चिंतामणराव कोल्हटकर. (जन्म :१२ मार्च, १८९१, मृत्यू :२३ नोव्हेंबर १९५९)
“रंगभूमी म्हणजे केवळ अभिनयाचे व्यासपीठ नव्हे, ती समाजप्रबोधनाची आणि संस्कृती जपण्याची जागा आहे.”
मराठी नाट्यसृष्टीतील एक अढळ तारा, अपूर्व अभिनयाची खाण, आणि रंगभूमीचा निष्ठावान सेवक म्हणजे चिंतामणराव कोल्हटकर. महाराष्ट्राच्या नाट्यपरंपरेला आकार देणाऱ्या या महान अभिनेत्याची कारकीर्द संघर्ष, मेहनत आणि कलेच्या निस्सीमतेने नटलेली होती.
रत्नागिरी जिल्ह्यातील नेवरे गावात १२ मार्च १८९१ रोजी जन्मलेल्या कोल्हटकरांचा वारसा वडिलांकडून वक्तृत्व आणि लेखनाचा होता. मात्र, वयाच्या सातव्या वर्षीच वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्या बालपणीची वाटचाल संघर्षमय ठरली. अभ्यासात गती नव्हती, म्हणून काही काळ त्यांनी पारंपरिक शेती केली. पण त्यांचे मन तिथे रमले नाही. अखेरीस नाट्यसृष्टीच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली. १९०७ साली साताऱ्यात ‘तुकाराम’ नाटकातील मंबाजी ही भूमिका साकारून त्यांनी नाट्यजगतात पहिले पाऊल ठेवले. पुढे नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ते महाराष्ट्र नाटक मंडळीत दाखल झाले. १९११ मध्ये महाराष्ट्र नाटक मंडळीत आणि पुढील वर्षी भरत नाटक मंडळीत काम केल्यानंतर, १९१४ मध्ये किर्लोस्कर नाटक मंडळीने त्यांना खरी प्रसिद्धी मिळवून दिली.
१९१८ मध्ये त्यांनी दीनानाथ मंगेशकर आणि कृष्णराव कोल्हापुरे यांच्यासह बळवंत संगीत नाटक मंडळी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी मराठी रंगभूमीला अनेक अजरामर नाटके दिली. पुण्यप्रभाव, राजसंन्यास, भावबंधन यांसारख्या नाटकांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. विशेषतः वेड्यांचा बाजार हे राम गणेश गडकरी यांचे अपूर्ण नाटक पूर्ण करून त्यांनी रंगभूमीला एक अनमोल देणगी दिली.
नाटककार राम गणेश गडकरी, स्वातंत्र्यवीर सावरकर, इतिहाससंशोधक वासुदेवशास्त्री खरे, वीर वामनराव जोशी यांच्या प्रतिभासंपन्न लेखणीतून त्यांनी नाटके लिहून घेतली आणि रंगभूमीवर आणली. गद्य आणि पद्य नाटकांची अपूर्व सांगड घालणाऱ्या बळवंत संगीत नाटक मंडळीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
१९३३च्या सुमारास संगीत नाटकांना प्रेक्षकांचा प्रतिसाद घटला, तेव्हा चिंतामणरावांनी चित्रपटसृष्टीकडे मोर्चा वळवला. वसंतसेना चित्रपटातील त्यांची शकारा ही भूमिका प्रचंड गाजली.
चिंतामणराव कोल्हटकर म्हणजे केवळ एक महान अभिनेते नव्हेत, तर मराठी रंगभूमीच्या सुवर्णकाळातील एक महत्त्वाचा स्तंभ होते, ज्यांनी नाटक आणि सिनेमा यांना एक नवा आयाम दिला.
रंगभूमीवर आपली वेगळी छाप पाडणारे चिंतामणराव कोल्हटकर हे प्रयोगशीलतेने भारलेले कलावंत होते. त्यांनी केवळ नाटकातच नव्हे, तर चित्रपटसृष्टीतही नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. बळवंत संगीत मंडळीचे त्यांनी बळवंत पिक्चर्समध्ये रूपांतर केले. मात्र, हा प्रयोग त्यांच्या दृष्टीने अत्यंत त्रासदायक ठरला.
अखेरीस, त्यांनी चित्रपटसृष्टीला पाठ फिरवली आणि पुन्हा नाटकाकडे वळण्याचा निर्णय घेतला.
गंगाधरपंत लोंढे यांच्या राजाराम संगीत मंडळीत प्रवेश करून त्यांनी रंगभूमीवर पुनरागमन केले. त्यानंतर ते मो.ग. रांगणेकरांच्या नाट्यनिकेतनमध्ये सहभागी झाले आणि अखेरीस ललित कला कुंज नावाची स्वतःची नाट्यसंस्था स्थापन केली. या संस्थेनेच पुढे पु. ल. देशपांडे यांना मोठ्या रंगभूमीवर आणले.
कोल्हटकर यांनी मराठी रंगभूमीवर जितकी प्रभावी भूमिका साकारली, तितकाच त्यांचा प्रभाव हिंदी आणि उर्दू नाटकांतही जाणवला. पुण्यप्रभाव या नाटकातील त्यांच्या दमदार भूमिकेबद्दल मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी त्यांचा सत्कार केला होता. त्यांच्या नाट्यकलेला दाद देत, पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांना ‘बहुरूपी’ या विशेषणाने गौरवले, आणि त्यामुळेच त्यांनी आपल्या आत्मचरित्राला बहुरूपी असे नाव दिले.
नाटककारांच्या व्यक्तिरेखा उलगडणारे माझे नाटककार हे त्यांचे पुस्तक आजही संदर्भग्रंथ मानले जाते. तसेच पुण्यावतार हे त्यांचे पाच-अंकी नाटक १९६६ मध्ये आंतरनाट्य संस्थेने रंगमंचावर आणले. त्यांचा नाट्यप्रेमाचा वारसा पुढे त्यांचे पुत्र चित्तरंजन कोल्हटकर यांनीही चालवला. त्यांची नात, विनीता करमरकर यांनी चिंतामणरावांचे चरित्र लिहून त्यांची कारकीर्द नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम केले.
नट, दिग्दर्शक आणि नाटककार या तिन्ही भूमिका निभावत चिंतामणरावांनी जवळपास ५० वर्षे रंगभूमीवर आपली निष्ठा कायम ठेवली. अपयश आले, अडथळे आले, पण त्यांनी आपल्या कलेला कधीही सोडले नाही. त्यांची खरी ताकद होती – त्यांची नाटकांवरील निस्सीम श्रद्धा आणि प्रयोगशीलता, ज्यामुळे ते आजही अजरामर आहेत.
चिंतामणराव कोल्हटकर यांना जयंती निमित विनम्र अभिवादन!

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!