नवकाव्याचे प्रवर्तक – बाळ सीताराम मर्ढेकर (बा.सी. मर्ढेकर)!
मागे भास्कर रामचंद्र तांबे यांच्यावर एक ब्लॉग मी लिहिला होता. त्याला तुमचा उत्तम प्रतिसाद मिळाला आणि बहुतांश लोकांना ‘कविता’ प्रिय आहे याची नव्याने जाणीव झाली. भा. रा. तांबे प्रमाणे शालेय जीवनात भेटलेले आणखी एक कवी म्हणजे बाळ सीताराम मर्ढेकर अर्थात बा. सी. मर्ढेकर. आज त्यांची जयंती!
शालेय जीवनात कविता म्हणजे फक्त परीक्षेपुरती अभ्यासण्याची गोष्ट होती. त्यामुळं एखादी कविता कवीच्या भूमिकेमधून समजून घेणं किंवा तिचं रसग्रहण करणं ही फारच दुरापास्त गोष्ट होती. त्यातही मर्ढेकरांची कविता म्हणजे जगण्यातील खोल विसंगती आणि जीवनातील अर्थशून्यतेचा अविष्कार असणाऱ्या. त्यामुळे त्या अधिक क्लिष्ट वाटायच्या. पण जेव्हा मी मोठा झालो आणि आयुष्यातील चढ उतारांना सामोरा गेलो तेव्हा मर्ढेकरांच्या कविता खऱ्या अर्थानं समजायला लागलो. बा. सी. मर्ढेकरांना नवकाव्याचे प्रवर्तक मानले जाते. त्यांच्यापासूनच कवितेचे नवे युग जन्माला आले.
पारंपरिक भाषेचा आणि प्रतिमांचा वापर न करता आशयघन कवितेची निर्मिती करणं हे त्यांच्या कवितांचं वैशिष्ट्य होतं. शालेय जीवनात असताना मर्ढेकरांच्या एका कवितेचे पु. लंनी केलेलं विडंबन वाचलं होतं. ती कविता होती –
पिपात मेले ओल्या उंदीर
माना पडल्या मुरगळल्याविण
ओठांवरती ओठ मिळाले
माना पडल्या आसक्तीविण
गरीब बिचारे बिळात जगले
पिपात मेले उचकी देऊन
दिवस साडला घाऱ्या डोळी
गात्रलिंग अन धुऊन घेऊन
जगायची पण सक्ती आहे
मरायची पण सक्ती आहे …
या कवितेचं विडंबन करताना पुलंनी अत्यंत विशुध्दपणे ते केलं. त्या काळी साहित्यात असणारी निःस्पृह वृत्तीच याठिकाणी दिसून येते. म्हणून तर भा. रा. तांबे असोत कि बा. सी. मर्ढेकर किंवा मग पु. लं., या सगळ्यांनीच साहित्याच्या क्षेत्रात स्वतःचं अबाधित स्थान प्रस्थापित केलं.
मर्ढेकरांच्या कविता म्हणजे केवळ आशयघन भावनांची अभिव्यक्ती होत्या असं नव्हे तर प्रसंगानुरूप त्यांच्या लेखणीतून गर्भितार्थी रचना ही प्रसवल्या. जसं कि –
अभ्रांच्या ये कुंद अफूने
पानांना या हिरवी गुंगी
वैशाखातील फांदीवरती
आषाढातील गाजर पुंगी
वरकरणी वैशाख महिन्यातील वातावरण विदित करत आहे असं भासवणारी ही कविता प्रत्यक्षात दुसऱ्या महायुध्दातील आंतरराष्ट्रीय राजकारणाची परिस्थिती दर्शविणारी कविता आहे. दुसऱ्या महायुध्दाच्या पार्शवभूमीवर जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्याचे ठरवले होते. यासाठी एक परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेमध्ये ४६ देशांमधील प्रतिनिधी उपस्थित होते. परंतु असे असले तरी फक्त ५ मोठ्या राष्ट्रांच्या प्रतिनिधींचा प्रभाव या परिषदेमध्ये जाणवत होता. त्यावेळी छोट्या राष्ट्रांच्या प्रतिनिधींची स्थिती आणि त्यावेळची परिस्थिती विशद करणारी ही कविता होती.
मिटून बसली पंख पाखरे
पर्युत्सुक नच पिसही फुलते
मूक गरोदर गायीची अन
गळ्यातली पण घंटा झुरते
उपरोक्त अनुषंगानं जेव्हा आपण या काव्यपंक्ती वाचतो तेव्हा दुसऱ्या महायुध्दातील आंतरराष्ट्रीय राजकारणाची विदारक परिस्थितीची जाणीव आपल्याला होते. यावरून एक लक्षात येते कि, कवी केवळ काल्पनिक रचना करत नाही अथवा भावनांची अभिव्यक्तीही करत नाही तर जीवनातील वास्तविकताही विशद करतो.
मराठी भाषा समृध्द करण्यामध्ये भा. रा. तांबे, कि बा. सी. मर्ढेकर, पु. लं. यांच्यासारख्या अनेक कवी, कवियित्री, लेखक आणि लेखकांनी महत्वाची भूमिका निभावली आहे आणि मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे या साहित्यिकांच्या जन्मदिनी किंवा स्मृतिदिनी जेव्हा आपण त्यांचे स्मरण करतो व त्यांच्या साहित्याचं अवलोकन करतो तेव्हा आपली वैचारिक क्षमताही समृध्द होते आणि आपली मानसिकताही प्रगल्भ होते. नव कवींनी आणि कवयित्रींनी मर्ढेकरांसारख्या कवीच्या लेखणीतून प्रसवलेल्या काव्यांची आवर्तनं करायला हवीत, जेणेकरून कवितेचे हे आशयघन युग अखंड चालू राहील.
जीवनातील वास्तविकतेबरोबरच –
भंगू दे काठिण्य माझे
आम्ल जाऊ दे मनीचे
येऊ दे वाणीत माझ्या
सूर तुझ्या आवडीचे …
काव्य रसिकांसाठी हे पसायदान मागणाऱ्या बा. सी. मर्ढेकर यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!