प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळविले स्पर्धा परीक्षेत यश
स्वराज्य वार्ता / हनुमंत दवंडे
जालना प्रतिनिधी : परतूर, दि.२ – जिद्द व चिकाटी बाळगत कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर कुठल्याही क्षेत्रात हमखास यश मिळविता येते हे स्वतःच्या कृतीतून दाखवून दिले आहे ते तालुक्यातील खांडवी येथील गोरख साळवे या विद्यार्थ्याने! घरच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वतःच्या अभ्यासाच्या जोरावर गोरखने स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. एसआरपीएफ दौंड येथे गोरखची आता निवड झाली आहे. प्रकाश रामभाऊ साळवे हे मूळचे परतूर तालुक्यातील खांडवी गावाचे रहिवाशी आहेत.त्यांना गोरख व राहुल ही दोन मुले आहेत.घरची परिस्थिती जेमतेम आहे.गावात काम मिळत नसल्याने तसेच मुलांना शहरात शिकविण्याची इच्छा असल्याने प्रकाशराव साळवे हे काही वर्षांपूर्वी नाशिक गाठले. तेथेच ते स्थायिक झाले.गंगेच्या काठी झोपडी थाटून ते राहू लागले. तर आई शोभाबाई चार घरची धुणी-भांडी करून संसाराला हातभार लावू लागल्या.मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे या ध्येयाने प्रेरित झालेल्या प्रकाशरावांनी लग्न समारंभ तसेच इतर मंगल कार्यात बँड वाजविणे तसेच जवळपासच्या सोसायटीत वाचमन म्हणूनही काम केले.परंतु मुलांना शिकविले. मुलांनी आई-वडिलांच्या कष्टाच्या जाणीव ठेवत चांगले शिक्षण घेतले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. स्पर्धा परीक्षेत यश मिळाले. मेहनतीला फळ आले.गोरखची निवड एसआरपीएफ दौंड येथे झाली आहे त्यामुळे साळवे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.<br> प्रतिकूल परिस्थितीवर मात करत प्रकाशराव यांनी मुलांना शिकविले. मुलानेही वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत चांगला अभ्यास केला. नोकरी मिळविली. ही खरोखरच अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे. इतर मुलांनीही गोरखच्या यशापासून प्रेरणा घेत चांगला अभ्यास करावा व आपले भवितव्य उज्वल करावे. – अर्जुन पाडेवार, सामाजिक कार्यकर्ते, परतूर.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






