डॉ. विनायक रामचंद्र करंदीकर (जन्म: २७ ऑगस्ट १९१९ – मृत्यू :१५ एप्रिल २०१३)
‘देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे ‘ म्हणणारे विंदा करंदीकर आणि तसेच संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्राला, संतांच्या विचारांचे कालानुरूप दर्शन घडविणारे आणखी एक करंदीकर म्हणजे एक सत्शील, बुद्धिवादी आणि ध्येयनिष्ठ असे व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. विनायक रामचंद्र करंदीकर. ज्यांना महाराष्ट्राने वि. रा. करंदीकर म्हणून ओळखले.
वि. रा. करंदीकर हे महाराष्ट्राला, संतांच्या विचारांचे कालानुरूप दर्शन घडवणाऱ्या समीक्षकांचे पाईक होते. त्यांच्यावर स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा प्रभाव होता. वयाची १७ वर्षे संपत असतानाच विवेकानंदांच्या प्रतिमेसमोर त्यांनी प्रतिज्ञा घेतली आणि नंतर तिचे विस्मरण कधी होऊ दिले नाही. या प्रतिज्ञेनुसार ते ध्येयवादाच्या मार्गाने चालत राहिले. जवळ जवळ १० वर्षे ते देशासाठी वणवण फिरले. मात्र, ही सारी वर्षे आयुष्यातील एक फार वेगळे पर्व होऊन गेले, असे खुद्द त्यांनीच म्हटले.
वामन पंडितांच्या ‘यथार्थदीपिका’ या ग्रंथाचा एक गीताभाष्य या दृष्टीने चिकित्सक अभ्यास करून १९५७ साली पुणे विद्यापीठाची पीएच.डी. ही पदवी त्यांनी मिळवली. विलिंग्डन महाविद्यालय, सांगली व फर्गसन महाविद्यालय, पुणे येथे मराठीचे प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले.
आकाशवाणीवरुन ज्ञानेश्वर, एकनाथ व रामदास यांच्या साहित्यातील निवडक वेचांचे विवरण करणारे भाष्य त्यांनी काही लोकांच्या सहकार्याने सिद्ध केले.
रामकृष्ण मठ, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, मराठी शब्दकोश, तरुण भारत आदी संस्थांशी त्यांचा जवळून संबंध होता.
वामन पंडितांची यथार्थदीपिका, ‘भगवद्गीतेचे तीन टीकाकार’,‘ ग्रंथशोध’, ‘रामकृष्ण संघाचा इतिहास’, ‘ज्ञानेश्वरी दर्शन’,‘वेध ऋणानुबंधांचा’, ‘ज्ञानदेवांचा गीतासंवाद’, असे अनेक करंदीकर यांचे ग्रंथलेखन आहे.
‘समर्थ रामदास विवेकदर्शन’ हे रामदासांच्या निवडक साहित्याचे साहित्य अकादेमीसाठी त्यांनी संपादन केले. समीक्षक या नात्याने ‘ग्रंथवेध’ आणि ‘ग्रंथशोध’ या दोन पुस्तकांत त्यांनी केलेली विस्तृत परीक्षणे आली आहेत. करंदीकरांचे अनेक महत्त्वाचे ग्रंथ हे त्यांनी संबंधित विषयावर दिलेल्या व्याख्यानातून निर्माण झाले होते. एक नामवंत वक्ता आणि व्यासंगी लेखक अशी त्यांची प्रतिमा होती. करंदीकरांचा ‘सांस्कृतिक संचित’ हा ग्रंथ महाराष्ट्राची धार्मिक परंपरा, मराठी संत मंडळाचे कार्य, मराठीतील तत्त्वविचार जोपासणारे वाङमय, मराठी समाजाचे एकंदर विचारविश्व आणि जीवनविषयक दृष्टीकोण, भारतीयांची नीतिकल्पना आणि जीवनादर्श यांचा सविस्तर व मर्मग्राही ऊहापोह करीत असतानाच पारंपरिक अध्यात्मविचार आणि आधुनिक वैज्ञानिक दृष्टीकोण यांची तौलनिक मीमांसा करणारा आहे. ‘रामकृष्ण आणि विवेकानंद’ हा त्यांचा ग्रंथ ख्यातनाम गुरुशिष्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्याचा सादर परिचय करून देणारा आहे.
‘कुणा यात्रिकाचा जीवनसंवाद’ या नावाने करंदीकर यांनी स्वतःची कहाणी उलगडली आहे. त्यात परमेश्वराबद्दल ते म्हणतात, ‘हर एक गोष्ट करताना काय योग्य आणि काय अयोग्य हे आपली सदसद्विवेकबुद्धी आपल्याला नित्य सांगत असते. तेथे त्या परमेश्वराची चाहूल लागते त्या सदसद्विवेकबुद्धीला साद देणे म्हणजे परमेश्वराशी नाते जोडणे. परमेश्वराशी असे नाते जोडणाऱ्या या लेखकाला पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!