ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा
स्वराज्य वार्ता / राम राठोड आष्टी
आष्टी : शेगाव-पंढरपूर दिंडी महामार्गावरील भगवानबाबानगर, दत्तनगर, पळशी व आनंदगाव येथील ग्रामस्थांना रस्ता ओलांडण्यासाठी विरुद्ध दिशेने जावे लागते. यामुळे महामार्गावर अपघात घडत आहेत. महामार्गावर जोड रस्ता मिळावा, या मागणीसाठी सोमवारी ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. आष्टी ठाण्याचे सपोनि सचिन इंगेवाड यांच्या मध्यस्थीनंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. आष्टीपासून माजलगावकडे जाणाऱ्या शेगाव-पंढरपूर महामार्गाला भगवानबाबानगर, दत्तनगर, पळशी व आनंदगाव येणाऱ्या रस्त्याला जोडला नसल्याने या गावांच्या शेतकऱ्यांना उलट्या दिशेने जावे लागते. दुर्घटना टाळण्यासाठी महामार्गाच्या दुभाजक तोडून रस्ता देण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी रस्ते विकास महामंडळाकडे केली होती. परंतु, या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे सोमवारी सकाळी दीड तास रास्ता रोको केला. दरम्यान, रस्ते विकास महामंडळाकडून एका महिन्याच्या मुदतीत काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन आष्टी येथील सहायक पोलिस निरीक्षक सचिन इंगेवाड यांना दिले. यानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी सुग्रीव मुंडे, प्रवीण चौरे, बंडू नांगरे, हनुमान वाघमारे, कल्याण कारभारी, रामा डुरे, बबन चौरे, माऊली चौरे, अशोक घुले, मारुती , सचिन तिडके, सिद्धेश्वर राख यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!