ग्रामस्थांच्या उपोषणाची घेतली नवीन सी ई ओंनी दखल
स्वराज्य वार्ता / राम राठोड
परतूर तालुक्यातील अकोली ग्रामपंचायतीत सरपंच, ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवक यांनी संगनमताने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप करून त्याची स्वतंत्र यंत्रणेकडून चौकशी करण्यात यावी यासाठी अकोली ग्रामस्थांकडून जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले होते. या सुरू केलेल्या आमरण उपोषणाची मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दखल घेत प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती गठित करून चौकशीचे आदेश दिले आहेत. ग्रामस्थांकडून सरपंचांबाबत केलेल्या गंभीर आरोपांमुळे अकोली ग्रामपंचायतीत झालेला भ्रष्टाचार व गैरकारभार उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
परतूर तालुक्यातील अकोली ग्रामपंचायतने २०१७ पासून ते आजपर्यंत विविध योजनेअंतर्गत झालेल्या २३ कोटी ६५ लाख रुपयांच्या कामात सरपंच, ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवक, संबंधित अधिकारी यांनी संगनमताने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे. याची चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अकोली येथील सिद्धेश्वर सोळंके, पंजाब देशमुख, रवि भानुसे, ओमकार देशमुख, विकास खुळे, सुधाकर सोळंके हे ग्रामस्थ बेमुदत उपोषणास जिल्हा परिषदेसमोर सोमवारपासून उपोषणाला बसले होते. जोपर्यंत चौकशी सुरू होत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरू राहणार असल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. दरम्यान, आज सकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मणियार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण व जिल्हा परिषद प्रशासनाने उपोषणाची गांभीर्याने दखल घेऊन चौकशीकरिता समिती गठित करून कारवाईचे लेखी पत्र देत उपोषण स्थगित केले.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!