्जाची ठरणारी आहे.
अर्जन सिंग हे ‘मार्शल ऑफ द एअर फोर्स’ (पंचतारांकित रँक) हे पद भूषविणारे एकमेव अधिकारी होते. ७० वर्षांची स्फूर्तिदायी कारकीर्द, भारतीय हवाई दलाचे पहिले आणि एकमेव मार्शल अर्जन सिंग यांनी आधी हवाई दलाचे प्रमुख म्हणून व नंतर राज्यपाल, प्रशासक व राजदूत म्हणून सुमारे ७० वर्षांच्या स्फूर्तिदायी कारकीर्दीत बहुमोल देशसेवा केली. लष्करातील ‘फिल्ड मार्शल’शी समकक्ष असा हवाईदलाचे ‘मार्शल’ असा सर्वोच्च पंचतारांकित हुद्दा देऊन सरकारनेही या बहादुर योद्ध्याचे ऋण फेडले. जानेवारी २००२ मध्ये सरकारने अर्जन सिंग यांना ‘मार्शल ऑफ एअर फोर्स’ हा सर्वोच्च हुद्दा निवृत्तीनंतर बहाल केला. या दर्जाचा सैन्यदलातील हुद्दा मिळालेले हवाई दलाचे अर्जन सिंग व लष्कराचे ‘फिल्ड मार्शल’ सॅम माणेकशा हे भारतातील फक्त दोनच अधिकारी आहेत. एवढेच नव्हे तर आसाममधील पनागढ हवाई तळाला ‘एअर फोर्स स्टेशन अर्जन सिंग’ असे नाव दिले गेले. जिवंत अधिका-याचे नाव हवाई तळाला दिले जाण्याची ही एकमेव घटना होती. हवाई दलातून सन १९६९ मध्ये वयाच्या ५० व्या वर्षी निवृत्त झाल्यानंतरही सुमारे ४७ वर्षे अर्जन सिंग यांनी अनेक प्रकारे आपल्या सेवा देशाला दिल्या. ते स्वित्झर्लंडमधील भारताचे राजदूत व केनियामधील उच्चायुक्त होते. त्यानंतर त्यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल म्हणूनही जबाबदारी सांभाळली.
लहानपणापासूनच हवाई दलात काम करण्याची त्यांची इच्छा फार प्रकट होती. कौटुंबिक पार्श्वभूमी सैन्यदलाचीच असल्यामुळे लढण्याचे संस्कार त्यांना कुटुंबातूनच मिळाले. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी शाही ब्रिटिश हवाई दलात प्रशिक्षार्थी वैमानिक म्हणून त्यांची निवड झाली. हवाई दलात दाखल झाल्यावर पहिली कामगिरी वायव्य सरहद्द प्रांतात त्यांनी केली. जपानची मुसंडी रोखण्यासाठी झालेल्या आराकान मोहिमेत स्वाड्रन लीडर म्हणून ही त्यांचा सहभाग होता. पहिल्या महायुद्धात मित्र राष्ट्रांच्या फौजांच्या रंगूनपर्यंतच्या मुसंडीत स्वाड्रन लीडर म्हणून मोलाची कामगिरी केल्यामुळे त्याबद्दल त्यांना विशेष पदकाने गौरवण्यात आले. भारत स्वतंत्र झाल्यावर १५ आॅगस्ट १९४७ रोजी पहिल्या स्वातंत्र्य दिनी हवाई दलाच्या १०० विमानांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या ‘प्लायपास्ट’चे नेतृत्व ही त्यांनीच केले होते.
वायूदलाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली गेली, तेव्हा ते अवघे ४४ वर्षांचे होते. सेवेत असताना आणि निवृत्तीनंतरही अत्यंत समृद्ध आयुष्य जगलेले अर्जन सिंह हे आयुष्याच्या खेळपट्टीवरही शतकवीर झाले असते तर ते त्यांच्या आयुष्याला अधिक शोभून दिसले असते, परंतु दुर्दैवाने दोन वर्षे कमी असतानाच, म्हणजेच वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. १९६५ मधील पाकिस्तानसोबतचे युद्ध जिंकण्यात त्यांच्या नेतृत्वाखाली हवाई दलाने जी निर्णायक भूमिका बजावली, त्याबद्दल अर्जन सिंग यांना ‘पद्मविभूषण’ हा दुसरा सर्वोच्च नागरी बहुमान दिला गेला. तसेच हवाईदल प्रमुखाचा हुद्दा वाढवून तो ‘एअर चीफ मार्शल’ असा केला गेला.
अशा या वीरास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल