सुमतीताई सुकळीकर
(जन्म: २४ डिसेंबर १९२३ – मृत्यू: २२ फेब्रुवारी २०११)
जगात काही व्यक्तिमत्त्वं अशी असतात, ज्यांच्या कार्याने काळाचा प्रवाह बदलतो आणि समाजाला नवी दिशा मिळते. अशाच एका प्रेरणादायी व्यक्ती म्हणजे जनसंघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या, बालजगतच्या संस्थापिका व ज्येष्ठ समाजसेविका सुमतीताई सुकळीकर.
एक साधं आयुष्य जगत असतानाही, त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने समाजात परिवर्तन घडवलं.
सुमतीताईंचं जीवन म्हणजे त्याग, संघर्ष आणि आत्मविश्वासाचा अनोखा प्रवास होता. त्यांनी प्रत्येक पाऊल लोकहितासाठी उचलले होते.
सुमतीताईंचा जन्म २४ डिसेंबर १९२३ रोजी झाला. ताईंनी १९४४ साली गृहिणी समाजाची स्थापना करून महिलांसाठी काम करायला सुरुवात केली. सुमतीताई सुकळीकर यांनी आपल्या कार्याच्या सुरुवातीस महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला. त्यांनी ग्रामीण भागातील स्त्रियांना शिक्षण, स्वावलंबन, आरोग्य आणि स्वच्छतेची जाणीव करून दिली. १९४६ साली सी. पी. अॅन्ड बेरार विधानसभेच्या निवडणुकीत हिंदू महासभेचे उमेदवार पु. भा. भावे यांच्यासाठी त्यांनी प्रचार करीत राजकीय कामाला सुरुवात केली. १९४९ साली गृहिणी समाजाचे बालक मंदिर स्थापन करण्यात आले. १९५६ साली त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग घेतला. याच वर्षी त्यांची जनसंघाच्या नागपूर येथील महिला आघाडी प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. त्या काळात त्यांनी आंदोलन आणि सत्याग्रहातही सहभाग घेतला होता. त्यात १९७२ मध्ये गदरोडच्या सत्याग्रहात त्यांनी पाकिस्तानच्या सीमेत प्रवेश केला. १९७५ मध्ये सुमतीताईंनी बिहार राज्यातील नवनिर्माण आंदोलनात सहभाग घेतला. आणीबाणीच्या काळात त्यांनी लोकसंघर्ष समितीचे काम सुरू केले. या काळात नागपूर व येरवडा तुरुंगात त्यांनी अठरा महिने कारावास भोगला. १९६३ साली त्यांची जनसंघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर निवड करण्यात आली. ही जबाबदारी पार पाडताना त्यांनी देशव्यापी दौरे, भाषणे करून चळवळीत भाग घेतला. सुमतीताई विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उभ्या राहिल्या पण त्यांच्या पराभव झाला. पराभवाला घाबरून ताई कधी मागे हटल्या नाहीत. उलट नव्या जोमने त्यांनी त्यांचे कार्य सुरू ठेवले. काही काळ राजकारणात राहिल्या नंतर त्यांनी राजकारणातून निवृत होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी बालकांना संस्कारक्षम करण्याच्या उद्देशाने व समाजसेवक नानाजी देशमुख यांच्या प्रेरणेने बालजगत ही संस्था स्थापन केली. बालजगतच्या माध्यमातून सुमतीताई यांनी महत्त्वपूर्ण काम केले. ताईंच्या कार्याची दखल घेत. महाराष्ट्र राज्य सरकारने त्यांच्या स्मरणार्थ ‘सुमतीबाई सुकळीकर योजना’ नावाची योजना राज्याच्या ग्रामीण भागातील महिलांच्या सामाजिक उत्थानासाठी सुरू केली. तसेच नागपूर येथील अलंकार टॉकीज चौकाला “लोकमाता सुमतीताई सुकळीकर चौक” असे नाव देण्यात आले आणि त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याला आदरांजली म्हणून तेथे तांब्याचे म्युरल बसविण्यात आले. १८ जून २०२३ रोजी “रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी ” यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. सुमतीताईंचे कार्य खरच खूप महत्वाचे आणि समाजा कल्याणचे आहे. त्यांच्या सारख्या व्यक्तिमत्वामुळेच आपल्याला एक नवीन दृष्टीकोन भेटतो. त्यांच्या विचारांचा वारसा आपण जपणं ही त्यांच्या साठी खरी आदरांजली ठरेल. सुमतीताई सुकळीकर यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..!

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!