मंगल पांडे (जन्म :१९ जुलै १८२७ , मृत्यु: ८ एप्रिल १८५७)
२९ मार्च १८५७ बराकपूरच्या शांत लष्करी छावणीत वातावरण नेहमीप्रमाणे स्थिर होतं. सैनिक आपल्या दिनक्रमात मग्न होते. पण, काही क्षणांतच या नीरव शांततेचा भंग झाला. एका भारतीय सिपाह्याने ब्रिटिश अधिकाऱ्यावर बंदूक रोखली होती. त्या क्षणाने इतिहासात एक नवीन पर्व लिहिलं. त्याचं नाव होतं – मंगल पांडे! जेव्हा जेव्हा १८५७ च्या उठावाची आठवण येते, तेव्हा सर्वप्रथम एकच नाव डोळ्यांसमोर येतं – क्रांतिकारक मंगल पांडे!
इंग्रजांविरुद्धच्या पहिल्या लढ्याचं नेतृत्व करणारे, स्वातंत्र्याची पहिली ठिणगी चेतवणारे आणि ब्रिटिश सत्तेला पहिलं आव्हान देणारे वीर योद्धा! १८५७ चे भारतीय बंड, ज्याला “सिपाही बंड” आणि “भारताचे पहिले स्वातंत्र्ययुद्ध असेही म्हटले जाते, ज्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. १८५७ च्या सिपाही बंड’ने भारतीयांमध्ये स्वातंत्र्याचे स्वप्न निर्माण केले. हे स्वप्र घडवण्याचे श्रेय देशाचे थोर स्वातंत्र्यसेनानी मंगल पांडे यांना जाते.
१९ जुलै १८२७ रोजी जन्मलेले मंगल पांडे हे सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात भरती झाले. तेव्हा ब्रिटिश सैन्यात एनफिल्ड रायफल आली होती, ज्याच्या काडतुशांवर प्राण्यांच्या चरबीचं ग्रीस लावलं जातं. या अफवेने भारतीय सैनिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला, कारण हिंदू आणि मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावनांना हा मोठा धक्का होता. मंगल पांडे हे या अन्यायाविरोधात उठून उभे राहिले.
“हेच का आपलं भविष्य? हीच का आपली निष्ठा?”
असा प्रश्न त्यांच्या मनात घोळू लागला. आणि मग, २९ मार्च १८५७ रोजी त्यांनी इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडून स्वातंत्र्ययुद्धाचा पहिला आवाज दिला. . मंगल पांडे यांनी त्या ब्रिटीश अधिकाऱ्याला गोळी मारल्यानंतर स्वत:वर गोळी मारण्याचा प्रयत्न केला, पण त्या पूर्वीच त्यांना एका ब्रिटिश अधिकाऱ्याने पकडल. मंगल पांडे यांना स्वत:वर गोळी झाडायची होती कारण त्यांना कोणत्याही ब्रिटीश शासकाच्या हातून आपला जीव द्यायचा नव्हता, पण त्यांचा प्रयत्न फसला आणि ते ब्रिटिश अधिकाऱ्याच्या हाती पकडले गेले. इंग्रजांनी त्यांना पकडून तुरुंगात टाकलं. न्यायालयाने ८ एप्रिल १८५७ रोजी त्यांना फाशी देण्याचा आदेश दिला. त्या दिवशी, फाशीच्या फासावर उभे राहताना त्यांनी एकच गोष्ट ठामपणे सांगितली – “मी कोणाच्याही नावाचा खुलासा करणार नाही!” त्यांच्या या बलिदानाने एक संपूर्ण क्रांती निर्माण केली. पुढे १८५७ चं बंड उफाळलं आणि त्याच्या ज्वालांनी ब्रिटिश सत्ता हादरली. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने मंगल पांडे यांचा गौरव केला. ५ ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट जारी करण्यात आलं. तसेच, २००५ साली ‘मंगल पांडे: द रायझिंग’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, ज्यात अभिनेता आमिर खान यांनी त्यांची भूमिका साकारली. आजही, मंगल पांडे यांच्या बलिदानाची गाथा भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरली आहे. त्यांच्या अमर स्मृतीस विनम्र अभिवादन!
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






