वीर वामनराव जोशी (जन्म: १८ मार्च १८८१ – मृत्यू :३ जून १९५६)
स्वातंत्र्याच्या सूर्याच्या आगमनासाठी आपल्या संपूर्ण जीवनाचे बलिदान देणारे वीर वामनराव जोशी म्हणजेच राष्ट्रभक्तीचे मूर्तिमंत उदाहरण. त्यांच्या हृदयात देशसेवेची अखंड ज्योत तेवत होती. देशाच्या स्वातंत्र्यासाठी “सबकुछ कुर्बान” हीच त्यांची जीवननिष्ठा होती. स्वातंत्र्यप्राप्ती हा त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू होता, आणि त्यासाठी त्यांनी आपल्या कुटुंबाचा, भावना, सुखाचा त्याग केला.
बालपणापासूनच वामनराव देशसेवेकडे आकर्षित झाले. त्यांचे प्रारंभीचे जीवन जहाल क्रांतिकारकाचे होते. त्यांनी सशस्त्र क्रांतीसाठी युवकांची संघटना उभारली, त्यांना शस्त्रप्रशिक्षण दिले, आखाडे सुरू केले, लष्करी पुस्तके वाचण्यासाठी ग्रंथालये उभारली आणि अगदी बॉम्ब तयार करण्याच्या प्रयोगशाळाही चालवल्या.
एक पिता म्हणून वामनरावांना आपली मुले प्रिय होती, परंतु त्यांच्यासाठी देशप्रेम सर्वोच्च होते. “स्वतंत्र हिंदुस्थान” साप्ताहिकाच्या प्रकाशनात त्यांचा मोठा मुलगा नारायण सहकार्य करत होता. डिसेंबर १९२४ मध्ये प्लेगच्या आजाराने ग्रस्त असलेल्या नारायणने शेवटचा श्वास घेतला, तेव्हा वामनराव त्याचे डोके मांडीवर ठेवून अग्रलेख लिहीत होते. लेख पूर्ण झाल्यावरच त्यांनी त्याच्या मृत्यूकडे पाहिले. यानंतर दोन वर्षांतच त्यांचा दुसरा मुलगा हरीही आजाराने गेला. एवढ्या मोठ्या दुःखातूनही ते देशसेवेसाठी अढळ राहिले.
त्यांची लेखणी जितकी तीव्र, तितकीच ओजस्वी होती. राष्ट्रप्रेम जागवणारी ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’, ‘रणदुंदुभी’, आणि ‘धर्मसिंहासन’ ही नाटके त्यांनी लिहिली. त्यांची नाटके महाराष्ट्रभर लोकप्रिय झाली. प्रसिद्ध गायक दीनानाथ मंगेशकरांनी त्यांच्या नाटकातील पदे गायली. अनेक नाटक कंपन्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढणारे ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’ हे नाटक त्यांच्या प्रतिभेचे उत्तम उदाहरण ठरले.
एक निर्भीड पत्रकार म्हणून त्यांनी ‘राष्ट्रमत’ वृत्तपत्रात गंगाधरराव देशपांड्यांचे सहकार्य केले. त्यांनी ‘स्वतंत्र हिंदुस्थान’ हे साप्ताहिक चालवले, ज्यातून लोकजागृती केली. त्यांच्या लेखणीत आणि वाणीमध्ये असामान्य ओज होता. इ.स. १९२० ते १९४२ या कालखंडात अनेक वेळा त्यांनी तुरुंगवास भोगला. गांधीजींच्या चळवळीतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
वामनराव जोशी यांनी आपले संपूर्ण जीवन राष्ट्राच्या सेवेसाठी वाहिले. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान केवळ क्रांतीपुरते मर्यादित नव्हते, तर ते विचार, लेखन, आणि समाजजागृतीतही ठळकपणे उमटले. त्यांचे बलिदान आणि राष्ट्रभक्ती ही प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपल्या भावनांनाही कुर्बान केले, म्हणूनच ते खऱ्या अर्थाने राष्ट्रवीर ठरतात.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!