भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या १४० कोटी भारतीयांसाठी देवतुल्य असलेलं व्यक्तिमत्व. बाबासाहेबांचं कर्तृत्व खरोखरच खूप मोठं आहे. उच्चभ्रू समाजानं जाणीवपूर्वक वंचित ठेवलेल्या दलित आणि मागासवर्गीय समाजाला न्याय मिळवून देण्याचं महान कार्य बाबासाहेबांनी केलं. खरं तर अस्पृश्यतेचा कलंक मिटवण्यासाठी आपल्या समाजात अनेकांनी प्रयत्न केले. जसं कि संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत बसवेश्वर महाराज, संत गुरु नानक साहेब अशा अनेक थोर व्यक्तींचा याठिकाणी उल्लेख करता येईल. पण दुर्दैव असं कि, अस्पृश्यतेचा कलंक मिटवता मिटवता यापैकी काही जणांचे स्वतःचे स्वतंत्र पंथ तयार झाले आणि त्यातून अनेक जाती निर्माण झाल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मात्र यासगळ्यात वेगळे ठरले. त्यांनी अस्पृश्यतेविरोधात हिंदू धर्माला खऱ्या अर्थानं जागं केलं. त्यामुळं त्यांना केवळ ‘घटनेचे शिल्पकार’ एवढ्याच चौकटीत बांधून ठेवता येणार नाही तर, ते ‘मानवतेचे शिल्पकार’ होते … नव्हे आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक थोर समाजशास्त्रज्ञ तर होतेच, पण प्रख्यात वकील, अर्थतज्ञ आणि त्याहीपेक्षा जास्त कठोर देशभक्त होते. त्यामुळेच त्यांनी देशाचं विभाजन होताना कडाडून विरोध केला. देशाचा विकास आणि सामाजिक समता हेच त्यांच्या आयुष्याचं एकमेव उद्दिष्ट्य होतं. म्हणूनच त्यांनी देशहिताबाबत कोणतीही तडजोड केली नाही. ते अर्थतज्ञ होते. त्यांनी ‘Prolem of Rupee’ वर लिहिलेला लेख आणि प्रबंध हा नुसता वाचनीय नाही तर अनुकरणीय देखील आहे. बाबासाहेबांच्या या सर्व गुणांमध्ये मला आवडलेला त्यांचा एक गुण म्हणजे शिक्षणाविषयी असलेले त्यांचे विचार. ते एक थोर शिक्षणतज्ञ होते. त्यांना प्रचंड ज्ञानसक्ती होती. त्यांच्या स्वतःच्या वाचलनालयात निरनिराळ्या विषयांची पन्नास हजारांपेक्षाही जास्त पुस्तके होती.
डॉ. बाबासाहेबानी दलित, मागासवर्गीय आणि वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी खूप संघर्ष केला, अनेक चळवळी केल्या, सत्याग्रह केले. चवदार तळे, काळाराम मंदिर, पुणे करार, दलित आणि मागासवर्गीयांना शिक्षणात, नोकरीत आणि संसदेत आरक्षण या व इतर अनेक मागण्यांसाठी ते लढले आणि त्यांनी आपल्या न्याय मागण्या शासनाला पूर्ण करायला लावल्या. डॉ. बाबासाहेबांचा प्रत्येक लढा यशस्वी झाला, यामागे त्यांची वैचारिक प्रगल्भता आणि प्रचंड बुध्दीमत्ता कारणीभूत होती. त्यांनी अगदी अधाशासारखे ज्ञान ग्रहण केले. त्याचा उपयोग त्यांना वंचितांना न्याय मिळवून देताना झाला. म्हणूनच ज्ञानाची ही गंगा सर्व दलित आणि मागासवर्गीयांपर्यंत पोहचावी या उद्देशानं त्यांनी आपल्या शेवटच्या काळात ‘मिलिंद विद्यालय आणि महाविद्यालयाची’ स्थापना केली. ही स्थापना करताना त्यांच्या मनात ज्या भावना होत्या त्या मिलिंद महाविद्यालयाच्या प्रांगणात एका फलकावर शब्दबध्द केलेल्या आहेत. आपल्या भावना व्यक्त करताना आदरणीय डॉ. बाबासाहेब म्हणतात कि,
“ह्या कॉलेजला ‘मिलिंद’ हे नाव देण्यात माझा उद्देश आहे, ‘मिलिंद’ हा एक बॅक्टीयाचा ग्रीक राजा होता. त्याला आपल्या विद्वत्तेबद्दल घमेंड होती. त्याला असे वाटायचे की ग्रीक सारखे विद्वान लोक जगाच्या पाठीवर कोठेही सापडावयाचे नाहीत. आपल्या बुद्धिमत्तेचा मिलिंदला गर्व चढला होता. तो सर्वांना वाद विवादासाठी आव्हान देत असे. एकदा त्याला वाटलं की आपण बौद्ध भिक्खू सोबत वाद-विवाद करावा, परंतु त्याच्यासोबत वादविवाद करण्यास कोणीही तयार झालं नाही. तसा मिलिंद काही तत्त्वज्ञानी नव्हता किंवा गाढा विद्वानही नव्हता. त्याला राज्यकारभार कसा चालवावा हेच माहीत होते. पण अशा मिलिंद बरोबर बुद्धिवाद करण्यास कोणीही तयार होईना, याची बौद्धांना लाज वाटली व वाईटही वाटलं. नंतर महत प्रयासानं त्यांनी नागसेन भिक्खूला तयार केलं. मिलिंद चे आव्हान आपण स्वीकारले पाहिजे असा नागसेनानी निश्चय केला, मग त्यात यश येवो अथवा अपयश येवो. नागसेन हा ‘ब्राह्मण’ होता. वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी आपल्या आई बापाचे घर सोडले होते. त्यांनी विद्येच्या, ज्ञानाच्या प्राप्तीसाठी अतिशय कष्ट घेतले. तो अत्यंत विद्वान होता. नागसेनानी भिक्खूंचा आग्रह मान्य केला. नंतर मिलिंद व नागसेन यांचा वादविवाद झाला. त्यांचा वादविवाद कैक दिवस चालू होता. ह्या वादविवादाचं एक पुस्तक तयार झालं. त्या पुस्तकाला पाली भाषेत’ मिलिंद पत्रोह’ असे नाव आहे. या पुस्तकाचे मराठीत भाषांतर ‘मिलिंद प्रश्न’ असे आहे. या पुस्तकाचे शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी अवश्य वाचन करावे अशी माझी अशी माझी इच्छा आहे. शिक्षकांच्या अंगी व विद्यार्थ्यांच्या अंगी काय गुण असावेत हे त्यात सांगितलं आहे. म्हणून मी या महाविद्यालयाला ‘मिलिंद महाविद्यालय’ हे नाव दिले व परिसराला ‘नागसेन वन’ असे नाव दिले. वाद विवादात मिलिंद हरला, त्याचा पराजय झाला, तो बुद्ध धर्मी झाला. पण मिलिंद हरला व बुद्ध झाला म्हणून मी हे नाव दिलेले नाही तर मिलिंद हा मला त्याच्या ‘इंटेल ऍक्चुअल ऑनेस्टी’ बद्दल प्रिय वाटतो. त्याचा हा आदर्श सर्वांनी नेहमी डोळ्यासमोर ठेवावा म्हणून हे नाव दिलेले आहे. हे आदर्शभूत असेच नाव आहे असे माझे मत आहे. उत्तम विद्यार्थी म्हणून मिलिंद व उत्तम शिक्षक म्हणून नागसेन हे आदर्श आहेतच. शिक्षण संस्थेला एखाद्या श्रीमंत व्यापाऱ्याने बक्कळ पैशाची देणगी दिली म्हणून त्याचे नाव शिक्षण संस्थेला देणं हे अत्यंत अनुचित होय. मी या संस्थेसाठी पुष्कळ नुकसान सोसले, पण कोणत्याही व्यक्तीचे नाव संस्थेला दिले नाही. तसं मला सुद्धा आदर्श नाव आहे, पण मला मिलिंदचा आदर्श आपल्यासमोर ठेवायचा आहे. मिलिंद महाविद्यालय हे एक संस्कार केंद्र आहे, यामधून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी सुसंस्कृत होऊन बाहेर पडला पाहिजे.”
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
१२ डिसेंबर १९५५
शिक्षणाविषयी किती महान विचार होते डॉ. बाबासाहेबांचे. हे विचार ऐकताना, वाचताना आज शिक्षणाचं आणि एकूणच शैक्षणिक संस्थांचं जे बाजारीकरण झालं आहे ते पाहताना अक्षरशः स्वतःची लाज वाटते. डॉ. बाबासाहेबांना या गोष्टीची जाणीव होती कि, केवळ सत्तेत येऊन, कायदे बदलून सामाजिक विषमता संपवता येणार नाही तर त्यासाठी शिक्षणाची जोड हवी. म्हणूनच त्यांनी देशाला मूलमंत्र दिला होता कि, ‘शिका! संघटित व्हा! संघर्ष करा!’ परंतु या मूलमंत्रातील फक्त संघर्षासाठी संघटित झालेला समाज आज आपण पहात आहोत. यातील ‘शिका’ हा शब्द जणू काही विस्मृतीत गेला आहे. निकृष्ट दर्जाचे शिक्षण आणि शिक्षणाचा होत चाललेलं बाजारीकरण यामुळं आजची तरुण पिढी ही भरकटली आहे, नैराशेच्या गर्तेत ओढली जात आहे. खरं म्हणजे आपल्या देशाइतकी बुद्धीमत्ता जगात कुठंच नाही. जागतिकीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या या युगात भारतीय तरुणांना जगभरात मागणी आहे, जग त्यांची वाट पहात आहे. परंतु त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यानं ‘मिलिंद’ आणि शिक्षकानं ‘नागसेन’ होणं ही काळाची गरज आहे.
१४ एप्रिल १८९१ ते १९५६ या ६५ वर्षांच्या डॉ. बाबासाहेबांच्या जीवित कालावधीत समाजाची जी रचना होती त्या पार्श्वभूमीवर सामाजिक समतेसाठी आणि दलित व मागासवर्गीयांना न्याय मिळवून देण्यासाठी ज्या काही आवश्यक गोष्टी होत्या त्या आदरणीय डॉ. बाबासाहेबांनी करून ठेवल्या आहेत. त्यासाठी समाज त्यांचा कायम ऋणी राहील. पण २०२४ ते २०८९ या पुढील पासष्ठ वर्षांच्या कालावधीत बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्यांच्या शिक्षणविषयक विचारांना कृतीत आणणं अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा आज या महामानवाच्या जयंतीनिमित्त संकल्प करूया, शिक्षणाची आणि ज्ञानाची कास धरूया. ज्ञानावर आधारित शिक्षण व्यवस्था हीच खरी आदरणीय डॉ. बाबासाहेबांना अर्पण केलेली आदरांजली ठरेल.
मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल