विद्रोहाचा रगदार स्वर बुलंद करणारे विद्रोही साहित्य संमेलन !

महापुरूषांचे तेजस्वी विचार काळजावर कोरून घेतल्याशिवाय, खरी तळमळ असल्याशिवाय प्रबोधन करणारी सकस सांस्कृतिक चळवळ उभी राहत नाही. ज्या महात्मा फुलेंनी कट्टर प्रतिगाम्यांच्या पुणे शहरातून तुच्छतावाद्यांना लाजवत पुरोगामी चळवळ उभी केली; त्याच पुण्यातून आयु. किशोर ढमाले व प्रा. प्रतिमा परदेशी या समर्पित दांपत्याने प्रबोधनाचा प्रण प्रत्यक्षात उतरऊन दाखवला.
संविधानिक मूल्यांना समर्पित विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याच्या अध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी व संघटक किशोर ढमाले आहेत. मी धुळे जिल्ह्यात नोकरी केली. त्यामुळे किशोर भाईंना अनेक वर्षांपासून ओळखतो. धुळे, शहादा, नंदूरबार ही त्यांची आंदोलन भूमी राहिली आहे. हे झपाटलेले दांपत्य जिथे अ.भा. मराठी साहित्य संमेलन असते तिथे विद्रोही मराठी साहित्य संमेलन घेत असते. हे संमेलन श्रमिकांच्या कष्टकर्‍यांच्या मूठभर धान्य व एक रूपया मदतीच्या उर्मीतून घेतले जाते. त्यामुळे कोट्यवधी रूपयांच्या गुर्मीतून उभारलेल्या अ.भा. संमेलनाचा मूल्यात्मक फोलपणा उघडा पडतो. मला या संमेलनाला कधी बोलवले गेले नाही. पण मी पुरोगामी लेखक व विद्रोही कवी म्हणून अमळनेर व संभाजीनगरच्या संमेलनाला श्रोता म्हणून उपस्थित राहिलो. या संमेलनाने ‘अस्मितादर्श’ साहित्य संमेलनाची उणीव भरून काढलीय. मी जालना येथे झालेल्या पस्तीसव्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचा संमेलनाध्यक्ष होतो. डॉ. गंगाधर पानतावणे सरांनी निवडलेला मी शेवटचा अध्यक्ष होतो. या वर्षी विद्रोही साहित्य संमेलन अ‍ॅड. के.ई. हरिदास, प्रा. राम प्रसाद तौर, इंजिनिअर सतीश चकोर, अ‍ॅड. धनंजय गोरडे यांच्या पुढाकाराने संभाजीनगर येथे झाले. “भरगच्च वैचारिक शिदोरी देणारे सकस साहित्य संमेलन” असे त्याचे वर्णन एका वाक्यात करता येईल. तरी अशा संमेलनाला शासकीय आर्थिक मदत का मिळत नाही ? हा चिंतेचा विषय आहे. शासनाला अशा संमेलनांना मदत करायची सुबुद्ध होवो !
महाराष्ट्र प्रदेशात अंकुर साहित्य संमेलन आजही सुरू आहे. स्मृतिशेष हिंमत शेकोकार नावाच्या एका कलंदर तरूणाने लोकाश्रयातून या संमेलनाची सुरवात केली. बहुजन साहित्य संमेलन, साहित्यिक कलावंत साहित्य संमेलन नगरसेवक दिलीप बराटे यांनी हे पुणे येथे भरवतात. शंकर घोरसे नावाचे ध्येयधुंद वर्‍हाडी कामगार साहित्यिक अक्षरक्रांती आंतरराष्ट्रीय महोत्सव नागपूर येथे 28, 29 डिसेंबरला रेशिमबाग नागपूर येथे घेतला. मी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होतो. लोकाश्रयावर हे संमेलन यशस्वी झाले. प्रा. विनायक तुकाराम हे कवी समीक्षक-विचारवंत म्हणून परिचित आहेत. तेही संमेलन घेतात.
सांस्कृतिक सत्ता ही सर्व सत्तांची सत्ता असते. ती सोडायलाही लोक तयार नसतात. सत्ता नसतांना किशोरभाई व प्रतिमाताई यांनी सुरू केलेला हा सांस्कृतिक-वाड्ःमयीन लोकजागर आजच्या प्रतिक्रांतीच्या वेळी खूप मोलाचा ठरत आहे. विद्रोही संमेलनात महत्वाच्या गटचर्चा होतात. त्यात अभ्यासूंकडून ग्रंथालय चळवळ, जल-जंगल-जमीन अधिकाराचा प्रश्न आणि कंपन्यांचे आक्रमण, माध्यमांची गळचेपी की शरणागती, मराठवाडा ः जातीय धु्रवीकरणाकडून जातीयुद्धाकडे की जाती अंताकडे ? जातीनिहाय जनगणना, पाणीप्रश्न, शैक्षणिक धोरण-मनुवादाचे नुतनीकरण, कृत्रिम मेंदूचे मानवी संस्कृतीसमोरील आव्हान, न्यायालये न्याय देवता का ? अशा अनेक ज्वलंत प्रश्नांवरही या संमेलनात गंभीर चर्चा चिंतन घडवले जाते. याऊलट मणभर पैसे उधळणार्‍या संमेलनातून कणभर तरी शुद्ध विचार मिळतो का ? असा विचार विज्ञासू विवेकी श्रोत्यांच्या मनात येतो. विद्रोहीच्या संमेलनात प्राचार्य वृषाली रणधीर यांचा “होय, मी सावित्री ज्योतीराव फुले बोलते” हा एकपात्री प्रयोग पाहून श्रोते धन्य होतात. रणधीर अभिनय सम्राज्ञीच आहेत. त्या प्रत्येक तत्कालीन प्रसंग आपल्या दमदार अभिनयातून आणि कणखर आवाजातून जिवंत करतात ! विद्रोहीच्या सूत्रधार दांपत्याने शोधून काढलेलं हे ‘माणिक’ लाख मोलाचं आहे. कथा-कविता-परिसंवादांची अशी वैचारिक भरमार ‘त्या’ संमेलनात औषधालाही सापउत नाही. सावित्रीमाईंनी पहिली मुलींची शाळा सुरू करताच धर्म बाटला अशी निरर्थक वल्गना करणार्‍यांच्या अनुयायांनी हा एकपात्री प्रयोग पाहून मान शरमेने खाली घालावी ! महात्मा फुले व सावित्रीमाई नसत्या तर एवढ्या मुली शिकल्या असत्या का ?

किशोर ढमाले

  प्रा. प्रतिमा परदेशी                  

“अखिल मानवजातीला सुंदर बनवणार्‍या साधनेचं नाव साहित्य असतं !” हे हिन्दीचे थोर साहित्यिक हजारीप्रसाद द्विवेदी यांनी म्हटलंय. म्हणूनच विद्रोही साहित्य संमेलनात लेखक-कलावंतांचा सन्मान होतो. किशोर ढमाले व प्रतिमाताई प्रत्येक सत्राकडे स्वतः लक्ष देऊन ते यशस्वी करतात ! आजच्या कठीण महागाईच्या काळात संमेलन घेणं खूप कठीण झालंय. या दांपत्याला माणसं जोडायची कला अवगत आहे. मराठवाड्याचे थोर कवी श्री. दि. इनामदार म्हणतात.

“ग्रंथ थकले ग माय
संत थकले ग माय
नाही थकला भीमाचा
काटे तुडविता पाय !”

घसा बसला तरी हे दांपत्य थकत नाही, झुकत नाही. अडथळ्यांचा काटेरी मार्ग तुडवत संमेलन यशस्वी करून दाखवतात. त्यांचं हे कार्य स्तुत्य व अभिनंदनीय आहे.
किशोर ढमाले नि प्रतिमा परदेशींनी अफाट परिश्रम घेवून विद्रोही सांस्कृतिक चळवळ उभी केली. त्यांनी घडवलेल्या कवी-लेखक-विचारवंतानी श्री.दिं. च्या शब्दात

“सूर्य उगवला उठा उठा रे
प्रकाश दे हाका
आयुष्याच्या तेजावरती
पाय पुढे टाका!”

असे ब्रीद मिरवणार्‍या लेखकांना समोर आणलं. ही बाब मला खूप महत्वाची वाटते. विवेक सुरक्षित ठेवणारे साहित्य समोर आणणे हे काम मोलाचे आहे. हे जाणवल्याने मला हा लेख लिहावासा वाटला. अभिनिवेश न बाळगता साधेपणाने वावरणार्‍या या दांपत्याला समजून घेणे गरजेचे आहे. त्यांची नोंद घ्यायची सुबुद्धी शासनकर्त्यांना होणार नाही, त्यांना तशी गरजही नाही. ‘पण सत्य की जय’ म्हणत आयुष्य खपवायची प्रतिज्ञा करणार्‍या, म.फुले सावित्रीमाईंचं काम नेटाने पुढे नेणार्‍या दांपत्याला बळ देणे गरजेचे आहे.
प्रत्येक संमेलनात विद्रोही पत्रकार निरंजनजी टकले यांचे तडाखेबंद भाषण ठरलेलेच असते. त्यांनी संभाजीनगरच्या संमेलनात “संविधान आणि लोकशाहीला कार्पोरेट मनुवाद्यांचे आव्हान” या विषयावर चिंतनीय घणाघाती भाषण केले. त्यांनी सत्तेची तळी उचलून धरणार्‍यांना आसूड उगारून धुतले. डोळ्यात अंजन घालणार्‍या त्यांच्या भाषणांची ऑडियो, व्हीडिओ कॅसेट सर्वत्र जायला हवी. ते झुंजार वक्ते आहेत. खरंतर –

“निर्धार उर्जापूर्ण असला की
वादळही थोपवता येते
समतेच्या शत्रूंना कबरीत झोपवता येते !…” वज्रमूठ डी.बी. जगत्पुरिया
मनुवाद्यांना नामोहरम करण्याची रग त्यांच्या धगदार वाणीत आहे. संमेलन म्हटले की काही मिरवणारेही येऊन जातात. महापुरूषांचे विचार मुरवलेले अस्सल लोक राहून जातात. उद्घाटक म्हणून या संमेलनात नामवंत हिन्दी लेखकाला बोलवलं जातं.
“भूख, बेकारी, घुटन, उपवास लिखना
जब कभी इस देशका इतिहास लिखना“
मानवी विवेक शाबूत ठेवणार्‍या या संमेलनात याचेच चिंता-चिंतन होते. विद्रोहाचा दडपलेला विद्रोही स्वर बुंलद करणार्‍या या दांपत्यास खूप खूप शुभेच्छा दिल्या.

डी.बी. जगत्पुरिया, 9860485398

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल